सातारा:-पोलीस पाटलांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची शेतकरी संघटनेची मागणी.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) सातारा:-पोलीस पाटलांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची शेतकरी संघटनेची मागणी.
सातारा प्रतिनिधी अजित जगताप
स्वच्छ व पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त काम पोलीस पाटलांच्याकडून होताना दिसत नाही, तरी त्यांना अटी शर्ती व नियम घालून देण्यात याव्यात, व त्यांचे हजेरीपत्रक व हालचाल रजिस्टर ठेवणे सक्तीचे करण्यात यावी . तसेच पोलीस पाटलांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेतकरी संघटनेने केल्याने खळबळ माजली आहे.
सातारा जिल्ह्यातील महसुली गावात पोलीस पाटील हे गावात असले पाहिजे. याची दक्षता व्हावी, प्रत्येक पोलीस पाटलांचे हजेरी पत्रक प्रांत अधिकारी कार्यालय व बी.डी.ओ. व संबंधित गावचे ग्रामपंचायतला ठेवण्यात यावे, पोलीस पाटलांच्या सह्या समक्ष व्हाव्यात, तसेच काही पोलीस पाटील बाहेर नोकरी करतात व शासनाचे पगार भत्ते येथे घेतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, पोलीस पाटील व त्यांच्या नातेवाईकांच्या कडून गुन्हेगारी सावकारी व्यवसाय, गोरगरिबांच्या मिळकती बळकवण्याचे प्रकार होत असून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावेत अशीही मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
पोलीस पाटील हे सरकारी असल्याने त्यांना देखील माहितीचा अधिकार अधिनियम २००५ लागू करावा, पोलीस पाटील त्यांचे हालचाल रजिस्टर व कम्पलेट बुक नोंद प्रांत कार्यालय, पंचायत समिती व ग्रामपंचायतला ठेवण्यात यावे, पोलीस पाटील पद महिलेकडे असल्यास त्याच्या नातेवाईकांनी कोणताही हस्तक्षेप करू नये, पोलीस पाटील यांनी आठवड्यात कोणती कामे केली व कोणते तंटे मिटवले? यासंबंधी नोंद ठेवण्यात यावी, तसेच यांच्या स्थावर जंगम मालमत्तांची देखील चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री व विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे,
या निवेदनामध्ये अनेक विषय मांडले असून, सदरचे निवेदन बैलगाड्या शर्यत लढ्याचे नेते व शेतकरी संघटना कोरेगाव तालुका अध्यक्ष धन्यकुमार जाधव, व महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आले असून, या निवेदनावर महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रंजनाताई पाटील, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बर्गे पाटील, दक्षिणचे अध्यक्ष संजय थोरात, सामाजिक कार्यकर्ते उत्तम पोळ, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र येळवे (बापू ), माजी कराड तालुका अध्यक्ष प्रवीण उथळे पाटील, अपंग जनता दल जिल्हाध्यक्ष अस्लम गुंडूलाल कालेकर, आंबेकरी, रूपाली पोळ, महादेव देसाई, चंद्रकांत देशमुखे, धानाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष अजित थोरात, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव खबाले, यांच्या सह्या असून त्यांनी पोलीस पाटलांच्या गैर कामाबद्दल तक्रारी, शासनाकडे व प्रशासनाकडे मांडलेल्या आहेत, तसेच तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
—————————————–
महत्वपूर्ण चौकट–
गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या पोलीस पाटील यांच्या पाठीशी शेतकरी संघटना ठाम आहे. त्यांना दरवर्षी चांगल्या कामाबद्दल वेतन वाढ द्यावी व त्यांनाही राज्य शासनाच्या वतीने आदर्श पोलीस पाटील पुरस्कार सुरू करावा. चांगल्याला चांगले आणि वाईट काम करणाऱ्या पोलीस पाटलांनी सुधारणा करावी. हाच शेतकरी संघटनेचा हेतू असल्याचे श्री धन्यकुमार जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
2) साताऱ्यातील पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचा ग्राहकांना लाभ – जिल्हाधिकारी संतोष पाटील.

सातारा दि.१८: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सातारा येथील बस स्थानका शेजारील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात शुक्रवार दिनांक २० व शनिवार दिनांक२१ फेब्रुवारी या कालावधीत पौष्टिक तृणधान्य महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली विविध कृषी उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली असून याचा लाभ ग्राहक घेत आहेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे उद्घाघाटन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे- पवार, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेती उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
महोत्सवामध्ये ज्वारीच्या विविध वाणांचे धान्य त्यामध्ये मालदांडी, सुपर मोती, परभणी मोती, फुले रेवती व फुले सूचित्रा परळी खोऱ्यातील देशी नाचणी, तांदूळ, जावळीची नाचणी, माण- खटावची बाजरी, मूग व ज्वारी उपलब्ध होणार आहेत.
कडधान्यांमध्ये जात्यावर दळलेली मुग, उडीद, काळ्या घेवड्याची डाळ तसेच हिरवा मूग, हुलगे आदी महोत्सवामध्ये विक्रीस उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वाईची सेंद्रिय हळद तसेच मिलेटचे विविध पदार्थ त्यामध्ये विविध प्रकारच्या, नाचणीच्या शेवया, नाचणीचे इडली पीठ, उडीद लाडू, नाचणी अंबिल तसेच पौष्टिक तृणधान्यांपासून तयार केलेले प्रक्रिया पदार्थ आदी वैशिष्ट्यपूर्ण व दर्जेदार उत्पादने शेतकरी गट, महिला बचत गट यांच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पारंपारिक पद्धतीमधील भवरा तसेच इतर पौष्टिक कडधान्य त्याचबरोबर पापड, लोणचे आणि चटणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. सेंद्रिय खतावर निर्मिती केलेल्या या धान्यामुळे खऱ्या अर्थाने पौष्टिक धान्य उपलब्ध होत आहे.




