कराड:-श्रमसंस्कार शिबिरातून सर्वांगीण विकास मा.सौ. संगिता साळुंखे (माई) यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी प्रा.संतोष बोंगाळे कराड:-9923900840

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
श्रमसंस्कार शिबिरातून सर्वांगीण विकास
मा.सौ. संगिता साळुंखे (माई) यांचे प्रतिपादन
(वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरास वडोली निळेश्वर येथे प्रारंभ)
कराड :(दि. 22, प्रतिनिधी) श्रमसंस्कार शिबिरात सहभागी होऊन श्रमदान करण्याची संधी मिळण्यासाठी भाग्य असावे लागते. पुस्तकातील ज्ञानाबरोबरच शिबिरातील प्रत्यक्ष ज्ञानातून विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास होतो. अनुभवातून मिळालेले हे शिक्षण जीवनभर पुरणारी शिदोरी आहे. स्वर्गीय मा. यशवंतराव चव्हाणसाहेब यांचे विचार आजही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक आहेत. स्वर्गीय वेणूताई चव्हाण यांचे जीवन आदर्शवत व प्रेरक आहे. स्वर्गीय आदरणीय पी. डी. पाटीलसाहेबांनी केलेले कार्य हे दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे. आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांनी अशा थोर विभूतींच्या विचारांचा अभ्यास करून त्यांचे अनुकरण करावे, विद्यार्थ्यांनी असे विचार आत्मसात करावेत, हीच या थोर व्यक्तींना खरी श्रद्धांजली आहे, असे प्रतिपादन मा. सौ संगीता तानाजीराव साळुंखे उर्फ माई यांनी वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी वडोली निळेश्वर येथे व्यक्त केले. श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर कराडच्या वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड वरिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजेनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर वडोली निळेश्वर येथे मंगळवार, दि. 21 ते सोमवार 27 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
आपल्या उद्घाटनपर भाषणात सौ संगीता साळुंखे (माई) यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील समस्या समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले, तसेच ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, जटा निर्मूलन, महिला स्वावलंबन व सक्षमीकरण, स्वच्छता याबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत सौ. माई यांनी व्यक्त केले.
वडोली निळेश्वरचे सरपंच मा. श्री. भीमराव मदने यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले तर ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच सौ सुरेखा सुरेश डुबल यांनी मनोगत व्यक्त केले व या शिबिरास संपूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले.
श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर कराडचे जनरल सेक्रेटरी मा. अल्ताफहुसेन मुल्लासाहेब यांनी महाविद्यालयाचा हा एक चांगला उपक्रम असून यातून विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने जडणघडण होते व त्यांना अनुभवातून शिक्षण मिळते, समाजातील हे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, व समाजाचे ऋण फेडण्याचे संस्कार अशा शिबिरातून घडतात व यातून परिपूर्ण जागरूक नागरिक तयार होतात, असे मत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.जी. जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय कार्यक्रम अधिकारी प्रा. सौ एस. पी. पाटील यांनी करून दिला तर कार्यक्रम अधिकारी प्रा. आर.पी. पवार यांनी शिबीरउद्देश कथन केला. प्रा. डाॅ.डी.पी. जाधव यांनी आभार व्यक्त केले व प्रा. सौ. एस.सी. भस्मे व प्रा. डॉ. सौ.व्ही. आर. लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी उपसरपंच सौ.अर्चना वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य श्री. संभाजी पवार, सौ. अंजना पवार , सौ.सविता पवार , वडोली निळेश्वर येथील ग्रामस्थ, मनीषा साळुंखे, निर्मला जाधव,
महाविद्यालयाच्या वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, शिबिरार्थी विद्यार्थी उपस्थित होते.