“वाईत ‘मृत्यूचा रस्ता’! धुळीचे ढग, खड्ड्यांचा कहर; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिक संतप्त”
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) “वाईत ‘मृत्यूचा रस्ता’! धुळीचे ढग, खड्ड्यांचा कहर; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिक संतप्त”

सातारा प्रतिनिधी सारिका गवते
बावधन नाका–मिशन हॉस्पिटल मार्गावर अपघातांची मालिका; ठेकेदाराचा दिखाऊ कारभार, कारवाईची जोरदार मागणी.
वाई : वाई शहरातील बावधन नाका ते मिशन हॉस्पिटल रिक्षा स्टँड दरम्यानचा रस्ता सध्या अक्षरशः “मृत्यूचा सापळा” ठरला असून, प्रशासनाच्या ढिसाळ व निष्काळजी कारभारामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे संतापजनक वास्तव समोर आले आहे.
या मार्गावर प्रचंड खड्डे, उडणारी धूळ आणि निकृष्ट दर्जाची दुरुस्ती यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. ठेकेदाराने खड्डे बुजवण्यासाठी बारिक खडी आणि कच टाकून केवळ दिखाऊ काम केल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. योग्य तांत्रिक पद्धतीने काम न झाल्यामुळे वाहन जाताच धुळीचे प्रचंड लोट उडत असून, परिसर अक्षरशः धुरकट बनत आहे.
दरम्यान, रिक्षाचालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धाव घेतली असता, संबंधित रस्ता एमएसआरडीसीच्या अखत्यारीत असल्याचे सांगत जबाबदारी झटकण्यात आली. त्यानंतर काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, मात्र केवळ फोटो काढून आणि काही मिनिटे झाडू मारल्याचा आव आणत त्यांनी काढता पाय घेतल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे प्रशासन नागरिकांच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

या रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या रिक्षाचालकांना दिवसभर धुळीचा मारा सहन करावा लागत असून, अनेकांना श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत. सैल खडीमुळे घसरून चार ते पाच दुचाकी अपघात घडले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. काहींना गंभीर दुखापतीही झाल्या आहेत.
विशेष म्हणजे, याच मार्गावर असलेल्या मिशन हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना, वयोवृद्धांना आणि लहान मुलांना या धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालय परिसरातही धुळीचे ढग निर्माण होत असल्याने परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे.
संतप्त नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, या निष्काळजीपणामुळे एखाद्याचा जीव गेल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. “आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
स्थानिक रिक्षाचालक संघटनेने प्रशासनाला अंतिम इशारा देत, संबंधित ठेकेदाराने तात्काळ दर्जेदार दुरुस्ती करावी, अन्यथा आठ दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
एकूणच, वाई शहरातील हा रस्ता सध्या नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असून, प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांना प्रशासनालाच जबाबदार धरले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
चौकट : जनतेचा थेट सवाल
वाई शहरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “सातारा जिल्ह्याला चार मंत्री आणि दोन खासदार असूनही विकासाचा अभाव का?”
स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी धडपड करणाऱ्या नेत्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या वेदना समजून घ्याव्यात, अशी तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
2) वाई:-“जललक्ष्मीचा विस्तार झाला तर वाईची तहान संपणार! ३०% भाग सिंचनाखाली आणण्याचा गायकवाडांचा निर्धार”
आकोशी ते अभेपुरी मार्गे पूर्व भागापर्यंत योजना नेण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा; शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार
वाई : वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील पाणीटंचाई आणि शेतीच्या गंभीर प्रश्नावर मोठा दिलासा देणारी जललक्ष्मी सिंचन योजना आता विस्ताराच्या उंबरठ्यावर येण्याची चिन्हे दिसत आहेत.
यासाठी ठोस प्रयत्न करण्याचा निर्धार यशवंत नगर गणाचे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य स्वप्निल गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
पश्चिम भागाची जीवनवाहिनी मानली जाणारी ही योजना बलकवडी धरणातून सायफन पद्धतीने पाईपलाईनद्वारे पसरणी व आकोशीपर्यंत कार्यरत आहे. मात्र, काही ठिकाणी अपूर्ण व तोडक्या अवस्थेत असली तरी ती सुरू आहे.
सध्या योजना आकोशीपर्यंतच मर्यादित असली, तरी आकोशी–जांभळी–अभेपुरी मार्गे पूर्व भागातील वेळे गावापर्यंत विस्तार केल्यास वाई तालुक्याच्या सुमारे ३०% भागाला सिंचनाचा मोठा फायदा होऊ शकतो, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
धरणाच्या कुशीत असलेल्या गावांमध्येही पाण्याचा प्रश्न तीव्र आहे. अनेक शेतकरी अजूनही हंगामी शेतीवर अवलंबून असून, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठीही मोठा संघर्ष करावा लागतो.
योजनेचा विस्तार झाल्यास केवळ शेतीच नव्हे, तर पाणीपुरवठा योजनांनाही मोठा आधार मिळणार असून, पश्चिम व पूर्व भागातील दुष्काळी स्थिती बदलण्याची ताकद या योजनेत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या योजनेसाठी प्रशासनाशी समन्वय साधत आकोशीपासून पुढे जांभळी व अभेपुरीपर्यंत टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.




