वाई:-संतांच्या शाही दरबाराने वाई नगरी पावन; लघुकुंभमेळ्याच्या उद्घाटनाने भक्तीचा जल्लोष ‘दक्षिण काशी’च्या लघुकुंभ मेळ्याची महती आता राज्यभर पोहोचणार; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा विश्वास.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

संतांच्या शाही दरबाराने वाई नगरी पावन; लघुकुंभमेळ्याच्या उद्घाटनाने भक्तीचा जल्लोष
‘दक्षिण काशी’च्या लघुकुंभ मेळ्याची महती आता राज्यभर पोहोचणार; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा विश्वास

सातारा प्रतिनिधी |
वाई दि. २२ : कृष्णामाईच्या पवित्र तीरावर वसलेल्या ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वारसा लाभलेल्या वाई नगरीत लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ अत्यंत दिमाखदार, भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. “दक्षिण काशी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुण्यभूमीत भरलेल्या लघुकुंभमेळ्यामुळे वाईची आध्यात्मिक ओळख संपूर्ण महाराष्ट्रात अधिक ठळकपणे पोहोचणार आहे, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते फीत कापून तसेच भगवान शंकर आणि महागणपतीच्या प्रतिमांचे विधीवत पूजन करून लघुकुंभमेळ्याचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी गुजरातसह देशभरातून आलेल्या दीडशेहून अधिक साधू-महंतांनी उपस्थिती लावत वाईच्या धार्मिक वातावरणात अधिक भर घातली. सकाळपासूनच साधुसंतांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

उद्घाटनप्रसंगी बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देशभरातून कोट्यवधी भाविक महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासन सर्व आवश्यक सुविधा आणि पायाभूत व्यवस्था उभारण्यासाठी कटिबद्ध असून, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार नाशिक कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी कोणतीही कमतरता भासू देणार नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले.
तसेच, या भव्य आयोजनासाठी नगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक, नगरसेविका, स्थानिक कार्यकर्ते आणि साधुसंत यांनी घेतलेल्या परिश्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले. “त्यांच्या अथक मेहनतीमुळेच हा भव्य सोहळा यशस्वी होत आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी गुजरात अटल धामचे परमपूज्य महंत महादेवगिरीजी महाराज म्हणाले, “अशा धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढते आणि हिंदुत्ववादी विचारांना बळ मिळते. या कुंभमेळ्याच्या पवित्र ऊर्जेमुळे वाई तालुका सुजलाम-सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही.”
कार्यक्रमादरम्यान मुख्य आखाड्याच्या वतीने मंत्री जयकुमार गोरे आणि नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर वाई नगरीच्या वतीने आलेल्या सर्व साधुसंतांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
या सोहळ्यास गुजरातहून आलेले योगेन्द्र्गिरी महाराज, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, उपनगराध्यक्ष घनशाम चक्के, विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे, प्रदेश उपाध्यक्ष सचिन घाटगे, तालुका अध्यक्ष दीपक ननावरे, मंदीर महासंघ तालुकाध्यक्ष श्रीधर भाडळकर, कृष्णा नदी सेवा समितीचे सदस्य काशिनाथ शेलार, दीप्ती पिसाळ, जितेंद्र पिसाळ, सचिन सावंत, निलेश मोरे यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी, स्वयंसेवक आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, सायंकाळी सातच्या सुमारास झालेली कृष्णामाईची भव्य महाआरती हा उद्घाटन सोहळ्याचा मुख्य आकर्षणबिंदू ठरला. मंत्रोच्चार, शंखनाद आणि दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण कृष्णाकाठ भक्तीमय वातावरणाने उजळून निघाला होता. नदीचे दोन्ही तीर भाविकांच्या अथांग गर्दीने फुलून गेले होते.
महाआरतीनंतर देशभरातून आलेल्या महंत, साधू, संत आणि नागा सन्यासी यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले.
लाखोंच्या गर्दीची शक्यता लक्षात घेऊन लघुकुंभमेळा सेवा समिती आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख नियोजन व कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता उद्घाटनाचा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.




