वाई:-जिवंतपणी माणसांशी प्रेमाने वागा; मृत्यूनंतर श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून काय उपयोग?
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-जिवंतपणी माणसांशी प्रेमाने वागा; मृत्यूनंतर श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून काय उपयोग?

वाई वसंत व्याख्यानमालेत प्रा. डॉ. विनोद बाबर यांचे हृदयस्पर्शी प्रतिपादन; ‘जगलात तरच आयुष्य सुंदर आहे’ विषयावर व्याख्यान
सातारा |
वाई दि. २४ : “आज मोबाईल आणि सोशल मीडियामुळे माणूस स्वतःपासून आणि कुटुंबापासून दूर चालला आहे. जिवंतपणी माणसांशी प्रेमाने वागा. व्यक्ती गेल्यानंतर श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून ती परत येत नाही. चांगल्या संगतीमुळे आयुष्य घडते, तर वाईट सल्ल्यामुळे शंभर कौरवांचा नाश होतो. शरीर हीच आपली सर्वात मोठी संपत्ती असून, मिळालेला प्रत्येक क्षण मनापासून जगायला शिका,” असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. विनोद बाबर यांनी येथे केले.
वाई वसंत व्याख्यानमालेच्या बाराव्या पुष्पात “जगलात तरच आयुष्य सुंदर आहे” या विषयावर डॉ. बाबर यांचे वास्तववादी आणि हृदयस्पर्शी व्याख्यान पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे होत्या.
प्रा. डॉ. विनोद बाबर पुढे म्हणाले की, जगात प्रत्येकाला चोवीस तासांचाच वेळ मिळाला आहे. ज्ञानेश्वर माऊलींना २१ वर्षे, तर छत्रपती शिवाजी महाराजांना ५० वर्षांचे आयुष्य लाभले; मात्र शेकडो वर्षांनंतरही आपण त्यांना विसरू शकलेलो नाही. पैसा, मालमत्ता परत मिळू शकते; पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. त्यामुळे वेळेचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे.
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि सततच्या नोटिफिकेशन्समुळे आज माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. प्रत्येक गोष्ट स्टेटसवर टाकून आनंदाचे प्रदर्शन करण्याची घाई लोकांना झाली आहे. “मोबाईलशिवाय मुलं जेवत नाहीत,” हे पालकांनी कौतुकाने सांगणे ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. आज वस्तूंचा वापर करण्याऐवजी माणसांचा वापर आणि माणसांवर प्रेम करण्याऐवजी वस्तूंवर प्रेम केले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
आज लहान वयातच मुलांवर स्पर्धा आणि यशाचे ओझे टाकले जात आहे. पालकांनी मुलांचे मित्र व्हावे, पण शिस्त विसरू नये. मुलांना संपत्तीपेक्षा संस्कार देणे गरजेचे आहे; कारण संस्कार असतील तर मुले शून्यातूनही विश्व उभे करू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
मानसिक ताणतणावामुळे तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. “आपण घरातील घाण लगेच साफ करतो; पण मनातील नकारात्मकतेचा कचरा मात्र साठवून ठेवतो,” असे सांगत त्यांनी सकारात्मक विचारांची गरज अधोरेखित केली. सोशल मीडियावर हजारो मित्र असले, तरी संकटात धावून येणारे फार कमी असतात. आज नात्यांची अवस्था फाटलेल्या कपड्यांसारखी झाली असून ती रफू करून टिकवण्याऐवजी लगेच तोडली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
“फुटाणे मंदिरात गेले की ‘प्रसाद’ होतात आणि बारमध्ये गेले की ‘चकणा’ होतात! माणसाची संगत त्याला घडवते किंवा बिघडवते. सल्लागार जर शकुनीसारखा असेल तर शंभरातला एकही वाचत नाही, आणि जर श्रीकृष्णासारखा असेल तर पाचातल्या एकालाही धक्का लागत नाही,” असे सांगत डॉ. बाबर यांनी नातेसंबंध आणि मित्र निवडताना सजग राहण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित वाडकर यांनी केले, तर प्रमुख वक्त्यांचा परिचय श्रीमती मंगला अहिवळे यांनी करून दिला. याप्रसंगी व्याख्यानमालेचे प्रायोजक ‘उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था’ आणि ‘मालाज फूड्स प्रॉडक्ट्स’ यांचा सत्कार प्रा. डॉ. विनोद बाबर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार सौ. गायत्री पटवर्धन यांनी मानले. या व्याख्यानाला वाईतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.




