आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-बावधन बगाड यात्रा २०२४ चा मानकरी श्री विकास तानाजी नवले.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS

बावधन बगाड यात्रा २०२४ चा मानकरी श्री विकास तानाजी नवले.

 

बावधन बगाड यात्रा २०२४ चा मानकरी श्री विकास तानाजी नवले शेलारवाडी, बावधन यांना मिळाला आहे. बहिणीला अपत्य प्राप्ती साठी त्यांनी नाथांना नवस केला होता. तो पूर्णत्वास गेला. शनिवार ३० मार्च २०२४ रोजी बावधन बगाड याञा संपन्न होत आहे.

बावधन गावची बगाड यात्रा.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात बगाड यात्रा ह्या प्रामुख्याने वाई तालुक्यातील बावधन, पसरणी, फुलेनगर, पांडे, कवठे आणि सुरूर या गावांत भरवल्या जातात. या प्रत्येक गावच्या बगाड यात्रेचे स्वरूप जवळपास सारखेच आहे. गावचे ग्रामदैवत असलेल्या काळभैरव/भैरवनाथ/भैरोबा आणि त्यांची पत्नी जोगेश्वरी यांची ही वार्षिक यात्रा असते. प्रश्न हा बावधन गावच्या यात्रेसंदर्भात असल्यामुळे त्यासंदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

बावधन गावची बगाड यात्रा ही दरवर्षी फाल्गुन कृष्ण पंचमी म्हणजे रंगपंचमी दिवशी भरवली जाते, मात्र याची सुरुवात ही जवळ जवळ एक ते दीड महिना अगोदर पासून केली जाते. याची सुरुवात होते ते बगाड तयार करावयास लागणाऱ्या साहित्याची जुळवा जुळव करण्यापासून. आपणास समजण्यासाठी आणि मला समजावून सांगण्यासाठी बगडाचे एक छायाचित्र व विडिओ मी सोबत समाविष्ट करतो.

*बगाडाचे स्वरूप*

बगाड म्हणजे बैलांनी ओढला जाणार गाडा (रथ). यात यामध्ये सर्वात वरती जो आडवे लांबलचक भाग असतो त्याला शीड अस म्हटले जाते जे बनविण्यासाठी मोठे लांबलचक काटेरी बांबू (कळक) वापरले जातात. हे बांबू साधारण एक महिना अगोदर तोडून आणून त्याच्या बाजूच्या आडव्या फांद्या तोडून ते सरळ होण्यासाठी गरज असेल तिथे वजन ठेवून उन्हात सुकवायला ठेवले जातात. यानंतर बागडाचा जो उभा खांब असतो ज्यावर शीड बसवलेल असते त्याला खांबला अस संबोधलं जाते. हा खांबला हा बाभळ वृक्षापासून बनवतात, याचे मुख्य कारण म्हणजे त्याचा चिवटपणा, टिकाऊपणा आणि मजबूतता. बाभळीचे लाकूड सहजा सहजी मोडत नाही. तर खांबला तयार करण्यासाठी लागणारी बाभळ ही त्याची उंची, घेरा बघून अगोदरच चार सहा महिने शोधून ठेवली जाते. यात्रेच्या किमान दोन महिने अगोदर ही बाभूळ तोडून आणली जाते. गावातील सुतार समाजातील लोक हे त्यापासून खांबला तयार करायला सुरुवात करतात. त्यानंतरचा भाग येतो शीड ज्या ठिकाणी खांबल्यात बसवला जातो त्याला बाहुली म्हटले जाते. यात दोन भाग येतात एक शीड गोलकार फिरण्यासाठी खांबल्यात रोवलेले लाकडी गोलाकार चाक असते तर शिडाचा तोल आणि गोलाकार बाहुली एकत्र जोडण्यासाठी एक लाकडी चौकोनी भाग असतो. हा खांबल्या खालच्या बाजूला अजून एक मोठ्या लाकडात रोवून उभा केला जातो त्याला वाघ/वाघल्या म्हटलं जात . हे पण बाभळीच्या झाडापासून तोंडाला वाघाच्या जबड्यासारखा आकार देऊन बनवले जाते. हा वाघल्या खाली जी दगडी चाके जोडली आहेत त्याला जोटे म्हटलं जाते त्यावर चराटानी ( जाड दोर) याने बांधून फिट केला जातो. पूर्वी ही चराट वाकाची असायची जी गावातील मांग समाजातील लोक बनवून द्यायचे, परंतु कालौघात आता ती नायलॉनची वापरली जातात. यानंतरच भाग येतो तो दांडी, जू आणि शिवाळ. दांडी म्हणजे दगडी चाकापासून बैल जुंपण्यापर्यतचे जे लाकूड आहे त्याला दांडी म्हटलं जातं. तर बैल ज्याला बांधले/जुंपले जातात त्याला जू व शिवाळ म्हटलं जातं. शिडाच्या पुढच्या बाजूला बागडाला जो देवाचा मानकरी अडकवला जातो त्याला बागड्या म्हणतात आणि त्याला हाताने पकडण्यासाठी बांबू मध्ये अडकवलेला एक भाग असतो. बागडाची चाके ही दगडी असतात, गावातील वडार/पाथरवट समाज ही दगडी चाके घडवतो. हे सर्व झाले बगाड बनवण्याचे साहित्य. आता वळूयात याची बांधणी कशी केली जाते याकडे.

