श्रीरामपूर:-“प्रधान जिल्हा न्यायाधीशांचा अपमान की कर्मचाऱ्यांची अक्षम्य चूक?” शनिशिंगणापूर देवस्थानात खळबळ; बेलिफ व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“प्रधान जिल्हा न्यायाधीशांचा अपमान की कर्मचाऱ्यांची अक्षम्य चूक?”
शनिशिंगणापूर देवस्थानात खळबळ; बेलिफ व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस.

अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांना दिले जाणार विशेष प्रशिक्षण – कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे
श्रीरामपूर / माळेवाडी ( प्रतिनिधी )
शनिशिंगणापूर देवस्थान येथे शनिवारी (दि.२३) घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश शिवाजी कचरे यांना देवस्थानाच्या व्हीआयपी गेटवर तब्बल पंधरा मिनिटे थांबवून ठेवण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे.
विशेष म्हणजे, न्यायाधीश ज्या शासकीय वाहनातून आले होते त्या वाहनावर “जिल्हा प्रधान न्यायाधीश” अशी ठळक अक्षरांत ओळख असतानाही संबंधित कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहत वाहन अडवून उभे राहिले. या प्रकारामुळे देवस्थान प्रशासनावर सर्व स्तरांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या घटनेबाबत देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिलगिरी व्यक्त करत सांगितले की, “हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून संबंधित बेलिफ आणि काही कर्मचाऱ्यांना लवकरच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. बदललेल्या बेलिफमुळे आणि काही कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या प्रशिक्षणामुळे हा प्रकार घडला. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल.”
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव देवस्थानाचे दोन नंबर गेट वरिष्ठांच्या आदेशानुसार बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रश्न असा उपस्थित होत आहे की, प्रधान जिल्हा न्यायाधीशांचे अधिकृत वाहन समोर उभे असताना देखील त्यांना अडवून ठेवण्याचे धाडस कर्मचाऱ्यांनी केलेच कसे?
संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नसणे एकवेळ समजू शकते; परंतु वाहनावरील स्पष्ट शासकीय ओळख वाचूनही त्यांनी न्यायाधीशांना रोखण्याचा निर्णय घेतला, यावरून प्रशासनातील निष्काळजीपणा आणि समन्वयाचा अभाव अधोरेखित होत असल्याची चर्चा सुरू आहे.
विश्वासू सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, न्यायाधीश शिवाजी कचरे यांच्या स्वागतासाठी देवस्थान प्रशासनाने विशेष सत्काराची तयारी केली होती. शनिशिंगणापूर येथे येणाऱ्या मान्यवर शनिभक्तांचा शनि मूर्ती, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार न्यायाधीशांचाही सत्कार आयोजित करण्यात आला होता.
मात्र, अपमानास्पद वागणुकीमुळे संतप्त झालेल्या न्यायाधीशांनी काही कर्मचाऱ्यांनी केलेली समजूत व सत्कार स्वीकारण्याची विनंती स्पष्ट शब्दांत नाकारली. “झाला तेवढा अपमान पुरेसा आहे,” असे सांगत त्यांनी सहकुटुंब शनिदेवाचे मनोभावे दर्शन घेतले; मात्र देवस्थानाचा सत्कार स्वीकारला नाही.
या घटनेमुळे देवस्थान प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन करताना सामान्य शासकीय शिष्टाचार आणि संवेदनशीलता का हरवली, याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.




