महाबळेश्वर:-चेक बाऊन्सचा दणका! स्ट्रॉबेरी व्यापारी कंपनीला ३ महिन्यांची कैद; २३.३२ लाखांचा दंड भरण्याचे आदेश.
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) महाबळेश्वर:-चेक बाऊन्सचा दणका! स्ट्रॉबेरी व्यापारी कंपनीला ३ महिन्यांची कैद; २३.३२ लाखांचा दंड भरण्याचे आदेश.

महाबळेश्वर, दि. ३१ : स्ट्रॉबेरीच्या मालाचे बिल चुकते करण्यासाठी दिलेला तब्बल ₹११ लाख ६६ हजारांचा धनादेश अनादरित झाल्याप्रकरणी महाबळेश्वर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू. एस. इवरे यांनी जय गगनगिरी ॲग्रो प्रॉडक्टस् प्रा. लि. या कंपनीविरुद्ध कठोर निर्णय दिला. न्यायालयाने आरोपी कंपनीला तीन महिन्यांची साधी कैद सुनावण्यासोबतच धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट म्हणजे ₹२३ लाख ३२ हजारांचा दंड फिर्यादीस देण्याचे आदेश दिले.
फिर्यादी शशिकांत शिवराम उंबरकर यांनी जय गगनगिरी ॲग्रो प्रॉडक्टस् प्रा. लि. यांना एकूण ₹११ लाख ८८ हजार ८८० किमतीचा स्ट्रॉबेरीचा माल पुरविला होता. या व्यवहारातील देय रकमेपोटी कंपनीकडून ₹११ लाख ६६ हजारांचा धनादेश देण्यात आला होता.
मात्र, सदर धनादेश बँकेत सादर केल्यानंतर तो अनादरित (चेक बाऊन्स) झाला. त्यामुळे फिर्यादीने कायदेशीर मार्गाचा अवलंब करत आपल्या वकिलामार्फत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या कलम १३८ अंतर्गत महाबळेश्वर न्यायालयात खटला दाखल केला.
या प्रकरणाची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू. एस. इवरे यांच्या न्यायालयात झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे व उपलब्ध पुरावे विचारात घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी कंपनीस तीन महिन्यांची साधी कैद सुनावली. तसेच ₹२३ लाख ३२ हजार दंडाची रक्कम ९ टक्के व्याजदराने फिर्यादीस अदा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
फिर्यादी शशिकांत उंबरकर यांच्या वतीने ॲड. जगदीश विलासराव पाटणे (वाई) यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. लता मांजरकर, ॲड. माहेश्वरी कर्वे, ॲड. आदित्य खैरमोडे, ॲड. ओंकार एस. यादव आणि ॲड. अंजली माने यांनी सहकार्य केले.
या निकालामुळे धनादेशाद्वारे व्यवहार करून देय रक्कम न चुकविणाऱ्यांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा स्पष्ट संदेश या प्रकरणातून मिळाला आहे.
2) सातारा:-मुलींच्या सुरक्षेला आता पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’! शैला टिके-कुलकर्णींच्या धड्यांतून विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे बळ.

