वाई:-प्रतापराव भोसले भाऊ कृतिशील राजकारणी – मा.उल्हासदादा पवार
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई: दि. १९
प्रतापराव भोसले भाऊ कृतिशील राजकारणी – मा.उल्हासदादा पवार

प्रतापराव भाऊंकडे वैचारिक प्रगल्भता, संघटन कौशल्य, अपार बुध्दीमत्ता आणि सामाजिक आवाका होता, त्यामुळेच ते महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात कृतिशील राजकारणी म्हणून ओळखले जात होते. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी विधानपरिषद सदस्य उल्हासदादा पवार यांनी केले.
येथील किसन वीर महाविद्यालयात जनता शिक्षण संस्थेचे विश्वस्त तथा माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (भाऊ) यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त अनिल जोशी लिखित “ज्येष्ठ स्नेही प्रतापराव (भाऊ)” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले, संचालक केशवराव पाडळे, उदयभाई गुजर, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार नारायण चौधरी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, मोहनआबा भोसले, गजानन भोसले व भोसले परिवारातील सर्व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा. उल्हासदादा पवार म्हणाले, प्रतापराव भाऊंना राज्यातील लोक अजूनही विसरलेले नाहीत. जनता ज्या माणसाची स्मृती स्मरणात ठेवते फक्त त्यांचेच पुन:पुन्हा स्मरण होते. भाऊ त्यांपैकीच एक आहेत. यशवंतराव चव्हाण साहेबांनी “राजकारणी सर्वस्पर्शी असावा” असे म्हटले होते, साहेबांचे हे वाक्य प्रतापराव भाऊंना तंतोतंत लागू पडते हे मी भाऊंच्या सहवासातून अनुभवले आहे. एखादे काम मनापासून व झोकून देऊन करणे ही त्यांची पद्धत होती. भाऊ निष्ठावंत शेतकरी होते, त्यामुळे त्यांना ग्रामविकासाचा चांगला अभ्यास होता. त्यांचे सामान्य लोकांपासून विधिज्ञांपर्यंत संबंध होते. त्यामुळेच ते संसदीय शेती समितीचे अध्यक्ष झाले. भाऊंनी समाजाचे पालकत्व केले हे आजच्या पिढीला अनुकरणीय आहे. नव्या पिढीला हे पुस्तक दिशादर्शक ठरेल असे मला वाटते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांचे खरे वारसदार प्रतापराव भाऊच होते. त्यांचे शिक्षण मातीच्या विद्यापीठातील होते. शेतीपासून गझलपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास थक्क करणारा होता. त्यांच्यावर मातीचा, मातेचा, संतांचा, अध्यात्माचा आणि माणुसकीचा संस्कार होता. म्हणूनच त्यांची पुढची पिढी त्यांच्या मार्गावर चालताना दिसते. भाऊ आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हितासाठी झटले. हे पुस्तक वाचताना मला वाटले, हरवत चाललेली राजकीय संस्कृती पाहिल्यावर अशा पुस्तकांची समाजाला गरज भासते. लेखक अनिल जोशी यांनी मित्रत्वाच्या नात्यातून हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे शाळा महाविद्यालयांतून वाचन व्हायला हवे.
पुस्तक लेखनामागील भूमिका मांडताना लेखक अनिल जोशी म्हणाले, यशवंतराव चव्हाण, किसन वीर (आबा) आणि प्रतापराव भोसले भाऊ यांनी कार्यकर्त्यांना मोठे केले. हे पुस्तक म्हणजे ५० वर्षांचा राजकीय इतिहास आहे. भाऊंचे मूल्याधिष्ठित जीवन मातीशी इमान राखणारे होते. भाऊंच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मी हे पुस्तक लिहिले आहे.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस भाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ॲङ प्रताप देशमुख यांनी प्रास्ताविक केले. प्रा. रमेश डुबल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी आभार मानले. गणेश चव्हाण व डॉ. धनंजय निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास चंदरआण्णा मांढरे, शंकरआबा गाढवे, साहेबराव महांगरे, नारायणबापू पवार, डॅडी वाघ, विजयराव वाघ, जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, पंचायत समिती सदस्य डॉ. सुरभि भोसले, सचिन भोसले, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य भैय्यासाहेब जाधवराव, वाई नगरपालिकेतील विरोधीपक्ष नेते विजय ढेकाणे, नगरसेवक प्रसाद बनकर, सचिन सावंत, नगसेविका अपर्णा जमदाडे, पद्मा जाधव-पाडळे, नूतन मालुसरे, डॉ. जागृती पोरे, केतकी मोरे-पाटणे व भाऊंवर प्रेम करणारे तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व शेतकरी, पत्रकार, महाविद्यालयातील आजी-माजी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.




