वाई:-विद्यार्थ्यांनी सेवाभाव अंगिकारावा : मा.भरत जाधव
पत्रकार रेखा येवले सातारा जिल्हा महिला कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-विद्यार्थ्यांनी सेवाभाव अंगिकारावा : मा.भरत जाधव

वाई: दि. ०५ ऑगस्ट २०२६
सौंदर्य, संपत्ती, प्रतिष्ठा या गोष्टी संपणा-या आहेत. व्यसनामुळेतर माणसाचे जीवन बरबाद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नशेपासून दूर राहून, सेवाभाव अंगिकारावा असे प्रतिपादन सातारा गुप्तचर विभागातील पोलिस भरत जाधव यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण समिती, राष्ट्रीय छात्र सेना व भारत विकास परिषद, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्यसनमुक्ती व संस्कारक्षम जीवन’ या विषयावरील व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा(डॉ.) विनोद वीर, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष अरविंद बोपर्डीकर, खजिनदार अविनाश जोशी, सदस्य अरुण देव, एन. सी.सी.चे समन्वयक मेजर डॉ. समीर पवार, विद्यार्थी कल्याण समितीचे समन्वयक डॉ. संग्राम थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
भरत जाधव म्हणाले, निसर्ग चिरंतन आहे. आपण निसर्गाचे मालक नसून, सेवक आहोत. महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे. त्यांनी समाजासाठी आयुष्य खर्च केले. आपल्या जीवनाला योग्य दिशा नसेल तर आयुष्याची दुर्दशा होते. संस्कारी जीवन जगून आयुष्याचा आनंद घेता येतो. त्यामुळे शरीरावर प्रेम करा व व्यसनापासून दूर राहा असा संदेश त्यांनी दिला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, तरुणांना दिशा देणे आणि त्यांचे करिअर घडवण्यासाठी आमचे महाविद्यालय कटिबद्ध आहे. आपण जे पेरतो तेच उगवते हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या मनात आत्ताच चांगले विचार पेरावेत, म्हणजे स्वतःचे आचार विचार शुद्ध होतील.
कार्यक्रमात उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संग्राम थोरात यांनी केले. पाहुण्यांची ओळख मेजर डॉ. समीर पवार यांनी करून दिली. दीपाली चव्हाण यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन मनीषा भोसले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, डॉ. संदीप वाटेगावकर, राहुल तायडे, राजेंद्र जायकर, जितेंद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र व विद्यार्थी उपस्थित होते.




