वाई:-“वाई पालिका फक्त ट्रेलर; जिल्हा परिषद–पंचायत समितीत होणार सत्तासंग्राम!” – बावधनमधून जयकुमार गोरे यांचा विरोधकांना थेट इशारा.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

“वाई पालिका फक्त ट्रेलर; जिल्हा परिषद–पंचायत समितीत होणार सत्तासंग्राम!” – बावधनमधून जयकुमार गोरे यांचा विरोधकांना थेट इशारा.

वाई, दि. १८ :
बावधनचा कौल म्हणजे राजकीय भूकंप! वाई तालुक्याच्या राजकारणात दिशा बदलणाऱ्या बावधन गावातूनच आता आगामी निवडणुकांचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. “वाई नगरपालिका ही फक्त झाकी होती; खरी आणि निर्णायक लढाई जिल्हा परिषद व पंचायत समितीत होणार आहे,” असा थेट, आक्रमक आणि राजकीय वजनदार इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला. त्यांच्या या विधानाने तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
बावधन येथे पार पडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या भव्य जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. वाई–खंडाळा–महाबळेश्वर मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे.
मंत्री गोरे म्हणाले की, वाई तालुक्याचे राजकारण हे केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित नसून, राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले आहे. या भूमीवर घेतलेले निर्णय संपूर्ण जिल्ह्याचे भविष्य ठरवत आले आहेत. वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत अनिल सावंत यांच्या विजयामागे शशिकांत पिसाळ व पिसाळ कुटुंबाची निर्णायक भूमिका होती. सुरुवातीपासून घेतलेली परिवर्तनाची भूमिका हीच आजच्या राजकीय बदलांची पायाभरणी ठरली, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
२०१४ पासून देशात व महाराष्ट्रात भाजपची विकासाची घोडदौड सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याला विकासाची नवी दिशा मिळाली. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांमध्ये झालेला बदल जनता प्रत्यक्ष अनुभवत आहे. म्हणूनच प्रत्येक निवडणुकीत जनता भाजपच्या पाठीशी ठामपणे उभी राहत असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्ह्याने एका नेतृत्वावर भरभरून प्रेम केले; मात्र जिल्ह्याला नेमके काय मिळाले, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. याउलट फडणवीस यांच्या काळात झालेली विकासकामे बोलकी असून, ती जनतेच्या डोळ्यांसमोर असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांकडे लक्ष वेधत गोरे म्हणाले, ही निवडणूक म्हणजे परिवर्तनाची संधी आहे. केवळ नावापुरते नाही, तर प्रत्यक्ष काम करणारे, जनतेच्या सुख-दुःखात उभे राहणारे उमेदवार पुढे आणा. इतिहास पुन्हा घडवायचा आहे.
“मी आणि माझा पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. महायुतीत असताना कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी दिला.
माजी आमदार मदनदादा भोसले यांनीही भविष्यात सर्वांनी एकदिलाने काम करून भाजप अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. पिसाळ कुटुंबासह भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता परिवर्तनासाठी एकजुटीने काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात शशिकांत पिसाळ, अरुणादेवी पिसाळ, विजयसिंह पिसाळ, दिप्ती पिसाळ, दिलीप बाबर, एस. वाय. पवार, बापूसाहेब शिंदे, सरपंच वंदना कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर व शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कार्यक्रमास वाई, खंडाळा, महाबळेश्वर परिसरातील भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.




