राहाता:-हर घर तिरंगा’तून सामाजिक एकोपा; विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने राहाता दुमदुमले.
पत्रकार आदिनाथ कडू अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

राहाता:-हर घर तिरंगा’तून सामाजिक एकोपा; विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने राहाता दुमदुमले.

राहाता : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राहाता नगरपरिषद, नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या भव्य तिरंगा रॅलीला राहाता शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ झाला. यानंतर डॉ. विखे पाटील यांनी स्वतः तिरंगा हातात घेत शालेय विद्यार्थ्यांसमवेत रॅलीत सहभाग घेतला.

राहाता शहरातील विविध भागातून निघालेल्या या रॅलीत शालेय विद्यार्थी, युवक, महिला तसेच सर्व जाती-धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात तिरंगा आणि देशभक्तीच्या घोषणांनी शहरातील वातावरण भारावून गेले होते. स्वातंत्र्यदिन हा कोणत्याही एका जातीचा, धर्माचा किंवा पक्षाचा सण नसून प्रत्येक भारतीयाने एकत्र येऊन साजरा करण्याचा राष्ट्रीय उत्सव आहे, असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत रॅलीत सहभागी होत त्यांचा उत्साह वाढविला. नव्या पिढीमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान, देशभक्ती आणि राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
‘हर घर तिरंगा’ अभियान केवळ घराघरावर राष्ट्रध्वज फडकविण्यापुरते मर्यादित न राहता तिरंग्याचा सन्मान आणि त्यासंदर्भातील नियम व प्रोटोकॉल प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले. झेंडा लावल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने काळजी घेणे, सायंकाळी सन्मानपूर्वक उतरविणे आणि त्याची योग्य प्रकारे जपणूक करणे हीदेखील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, रॅलीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांच्यावर होणाऱ्या राजकीय टीकेलाही थेट प्रत्युत्तर दिले. काम करण्यासाठी मला कुठल्याही पदाची गरज नाही, असे स्पष्ट करत त्यांनी जनतेशी असलेले आपले नाते पदापेक्षा विश्वासावर आधारित असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले मी कुणालाही बैठकीला बोलवत नाही. मी या तालुक्याचा नागरिक म्हणून नगरपालिकेत आलो आहे. लोक प्रेमापोटी स्वतःहून येत असतील तर त्यांना मी दूर करू शकत नाही. लोकांचं प्रेम कमवावं लागतं, ते विकत घेता येत नाही,असे डॉ. विखे पाटील म्हणाले.
राहाता आणि शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीचा संदर्भ देताना ते म्हणाले, या निवडणुकीत मी स्वतः जवळपास ८० सभा घेतल्या. त्या वेळी विकासकामांची जी आश्वासने दिली गेली, त्या शब्दांवर लोकांनी मतदान केले असेल, तर ते शब्द पूर्ण होण्याची नैतिक जबाबदारी माझीही आहे. मला काम करण्यासाठी कुठल्याही पदाची आवश्यकता नाही. मी देशाचा नागरिक आहे आणि काम सुस्थितीत व चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी प्रयत्न करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे,असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरही डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली. महिला सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्याही पदावर असणे बंधनकारक नाही. अन्याय होत असेल तर माझ्याकडे असलेली प्रत्येक ताकद वापरून शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यासाठी काम करत राहणार,असे त्यांनी सांगितले.
एका व्यक्तीच्या वक्तव्याबाबत विचारले असता संबंधित व्यक्तीचा व्हिडिओ आपण पाहिलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ज्या पक्षाचे ते पदाधिकारी आहेत, त्या पक्षाचा मी प्रदेश उपाध्यक्ष आहे. त्यामुळे पक्षाचे बोर्ड लावणाऱ्यांनी आणि पक्षाची जाहिरात करणाऱ्यांनी पदाच्या वरिष्ठतेनुसार पक्षाच्या पदाची आणि गरिमेची जाणीव ठेवावी, असा टोला त्यांनी लगावला.
‘हर घर तिरंगा’ अभियानातून राष्ट्रभक्ती, सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय कर्तव्याचा संदेश देतानाच जनतेने दिलेल्या विश्वासाची जपणूक करण्याची भूमिका डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केली. रॅलीतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे राहात्यातील तिरंगा रॅली विशेष ठरली.


RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION



