श्री विसर्जन पंचगंगा नदीतच संदर्भात उद्या आजी-माजी लोकप्रतिनिधींना निवेदन देणार
प्रतिनिधी ओमकार शिंदे इचलकरंजी :-9834664278

श्री विसर्जन पंचगंगा नदीतच संदर्भात
उद्या आजी-माजी लोकप्रतिनिधींना निवेदन देणार.
इचलकरंजी/प्रतिनिधी –
यंदाच्या गणेशोत्सवामध्ये घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या श्रींचे विसर्जन शहापूर खणीतच करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाला शहर व परिसरातील सार्वजनिक मंडळांकडून विरोध दर्शविला जात आहे. यंदा श्रींचे विसर्जन हे पंचगंगा नदीतच करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी सोमवारी (8 ऑगस्ट) आजी-माजी खासदार, आमदार आणि महापालिकेचे आयुक्त यांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
गणेशमूर्ती विसर्जन विषय संदर्भात शनिवारी व्यंकोबा मैदान येथे शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये यंदा श्रींचे विसर्जन पंचगंगा नदीतच करण्याबाबत चर्चा झाली. मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे शहापूर खणीमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. प्राप्त परिस्थिती आणि प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक व सार्वजनिक मंडळांची सहकार्य केले. पण यंदाच्या वर्षीसुध्दा प्रशासन श्री मूर्तीचे शहापूर खणीतच विसर्जन करण्यासाठीची तयारी करत आहेत. त्याला शहर व परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात मंडळाच्या पदाधिकार्यांची बैठक झाली. त्यामध्ये चर्चेअंती सोमवारी सकाळी 10 वाजता महापालिकेचे आयुक्त, आजी-माजी खासदार व आमदार यांना भेटून निवेदन देण्याचे ठरले. त्यासाठी शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी व सभासदांनी सोमवारी सकाळी 10 वाजता श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह चौक येथे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीस पै अमृत भोसले, मलकारी लवटे, शैलेश गोरे, अमरजित जाधव, रविंद्र लोहार, बंडू जोंग, अनिस म्हालदार, महावीर कोल्हापूरे, किशोर पाटील, सचिन माळी आदी उपस्थित होते.