वाई:-धोम धरण परिसर ‘चोरट्यांच्या ताब्यात’; खाकी गप्प, बळीराजाचा आक्रोश उसळला! लाखोंच्या केबल-डीपी-मोटारी गायब; पोलिसांच्या निष्क्रियतेवर शेतकऱ्यांचा थेट हल्ला – “आमचं रक्षण कोण करणार?”
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

धोम धरण परिसर ‘चोरट्यांच्या ताब्यात’; खाकी गप्प, बळीराजाचा आक्रोश उसळला!
लाखोंच्या केबल-डीपी-मोटारी गायब; पोलिसांच्या निष्क्रियतेवर शेतकऱ्यांचा थेट हल्ला – “आमचं रक्षण कोण करणार?”
वाई, दि. १४ : धोम धरण परिसरातील गावांमध्ये चोरट्यांनी अक्षरशः दहशत माजवली असून शेतकऱ्यांच्या जीवनरेषाच लंपास केल्या जात आहेत. दिवसाढवळ्या लाखो रुपयांच्या केबल, विद्युत मोटारी आणि डीपींच्या चोरीच्या घटना वाढल्या असतानाही पोलिसांकडून ठोस कारवाई दिसत नसल्याने संतापाचा ज्वालामुखी पेटला आहे. “चोर मोकाट, पोलीस मात्र बेपत्ता!” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.
ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीपुरवठ्याची साधने चोरीला गेल्याने शेतातील पिके करपत चालली आहेत. वेलंग (ता. वाई) येथील कृष्णदेव जाधव, सुनील जाधव, दत्ता जेधे यांच्यासह भैरवनाथ व सिद्धेश्वर पाणीपुरवठा संस्थांच्या लाखो रुपयांच्या केबल लंपास झाल्या आहेत. कर्ज काढून उभारलेल्या योजनांचा चुराडा झाल्याने बळीराजा आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे.
तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जाणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीऐवजी अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे आरोप समोर येत आहेत. गुन्हेगारांचा शोध घेण्याऐवजी तक्रारदारांनाच प्रश्नांच्या भडिमाराला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी संतप्त आहेत. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य फक्त फलकापुरतेच उरले का? असा सवाल उपस्थित होत आहे.
पोलिसांकडून अधूनमधून “चोर पकडला” किंवा “माल जप्त” अशा चर्चा रंगतात; मात्र प्रत्यक्षात ना चोरीचा माल परत मिळतो, ना आरोपींवर कारवाई स्पष्ट दिसते. अधिकृत माहिती न देता सुरू असलेला हा ‘चोर-पोलीस’ खेळ नेमका कुणासाठी? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
निवडणुकांमध्ये मोठमोठी आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी आता मौन बाळगत असल्याने रोष आणखी तीव्र झाला आहे. तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असताना शेतकऱ्यांचा आवाज ऐकणारा कोणी उरला आहे का? “आमचं रक्षण कोण करणार?” असा आक्रोश धोम धरण परिसरातून घुमत आहे.




