सातारा:-!!बेगडी राष्ट्रवाद्यांचा राजकीय झांगडगुत्ता !!
संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
!!बेगडी राष्ट्रवाद्यांचा राजकीय झांगडगुत्ता !!
सातारा
काल महाराष्ट्र राज्यामध्ये गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी/ आमदारांनी अभूतपूर्व कर्तुत्व, प्रताप सर्व जनतेसमोर सादर केला त्यामुळे सर्वसामान्य मतदार मात्र पूर्णपणे भ्रमिष्ट झाला आहे, बरोबर एक वर्षांपूर्वी अशीच राजकीय परिस्थिती निर्माण केली गेली होती, अर्थातच ह्या राजकीय दंगलीमागे मोठी शक्ती असल्याशिवाय हे शक्य नाही ते काम केंद्रातील भाजपा सरकार अगदी हिरीरीने करीत आहे. शिवकालीन इतिहासात शेतात गाढवाचा नांगर चालवण्याची घटना घडलेली होती त्याला साधर्म्य साधणारे काम सध्या महाराष्ट्राच्या राजकीय भूमीवर चालू आहे अशी प्रतिक्रिया वाई तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री कल्याण पिसाळ देशमुख यांनी दिली आहे.
प्रखर राष्ट्रवाद, समाजवाद व पूरोगामित्वाची गुठी उगळून ऊगळून गेली २५ वर्षे ज्यांनी कायम सत्ता उपभोगली,सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडे माया गोळा केली ते राष्ट्रवादी मधील नऊ अजूबे मंत्री पदाची शपथ घेताना सर्व महाराष्ट्राने याची देही याची डोळा पाहिले. महाराष्ट्र राज्यात चाललेला राजकीय गोंधळ बघून सर्वसामान्य मतदार मात्र अवाक् झाला आहे, ज्यांच्या पुण्याईवर सर्वकाही मिळवले, स्वतःचे राजकीय बस्तान बसवले त्या गुरूंनाच ह्या हिम्मतबहाद्दरांनी गुरुपौर्णिमेची गुरुदक्षिणा दिली असे खेदाने म्हणावे लागेल.या राजकीय वादळाची पुसटशी शक्यता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सो.यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान एका भाषणात बोलताना व्यक्त केली होती, या सर्व घटनेमागचे खरे काय, खोटे काय हे यथावकाश समोर येईलच परंतु गेल्या वर्षी जे शिवसेनेसोबत घडले ते मिडीयाणे अगदी प्रभावीपणे लोकांसमोर मांडले, त्यात दावे, प्रतिदावे, हायकोर्ट सुप्रीमकोर्ट अशा अनेक कसरती पार पडल्या त्यातच एक वर्ष निघून गेले, सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे विकासाकडे साहजिकच दुर्लक्ष झाले आताही अगदी तशीच परिस्थिती राष्ट्रवादी पक्षासोबत चालू राहील, न्यायालयीन लढाया लढल्या जातील यातून सामान्य माणसाच्या हाती करमणुकीशिवाय काही लागणार नाही. सध्याच्या राजकारण्यांचे वर्तन पाहिले तर भविष्यात महाराष्ट्रातील राजकीय घटनांसाठी स्वतंत्र खंडपीठ स्थापन करण्याची वेळ येऊ शकते.
येन-केन प्रकारे केंद्रातील भाजप सरकारला २०२४ मध्ये पुन्हा देशात सत्ता आणायची आहे, श्री मोदी साहेबांना परत एकदा पंतप्रधानपदी आरुढ व्हायचे आहे त्यासाठीच या जोर बैठका चालू आहेत. ज्यांच्यावर हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, काहींच्या चौकशा झाल्या काही जण तुरुंगात आहेत, निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपल्या दावणीला बांधण्याकरता केंद्रीय तपासयंत्रणांचा वापर करून ते त्यांचे ईप्सित साध्य करीत आहेत, त्यात भला थोरला सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सदन, समृद्धी महामार्ग घोटाळा असे अनेक घोटाळे आहेत ही मंडळी जर इतकी भ्रष्ट आहेत तर त्यांची सरकारला इतकी निकड का आहे. काल-परवापर्यंत आरोपीच्या पिंजऱ्यात असणारे मंडळी आज मांडला मांडी लावून बसले आहेत, १० ऑगस्टपर्यंत शिंदे गटातील १६ आमदारांच्या निलंबनाचा विषय निकाली निघणे अपेक्षित आहे ही खरी सरकार पुढील मोठी चिंता आहे त्यावरील जालीम उतारा म्हणून राष्ट्रवादीतील फुटीकडे पाहता येईल, आमदार, खासदार यांच्या फोडाफोडीचे प्रकार सर्वच पक्षात घडलेले आहेत परंतु प्रादेशिकपक्षांबाबत याचे प्रमाण जास्त आहे.
गेली अनेक वर्ष राजकीय मंडळी सामान्यांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे काम करीत आलेली आहेत, राजकारण, समाजकारण फक्त पैसेवाले करू शकतात असा समज लोकांच्या गळी उतरवण्यामध्ये ह्या मंडळींना यश आलेले दिसून येते, सोशल मीडिया हे दुधारी शत्र आहे फायद्याबरोबर त्याचे तोटेही आहेतच या सर्व गदारोळात मात्र सामान्य नागरिक पुरता शहाणा झालेला आहे. लोकशाहीने सर्वसामान्याला बहाल केलेला मतदान हा पवित्र दागिना कसा वापरायचा याची जाणीव बहुदा सामान्य व्यक्तीला झालेली असेल, एकदा मत दिल्यानंतर पुढील पाच वर्षे राजकीय दंगली पाहण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही.
सत्ता आणि पैशाच्या जोरावर एकदा दोनदा सामान्य मतदारांची फसवणूक करता येईल परंतु सदा सर्वकाळ जनतेला फसवणे शक्य नाही. महाराष्ट्रातील मतदार सुज्ञ आहे विचारी आहे, देर से सही दुरुस्त सही. महाराष्ट्र राज्यातील जनता राजकारण्यांचा योग्य वेळी योग्य निवाडा करेल असा आशावाद करण्यास हरकत नाही. असे श्री कल्याण पिसाळ देशमुख यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
श्री कल्याण पिसाळ देशमुख
उपाध्यक्ष- वाई तालुका काँग्रेस कमिटी
फोन ९८५०४१२९०९