फलटण:-राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व निपुण भारत अभियानाला माता-पालकांच्या सहभागाची जोड पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानासाठी पालकांचा सक्रिय सहभाग आवश्यक — शिक्षणतज्ज्ञ अनिलकुमार कदम.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

फलटण:-राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व निपुण भारत अभियानाला माता-पालकांच्या सहभागाची जोड पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानासाठी पालकांचा सक्रिय सहभाग आवश्यक — शिक्षणतज्ज्ञ अनिलकुमार कदम.

फलटण : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि केंद्र शासनाच्या ‘निपुण भारत’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करण्यासाठी माता-पालकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख व मुक्त पत्रकार श्री. अनिलकुमार बुवासाहेब कदम यांनी व्यक्त केले.
नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’ हा उपक्रम केवळ औपचारिक पालक बैठकीपुरता मर्यादित न ठेवता शाळा आणि कुटुंब यांच्यातील प्रभावी संवादाचे माध्यम म्हणून राबविण्याची गरज असल्याचे कदम यांनी आपल्या समाजप्रबोधनपर शैक्षणिक लेखातून स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शाळेबरोबरच कुटुंबाची भूमिका महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, नियमित उपस्थिती, वाचन-लेखनाची सवय आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शाळा व माता-पालक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि ‘निपुण भारत’ अभियानांतर्गत बालकांच्या सुरुवातीच्या शैक्षणिक टप्प्यात वयानुरूप वाचन, लेखन आणि गणितीय कौशल्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान ही पुढील शिक्षणाची भक्कम पायाभरणी असल्याने घरातील वातावरणही त्यासाठी पोषक असणे आवश्यक आहे.
पालकांना विविध विषयांवर मार्गदर्शन
माता-पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, मूल्यमापन पद्धती, परीक्षा वेळापत्रक, वाचन संस्कृती, घरातील अभ्यासाचे वातावरण, उपस्थिती, वर्तन, अध्ययनातील अडचणी, आरोग्य, पोषण, स्वच्छता, सुरक्षितता, बालहक्क व बालसंरक्षण याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, नवीन अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके, विविध विद्यार्थी लाभ योजना, डिजिटल शिक्षण आणि शाळेतील विविध उपक्रमांची माहिती पालकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे कदम यांनी सांगितले.
वर्षातून चार वेळा मेळावा
माता-पालक शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन प्रत्येक शैक्षणिक वर्षात जुलै, ऑक्टोबर, जानेवारी आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या शनिवारी करण्याचे नियोजन असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे.
या उपक्रमाची प्राथमिक जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीची राहणार असून, स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हा शिक्षण विभागाने अंमलबजावणीचे नियोजन करावे, असेही सूचित करण्यात आले आहे.
नकारात्मक चर्चेपेक्षा सकारात्मक संवादावर भर
मातांना केवळ औपचारिक निमंत्रण न देता वैयक्तिक संपर्क, दूरध्वनी किंवा प्रत्यक्ष भेटीद्वारे मेळाव्यात सहभागी करून घ्यावे. संवादाची भाषा साधी, सोपी आणि स्थानिक बोलीशी सुसंगत असावी. विद्यार्थ्यांच्या कमतरतांवर नकारात्मक चर्चा करण्याऐवजी त्यांच्या चांगल्या गुणांना प्रोत्साहन देऊन खेळत-खेळत अभ्यास कसा करून घ्यावा, याबाबत पालकांना मार्गदर्शन करावे, असे कदम यांनी म्हटले आहे.
पालकांनी दररोज किमान २० मिनिटे मुलांसोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवून त्यांच्या अभ्यास, वाचन, गोष्टींची पुस्तके, गृहपाठ, आरोग्यदायी सवयी तसेच आवडत्या व अवघड विषयांबाबत संवाद साधावा, असेही त्यांनी सुचविले.
माता-पालक गटांचा सक्रिय सहभाग आवश्यक
‘निपुण महाराष्ट्र’ अभियानांतर्गत कार्यरत माता-पालक गटांचा मेळाव्यात सक्रिय सहभाग घेऊन इतर पालकांनाही या गटांशी जोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि गणितीय क्रिया खेळ, कृती व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शिकविण्यावर भर देण्यात यावा.
मेळाव्यानंतर मातांची उपस्थिती, प्रमुख चर्चा, छायाचित्रे, ठरविण्यात आलेले संकल्प व कृती यांची पद्धतशीर नोंद ठेवून त्यानुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक कार्यवाही करावी. स्थानिक गरजांनुसार या सूचनांचा शाळा विकास आराखड्यात समावेश करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
“मुलांच्या शिक्षणाची खरी पायाभरणी घरातून आणि तिचे बळकटीकरण शाळेतून होते. त्यामुळे माता-पालकांचा सक्रिय सहभाग मिळाल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण, गुणवत्तापूर्ण आणि मूल्याधिष्ठित विकास अधिक प्रभावीपणे साधता येईल,” असा विश्वास शिक्षणतज्ज्ञ अनिलकुमार बुवासाहेब कदम यांनी व्यक्त केला.
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना आवश्यक सूचना देऊन जास्तीत जास्त मातांचा सहभाग सुनिश्चित करावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.




