वाई:-“शेतकरी संतापला, शिवसेना पेटली; वाईत महावितरणवर हल्लाबोल!”
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“शेतकरी संतापला, शिवसेना पेटली; वाईत महावितरणवर हल्लाबोल!”

सातारा प्रतिनिधी सारिका गवते
वाई, दि. २५ : वाई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीज समस्येने अखेर संतापाचा कळस गाठला असून, शिवसेना (उबाठा) वाई तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर आज (मंगळवारी) जोरदार हल्लाबोल करत प्रशासनाला ठणकावण्यात आले. शेतीपंपासाठी दिवसा अखंड वीजपुरवठा आणि ओव्हरलोडमुळे वारंवार जळणारे ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
तालुक्यात अनेक ठिकाणी ६३ केव्ही क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर असतानाही प्रत्यक्षात त्यावर १०० केव्हीपेक्षा अधिक भार टाकला जात आहे. परिणामी, ट्रान्सफॉर्मर वारंवार जळणे, बिघाड होणे या प्रकारात मोठी वाढ झाली असून, ऐन हंगामात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
रात्रीच्या वेळी होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतीकाम करावे लागत असून, वन्यप्राण्यांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरण प्रशासनाला धारेवर धरले.
दिवसा सलग वीजपुरवठा, ६३ केव्ही ट्रान्सफॉर्मरऐवजी १०० केव्ही किंवा त्याहून अधिक क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवणे, तसेच नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्त करणे या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी तालुकाप्रमुख दत्ताबापू इथापे यांनी इशारा देताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शेतकरी आधीच संकटात सापडलेला आहे. महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे त्याला रात्री-अपरात्री शेतात जावे लागत आहे. ओव्हरलोडमुळे ट्रान्सफॉर्मर वारंवार बंद पडत आहेत. ही परिस्थिती तातडीने सुधारली नाही, तर तीव्र आंदोलन उभारले जाईल.”
या वेळी हणमंतराव वाघ, विजय बडे, अरुण सावंत, संतोष सकुंडे, तुळशीदास पिसाळ यांच्यासह शेतकरी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आगामी काळात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.




