सातारा:-(वाई)-गोवंश तस्करांवर ‘मोक्का’ लावा; संशयित पोलिसांचीही चौकशी करा — गोरक्षा समितीची मागणी.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

गोवंश तस्करांवर ‘मोक्का’ लावा; संशयित पोलिसांचीही चौकशी करा — गोरक्षा समितीची मागणी.

सातारा |
वाई दि. २४ : जिल्ह्यात प्राणी कल्याण कायदा आणि गोवंश संरक्षण कायद्याचे वारंवार उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप करत आद्यगोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा समितीने सातारा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर केले आहे. गोवंश तस्करीत सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, तसेच संबंधित प्रकरणांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी समितीचे जिल्हाध्यक्ष ओम विजय शेरकर यांनी केली आहे.
समितीने निवेदनात काही गंभीर दावे करत पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. फलटण येथील काही गोहत्या प्रकरणातील तडीपार गुन्हेगार शहरात खुलेआम वावरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच वसीम रफिक कुरेशी आणि बिलाल रफिक कुरेशी यांच्यावर विविध गुन्हे दाखल असूनही ते अद्याप मोकाट फिरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गोरक्षा समितीने काही विशिष्ट भागांतील संशयित गुन्हेगारांची यादीही पोलिसांना सादर केली असून, त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका ) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“गो तस्करी करणारी वाहने न्यायालयाच्या आदेशाशिवाय पोलीस ठाण्याच्या स्तरावरच सोडली जात आहेत. तसेच या वाहनांबाबतचा अहवाल न्यायालय व परिवहन विभागाला सादर केला जात नाही,” असा आरोप समितीने निवेदनात केला आहे. त्यामुळे या व्यवहारात काही पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे साटेलोटे आहे का, असा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे.
यावेळी मानद प्राणी कल्याण अधिकारी अंकुश गोडसे, वैभव जाधव, अवधूत धुमाळ, ॲड. ऋषिकेश सकुंडे, अथर्व पाटील, सिद्धार्थ लाखे, अभय शिंदे, मनोज सासणे, हितेन केंडे, अक्षय शेलार तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.




