वाई:-कोंडी, अतिक्रमण अन् अस्वच्छतेला अखेर पूर्णविराम! वाईच्या महात्मा फुले भाजी मंडईच्या कायापालटाचा श्रीगणेशा.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-कोंडी, अतिक्रमण अन् अस्वच्छतेला अखेर पूर्णविराम! वाईच्या महात्मा फुले भाजी मंडईच्या कायापालटाचा श्रीगणेशा.

सातारा | वाई, दि. ०५ :
वाई शहराच्या मध्यवर्ती भागातील महात्मा फुले भाजी मंडईचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला कायापालट अखेर प्रत्यक्षात सुरू झाला आहे. तब्बल ५८ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन बुधवारी उत्साहात पार पडताच व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांच्या अपेक्षांना नवी दिशा मिळाली. या प्रकल्पामुळे मंडईला आधुनिक स्वरूप प्राप्त होणार असून, वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि अस्वच्छतेच्या जुन्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची चिन्हे आहेत.
आजवर जागेअभावी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या अनेक विक्रेत्यांना नव्या आराखड्यानुसार ३०० ते ३२५ व्यापाऱ्यांसाठी नियोजनबद्ध व आधुनिक सुविधा असलेली हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा व्यवसाय अधिक सुकर होईल, तर ग्राहकांना स्वच्छ, सुरक्षित आणि प्रशस्त बाजारपेठेचा अनुभव मिळणार आहे.
या विकासकामांत मंडईचे संपूर्ण नूतनीकरण, सिमेंट काँक्रीटीकरण, आधुनिक शेड, नवीन गाळे, कट्टे, लोखंडी संरक्षक जाळ्या, सुशोभीकरण तसेच आवश्यक नागरी सुविधा उभारल्या जाणार आहेत. रस्ते अनुदान योजनेतून मंजूर झालेल्या निधीमुळे हा बहुप्रतिक्षित प्रकल्प प्रत्यक्षात साकार होत आहे.
पर्यटननगरी वाईमध्ये मंडई परिसरातील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण ही मोठी समस्या ठरली होती. नव्या नियोजनामुळे रस्ते मोकळे होऊन रिक्षा, दुचाकी, चारचाकी तसेच आपत्कालीन सेवांच्या वाहनांना अखंडित मार्ग उपलब्ध होणार आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
याचबरोबर स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनालाही प्राधान्य देण्यात आले असून, दुर्गंधीमुक्त आणि आरोग्यदायी वातावरणात भाजी विक्रीसाठी आवश्यक सुविधा उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे महात्मा फुले भाजी मंडईचा चेहरामोहराच बदलणार आहे.
महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे, विधान परिषद सदस्य धैर्यशील कदम, लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या सहकार्याने आणि नगरपरिषदेतील सर्व लोकप्रतिनिधींच्या पाठबळामुळे हा प्रकल्प मार्गी लागला.
व्यापाऱ्यांचा व्यवसाय विस्कळीत होऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याने स्थलांतराचे नियोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी व्यापाऱ्यांना विकासकामात सहकार्य करण्याचे आवाहन केले, तर भाजप शहराध्यक्ष विजय ढेकणे यांनी शहर विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची भूमिका स्पष्ट केली. गोविंद इथापे, संतोष जमदाडे आणि आरोग्य सभापती केतकी पाटणे-मोरे यांनी हा प्रकल्प वाईच्या विकासातील मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
भुयारी गटार योजना, नदी संवर्धन, हद्दवाढ आणि वाहतूक सुधारणा यांसारखे महत्त्वाचे प्रकल्पही मार्गी लागत असल्याने ‘स्मार्ट, स्वच्छ आणि सुबक वाई’च्या उभारणीची ठोस सुरुवात झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.




