वाई:-किसनवीर कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची टनाला ५०० ते ६०० रुपये तोटा सहन करण्याची मानसिकता नाही-मा.कल्याण पिसाळ देशमुख.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
!! आम्ही चोरांच्या पालखीचे भोई !!
सातारा दी:- मागील महिन्यात किसनवीर कारखान्याचा पहिला हप्ता २३५०/- रुपये जाहीर झाला, अंतिम दर एफ आर पी प्रमाने देण्यात येईल असे सांगितले गेले, वास्तविक पाहता किसनवीर चा पहिला हप्ता रुपये २३५०/- प्रति टन हे किसनवीर व्यवस्थापनाचे टेहाळणी पथक होते, शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहण्यासाठी जाहीर केलेला दर होता, काही ठिकाणी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त झाली की लगोलग दोन दिवसात २५००/- रुपये प्रति टन पहिली उचल जाहीर केली, एफ आर पी प्रमाणेअंतिम दराची निश्चित खात्री नाही, चार पैसे अधिकचे मिळावेत म्हणून इतर कारखान्यांना ऊस घालण्याची इच्छा असताना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना किसनवीरला ऊस घालण्याकरता हर प्रकारे मजबूर, हतबल केले जात आहे हे वास्तव आहे. कारखान्याच्या आजी-माजी कारभाऱ्यांचा शेतकऱ्यांशी असलेला गेल्या अनेक वर्षातला व्यवहार पाहता आम्ही तर “चोरांच्या पालखीचे भोई” अशी भावना किसनवीर कार्यक्षेत्रातील सबंध शेतकरी वर्गाचीआहे अशी प्रतिक्रिया वाई तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष कल्याण पिसाळदेशमुख यांनी दिली.
प्रसिद्धी पत्रकात यांनी म्हटले आहे की चालू हंगामात वारणा सहकारी साखर कारखान्याने विक्रमी दर जाहीर केलेला आहे, वारणा कारखान्याच्या बरोबरीत दर किसनवीला देता येणार नाही याची पूर्व जाणीव शेतकऱ्यांना आहे, परंतु जिल्ह्यातील सहकारी व इतर खाजगी कारखान्यांनी पहिली उचल रुपये ३०००/- प्रति टन च्या आसपास जाहीर केली आहे, किमान रुपये ३०००/- च्या जवळपास उसाला दर मिळावा ही शेतकऱ्यांची रास्तअपेक्षा आहे. किसनवीरचा रुपये २५००/- हाच अंतिम दर राहील कारण निवडणूक प्रचार काळात तालुक्याचे आमदार व बँकेचे अध्यक्ष वारंवार ऊस दर कपाती विषयी वारंवार बोलत होते असे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे, मात्र शेतकरी इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी पैसे घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही, टनाला ५०० ते ६०० रुपये तोटा सहन करण्याची तयारी शेतकऱ्यांची नाही. आतापर्यंत हेच लोक खाजगी कारखान्यांच्या ऊस तोडणी टोळ्यांचे नियोजन किसनवीर कार्यक्षेत्रामध्ये करत होते, आजमीतीला त्याच खाजगी कारखान्यांच्या टोळ्यांना कार्यक्षेत्रामध्ये ऊस तोडण्यास किसनवीर व्यवस्थापनाकडून आटकाव, मज्जाव केला जात आहे, खाजगी कारखाने यांच्याच गुरूंचे असल्यामुळे तिथेही यांचाच वरचष्मा आहे, ऊस तोडी साठी खुले धोरण असताना इतर कारखान्यांना ऊस तोडण्यास अटकाव केला जातो, वाहतूकदारांना जबरदस्ती केली जाते, त्यांनी तोडलेला ऊस राजकीय वजन वापरून किसनवीरला घालण्यास जबरदस्ती केली जाते, कर्ज काढून शेअर्स खरेदी बद्दलची जबरदस्ती, कमी ऊसदराबाबत जबरदस्ती हा एक प्रकारचा शेतकऱ्यांवर चाललेला अतिप्रसंग आहे.
ऊसदर प्रकरणी किसनवीर कारखाना व्यवस्थापन वाघाचं कातडं पांघरून बसलं आहे, खंडाळा कारखाना चालू होऊन जवळपास दोन महिने झाले अजूनही सुरुवातीला घातलेल्या उसाचे बिल शेतकऱ्यांना मिळालेले नाही, सध्या कारखाना पुर्ण क्षमतेने चालत नाही बराच वेळा तो नो केन अवस्थेत असल्याची खाजगीत माहिती आहे, भुईंज कारखान्याच्या बाबतीत तशीच अवस्था आहे, सुरुवातीला रोजच्या रोज होणाऱ्या गाळपाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत होती आता ती जाणीवपूर्वक बंद केली आहे. माजी अध्यक्ष मदन भोसले यांनी गाय मारली आता मला वासरू मारण्याचा अधिकार आहे या भावनेतून पाटील बंधूंची वाटचाल सुरू आहे भाग भांडवल वाढवण्याकरता कर्ज काढून शेअर्स खरेदी, शेतकऱ्यांच्या ठेवी, ऊस गाळपासाठी पाठवणे या गोष्टी कारखान्याच्या भल्यासाठी घडल्या पाहिजेत परंतु त्या स्वयंस्फूर्तीने, स्वच्छेने होणे गरजेचे आहे, जोर जबरदस्तीने नव्हे. लोकांची इच्छा नसताना हे सर्व प्रयोग त्यांच्या माथी मारणे योग्य नाही. गतवर्षी ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना प्रचंड त्रास भोगावा लागला, वारेमाप पैसा गेला, आमदार गटाने खाजगी कारखान्यांच्या साह्याने ऊसतोडीमध्ये मनसोक्त राजकारण केले मात्र माजी अध्यक्ष मदन भोसले हे सर्व निर्विकारपणे पहात बसले, आज सुद्धा कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना गरज असताना कारखान्याचे बाबतीत चाललेल्या चुकीच्या गोष्टींना ठामपणे विरोध करण्याऐवजी शेतकरी कसा तरफडतोय याचाच आसुरी आनंद मा. अध्यक्ष मदन भोसले घेत आहेत, किसनवीर कारखान्यामध्ये ऐवढी मनमानी चालू असताना मदन भोसले शांत बसले आहेत याचे गौडबंगाल काय आहे असा प्रश्न ५ तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या मनात आहे.
आजी-माजी सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा कडेलोट केला असला तरी वर वर शांत, सोशिक वाटणारी जनता भविष्यात या दोघांचाही “येळकोट” नक्की करेल असे दिसत असल्याचे कल्याण पिसाळ देशमुख यांनी पत्रकात म्हटले आहे.
दिनांक- १५/१२/२०२२
फोन- ९८५०४१२९०९