कोल्हापूर:-मेंदूच्या बायपास शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटल येथे न्युरोसर्जन डॉ.मरजक्के व टीमकडून यशस्वी.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
मेंदूच्या बायपास शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटल येथे न्युरोसर्जन डॉ . मरजक्के व टीमकडून यशस्वी.
कोल्हापूर दि: येथील सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे तब्बल २५ रुग्णांच्या मेंदूच्या अत्यंत जटील व दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या मेंदू बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. मेंदूच्या अशा शस्त्रक्रिया करणारे ग्रामीण भागातील पहिलेच एक रुग्णालय म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटलने वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. अशा आजाराने ग्रस्त अनेक रुग्णांना कणेरी मठ येथे उपचार मिळू शकतात, त्याचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व सुप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी कोल्हापूर येथील कृषी विज्ञान केंद्र कनेरी मठ येथे पत्रकार परिषेदेत केले.
यावेळी ते पुढे म्हणाले, पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’ अशी ओळख निर्माण केली आहे. या सेवा शृंखलेत रुग्णालयातील संस्कार (मेंदू विभाग) विभागाने मेंदूच्या तब्बल २५ बायपास शस्त्रक्रिया करून एक विक्रम स्थापित केला आहे. मेंदूच्या अनेक विकारांच्यात बायपास शस्त्रक्रियेची गरज असते, अशा शस्त्रक्रिया भारतात केवळ मेट्रो सिटीमधील तब्बल ८-१० ठिकाणीच होते. बायपास शस्त्रक्रिया अत्यंत तुरळक प्रमाणात होतात. त्यामुळे एकाच रुग्णालयात अत्यंत कमी कालावधीत तब्बल २५ शस्त्रक्रिया करण्याची किमया सिद्धगिरी हॉस्पिटलमधील डॉ. शिवशंकर मरजक्के आणि त्यांच्या कुशल टीमने पार पाडले आहे.
मानवी शरीरात मेंदू सर्व शरीरावर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे काम करत असतो. यासाठी ह्रदयामार्फत प्रवाहित होणाऱ्या रक्तापैकी सुमारे २५% रक्ताचा वापर मेंदूचे कार्य होण्यासाठी होतो. या रक्ताभिसरणासाठी कैरोटिड आर्टरी (धमनी) मोठ्या मेंदूला रक्त पुरवठा करण्याचे काम करत असते तर व्हर्तेब्रल आर्टरी (धमनी) लहान मेंदूला रक्त पुरवठा करत असतात. त्या मेंदूमध्ये आत जावून अत्यंत जटील व अत्यंत लहान म्हणजेच केसाच्या तुलनेत दहापट लहान असतात. अनेक वेळा या रक्तवाहिन्यांच्याद्वारे रक्तपुरवठा करण्याचे बंद होते, रक्तवाहिन्या चोकअप होतात, अशावेळी अशी ब्रेन बायपास शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते.
मेंदूच्या विकारात प्रामुख्याने मोया-मोया आजारात दोन्ही रक्त वाहिन्या रक्तपुरवठा करणे बंद करतात. बंद झालेली रक्त वाहिनी ह्रदयरोगातील अन्जिओप्लास्टी सारखी ओपन करता येत नाही. यावेळी बायपास शस्त्रक्रिया हाच उपाय असतो. मेंदूला योग्य रक्तपुरवठा झाला नाही तर मेंदूतील जीवकोश पेशी एकदा मृत झाल्या तर त्या परत तयार होत नाहीत, त्यामुळे या शस्त्रक्रिया अत्यंत नाजूक व आवाहनात्मक असतात.
सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये आपण यासाठी प्रामुख्याने दोन प्रकारे या शस्त्रक्रिया करतो. आपण १५ मिनटांच्या करीतच बंद करू शकतो, कारण यापेक्षा जास्त वेळ लागला तर पेशंटला कायमचा लकवा मारण्याची शक्यता असते, त्यामुळे पर्यायी धमनी १५ मिनिटांच्या आत या भागात जोडावी लागते. त्यामुळे या प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्यंत आधुनिक मायक्रोस्कोप (हायएंड) तसेच मशीन्स लागतात. याशिवाय त्या मशीन चालवणारे अनुभवी कर्मचारी लागतात. यावेळी रुग्णांचे रक्ताची घनता कमी झाली तरी अशा शस्त्रक्रिया अपयशी होवू शकतात, तसेच रुग्णांचा रक्तदाब हि यावेळी जास्त ठेवावा लागतो. अशावेळी न्युरो भूलतज्ञांची भूमिका महत्वाची भूमिका ठरत असते. वरील सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत,
अनुभवी प्रख्यात न्युरोसर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के व प्रख्यात न्युरो भूलतज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर, सहाय्यक न्युरोसर्जन डॉ.अविष्कार कढव आणि कुशल कर्मचारी यांच्यामुळे ग्रामीण भागात सिद्धगिरी हॉस्पिटलने अत्यंत कमी कालावधीत ३ ते ४ राज्यातून आलेल्या २५ रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. सर्व रुग्ण आज पूर्णपणे निरोगी आयुष्य जगत आहेत.
यावेळी बोलताना पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, “मेट्रो शहरात होरणाऱ्या या शस्त्रक्रियेला तब्बल १० ते १५ लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहेत, मात्र सिद्धगिरी हॉस्पिटल येथे अद्यावत तंत्रज्ञान वापरून हि न नफा न तोटा या तत्वावर केवळ गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा म्हणून नाममात्र खर्चात हि शस्त्रक्रिया होत आहे. समाजातील गरजू व गरीब लोकांच्याकरिता आपण हि माहिती आपल्या माध्यमातून पोहचवावी व या सेवेचा लाभ त्यांना द्यावा. ”
यावेळी डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी विविध दृक-श्राव्य (व्हिडीओ) माध्यमांच्या द्वारे सदर जटील व जोखमीची शस्त्रक्रिया कशी केली जाते हे उपस्थित पत्रकारांना दाखवून माहिती विशद केली. यावेळी प्रास्ताविक करताना विवेक सिद्ध यांनी सांगितले कि, डॉ. शिवशंकर मरजक्के हे ब्रेन बायपास, एपिलेप्सी सर्जरी, एंडोस्कोपिक ब्रेन सर्जरी करण्यासाठी भारतातील काही मोजक्या (८-१०) सर्जनांपैकी एक असून त्यांनी सर्वोत्तम न्यूरो इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी सर्जरी क्षेत्रात दोनदा सुवर्णपदक प्राप्त केले असून तब्बल 10000 पेक्षा जास्त गंभीर शस्त्रक्रियांचा अनुभव त्यांना आहे. गेली १० वर्षे सिद्धगिरीत सेवा देत असून रुग्णांनी त्यांच्या कौशल्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले तर या पत्रकार परिषदेस सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक व न्युरो भूलतज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर, न्युरोसर्जन डॉ.आविष्कार कढव, डॉ.निषाद साठे, डॉ.स्वप्नील वळीवडे, राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, अभिजित चौगले, सागर गोसावी, प्रसाद नेवरेकर व कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव येथून पत्रकार उपस्थित होते.
—-+—————&———————-
कृषी विज्ञान केंद्र , कणेरी जि कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत माहिती देताना परमपूज्य पद्मश्री काडर्सिद्धेश्वर स्वामी व वैद्यकीय तज्ञ मंडळी (छाया -अजित जगताप ,सातारा)