सातारा | दि. ३१ : मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असताना आता सातारा पोलीस दलाने ‘फक्त सुरक्षा नाही, तर स्वसंरक्षणाचे सामर्थ्य’ हा मंत्र देत थेट ॲक्शन मोड स्वीकारला आहे. जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींना संकटसमयी स्वतःचा बचाव करता यावा, यासाठी विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. भारताच्या पहिल्या महिला ॲक्शन डायरेक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शैला टिके-कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रत्यक्ष धडे दिले जाणार आहेत.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संकट ओढवल्यानंतर मदतीची वाट पाहण्याऐवजी संभाव्य धोका आधीच ओळखणे, प्रसंगावधान राखणे आणि गरज पडल्यास स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करणे, यावर प्रशिक्षणात भर दिला जाणार आहे.
धोक्याच्या वेळी घाबरायचे नाही, गोंधळायचे नाही; तर प्रसंग ओळखून योग्य प्रतिकार करायचा! अशा पद्धतीने विद्यार्थिनींची मानसिक आणि शारीरिक तयारी केली जाणार आहे. स्वसंरक्षणाच्या तंत्रांसोबतच आत्मविश्वास, धैर्य आणि निर्णयक्षमता विकसित करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
तीन दिवस, सात प्रशिक्षण सत्रे; जिल्हाभर ‘स्वसंरक्षण’चा जागर
दि. १ सप्टेंबर रोजी फलटण येथील मुधोजी हायस्कूल आणि कराड येथील एसजीएम कॉलेज येथे प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. कराड येथील महिला महाविद्यालयात दुपारी २ ते ४ या वेळेत विशेष प्रशिक्षण होणार आहे.
दि. २ सप्टेंबर रोजी सातारा येथील यशोदा अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी १०.३० ते दुपारी १२.३०, तर धनंजय गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स येथे दुपारी २ ते ४ या वेळेत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
दि. ३ सप्टेंबर रोजी वाई येथील कन्याशाळेत सकाळी १०.३० ते दुपारी १२.३०, तर फलटण येथील मुधोजी हायस्कूलमध्ये दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण होणार आहे.
मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ पोलिसांची किंवा कुटुंबाची नसून ती संपूर्ण समाजाची आहे. मात्र, सुरक्षिततेसोबत स्वतःचे संरक्षण करण्याची ताकद मुलींच्या हातात देणे, ही काळाची गरज बनली आहे. सातारा पोलिसांच्या या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये भीतीऐवजी धैर्य, असहायतेऐवजी आत्मविश्वास आणि संकटासमोर माघार घेण्याऐवजी प्रतिकाराची मानसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
‘मुलगी सुरक्षित तर समाज सुरक्षित’ या संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणाऱ्या या मोहिमेमुळे सातारा जिल्ह्यातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
3) कराड:-बांधकाम कामगारांच्या हाताला आता ‘शिवगर्जने’चा आधार!

मलकापूर | दि. ०१ : बांधकाम क्षेत्रातील कामगारांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देतानाच त्यांच्या हक्कांसाठी आणि अडचणींसाठी संघटितपणे आवाज उठविण्याच्या उद्देशाने शिवगर्जना कामगार व बांधकाम कामगार संघ आणि शिवगर्जना कन्स्ट्रक्शन या उपक्रमाचा दिमाखदार शुभारंभ मलकापूर-आगाशिवनगर परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या नव्या उपक्रमामुळे परिसरातील बांधकाम क्षेत्राला अधिक संघटित आणि सक्षम दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन मलकापूर नगरपरिषदेचे बांधकाम सभापती हणमंतराव जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक शरद पवार, नगरसेविका ज्योत्स्ना शिंदे, कृष्णा साखर कारखान्याचे संचालक संग्राम पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.
कामगारांना केवळ रोजगार मिळवून देणे नव्हे, तर त्यांच्या अडचणींच्या वेळी भक्कमपणे उभे राहणे, हा शिवगर्जना कन्स्ट्रक्शनचा प्रमुख हेतू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. बांधकाम क्षेत्रातील मनुष्यबळाला योग्य संधी, कामाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य आणि संघटित स्वरूप देण्यासाठी भविष्यात विविध उपक्रम राबविण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास भीमराव यादव, महेश वेल्हाळ, धनश्री वेल्हाळ (कराड तालुका सचिव), जयवंत पवार, मनाली पवार, राजेश घोरपडे, संतोष घोरपडे, विवेक भोसले (अनुसूचित जाती कराड शहर अध्यक्ष), सूर्यकांत खिलारे, तानाजी साठे, शरद तेरदाळ, पै. महेश भोसले, राजेंद्र ननावरे, विजया माने, काशीबाई साठे, सविता कारंडे, विशाल साठे, स्वप्नील भिसे, विशाल कांबळे, तेजस साठे, मुकुंद पन्हाळे, काकासाहेब पवार, अभिजित शिंदे, उज्वला सदाकळे (मुख्य अभियंता, MSEB कोळेवाडी) यांच्यासह शिवगर्जना संघटनेचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवगर्जना कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे आणि बांधकाम क्षेत्रातील विविध घटकांना एका संघटित व्यासपीठावर आणणे, या दिशेने काम केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करत संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे नियोजन संस्थापक अध्यक्ष विजयकुमार आबासाहेब बडेकर, सातारा जिल्हा सचिव संतोष थोरात आणि गणेश थोरात यांनी केले. उपस्थितांचे स्वागत व आभार मानताना कामगारांच्या हितासाठी सातत्याने आणि प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
शिवगर्जना कन्स्ट्रक्शनच्या शुभारंभामुळे आगाशिवनगर परिसरातील बांधकाम क्षेत्रात नव्या आशेची आणि रोजगारनिर्मितीची नांदी झाली असून, या उपक्रमाला कामगार, नागरिक आणि बांधकाम क्षेत्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.




