भुईंज:-15 मोबाईल मूळ मालकांना परत; नशामुक्ती रॅली व वृक्षलागवडीसह विविध उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन साजरा.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

भुईंज दि.15
15 मोबाईल मूळ मालकांना परत; नशामुक्ती रॅली व वृक्षलागवडीसह विविध उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन साजरा.

भुईंज पोलीस ठाण्याच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन.
भुईंज, दि. १५ ऑगस्ट २०२६ : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन भुईंज पोलीस ठाण्याच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध जनजागृतीपर व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती पूनम झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, भुईंज तसेच आपुलकी विशेष मुलांची शाळा, पाचवड येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, वाहतूक नियम, चांगली वर्तणूक, गुड टच-बॅड टच तसेच व्यसनांपासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत अमली पदार्थ व विविध व्यसनांचे होणारे दुष्परिणाम समजावून सांगत विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यानंतर भुईंज व पाचवड येथे ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. व्यसनमुक्त समाज, निरोगी युवा पिढी आणि सामाजिक जागृतीचा संदेश देत रॅलीद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी भुईंज पोलीस ठाण्याच्या आवारात १५ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन व सामाजिक जबाबदारी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
तसेच नागरिकांचे हरविलेले मोबाईल फोन शोधून ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्याचा उपक्रमही यावेळी घेण्यात आला. तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन गहाळ नोंद असलेले सुमारे १५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले होते. सदर मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. हरविलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी भुईंज पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या विविध उपक्रमांतून ‘नशामुक्त समाज, सुरक्षित समाज, सायबर सुरक्षितता आणि पर्यावरण संवर्धन’ यांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक आकाश मोरे तसेच भुईंज पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.