प्रत्यक्ष यात्रेच्या एक दिवस अगोदर पासून बगाड बांधणीचे काम सुरू होते. हे सर्व काम गावातीलच मनुष्यबळ वापरून केले जाते. त्यामुळे गावातील आणि भोवतालच्या वाडीवस्ती वरील सर्व समाजातील लोक एकत्र जमून हे काम करतात. प्रथम दगडी चाके, बूट, दांडी आणि शिवाळ व जोट्याला बसवून खालचा भाग तयार केला जातो. हे तयार केल्यानंतर शीड बनवण्याची तयारी सुरू होते, यामध्ये जाणकार लोकांच्या मार्गदर्शनाखाली दोराच्या साहाय्याने बांबू एकमेकात विशिष्ट पध्दतीने घट्ट विणून बांधले जातात. यासाठी किमान ३० ते ४० लोक दोन्ही बाजूने दोर ओढून ते अगदी घट्ट करतात. हे शीड विणायला साधारण सहा ते सात तास लागतात. शीड विणून तयार झाल्यावर प्रथम खांबला हा उभा केला जातो. तो प्रथम जाड दोराच्या साहाय्याने वाघल्यावर चढवला जातो, वाघल्याच्या खोबणीत तो बसवून एका बाजूने ओढून तो सरळ केला जातो. खांबला उभा केल्यानंतर तो घट्ट अडकून राहावा यासाठी बाजूनी तो साठयाला बांधला जातो आणि त्याच्यात आडवी छोटी लाकडी, ज्याला पिळकावणी म्हटलं जाते त्याने त्याला पीळ देऊन ते अगदी घट्ट बसवले जाते. यानंतर येते शीड बसवणे. यासाठी पुर्वी अख्खा खांबल्या सहित गाडा आडवा केला जायचा त्यावर शीड बसवले जायचे आणि माणसांनी एका बाजूने ओढून तो परत सरळ केला जायचा आता थोडा बदल केला आहे. या खांबल्याचा तोल व्यवस्थित राहण्यासाठी दोन्ही बाजुंनी दोन दोर जोडले जातात त्याला तोरण्या म्हटलं जातं. यात्रेच्या दिवशी रात्री दहा/अकरा वाजेपर्यंत हे बगाड बांधणीचे काम पूर्ण केलं जातं. यातील महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण बगाड बांधणीत एकही धातूची गोष्ट वापरली जात नाही, अगदी साधा खिळा सुद्धा नाही. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षीच हे साहित्य बनवलं जात नाही. यात्रा संपन्न झाल्यानंतर हे साहित्य एका विहिरीत ठेवले जाते.

*बगाडाचे साहित्य विहिरीतून काढताना.*

आता येतो यात्रेचा उत्सव दिवस. बगाड्याचा मान कोणाला द्यायचा हे होळी पौर्णिमेला ठरवले जाते. जे इच्छुक आहेत त्यांचा भैरवनाथ मंदिरात कौल लावला जातो. तो कौल ज्यांच्या नावाचा येईल तो बागडा म्हणून घोषित केला जातो. त्यानंतर यांचा मुक्काम हा मंदिरातच असतो. ते पाच दिवस हा बगाड्याचा उपवास असतो. यात्रेच्या मुख्य दिवशी सूर्योदयाला बैल गाड्याला जुंपले जातात, यातील मुख्य गाड्याला जे बैल असतात त्यांना दोरीने गाड्याला बांधले जात नाही, याचे कारण म्हणजे गाडा हा मागच्या बाजूला झुकला तर बैलांना फास बसू शकतो. यासाठी मग मुख्य गाड्याला जोडली जाणारी बैलजोडीच्या मानेखालून (आरूसा) दोर घेऊन तो त्याठिकाणी माणसांकरवी पकडला जातो, याला खाणसा धरण म्हटलं जाते. हे मोठे कौशल्याचे, चपळाईचे आणि धाडसाचे काम असते. पीळकावण्या वर दोन्ही बाजूला भोसले व पिसाळ तरफेच्या दोन व्यक्ती उभ्या राहतात. तेच दोघे उंचावरून देखरेख करून चालू बगाड गाड्याचे संचालन व मार्गदर्शन करतात. शिडावर तेल घालण्यासाठी एक जण बसलेला असतो. पाच ते सहा बैलजोडी गाडा ओढण्यासाठी जोडले जातात. गाड्याची सुरवात ही भैरवनाथ मंदिरापाशी होते तर तेथून तो गाडा ओढून कृष्णा नदीतीरावर असलेल्या श्री क्षेत्र सोनेश्वर या ठिकाणी तो पोचवला जातो. पोचवल्यानंतर साधारण साडे बाराच्या सुमारास गाड्याचा परतीचा प्रवास चालू होतो. वाजत गाजत बगड्याचा जो मानकरी असतो त्याला मानाचा पोशाख चढवून टांगले जाते. डोक्याला , पायांना रुतू नये यासाठी धोतराने सभोवतालच्या दोराला गुंडाळले जाते. डोक्यात फेटा बांधलेला असतो. बागडा टांगल्यावर शिडाच्या पाच प्रदक्षिणा होतात आणि काशीनाथाचे चांगभलं च्या गजरात परतीचा प्रवास चालू होतो. सुर्यास्तापर्यंत गाडा हा बैलांच्या साहाय्याने परत भैरवनाथ मंदीरापर्यंत पोचवला जातो. बगाड यात्रा संपन्न होते आणि यात्रेच्या उर्वरित कार्यक्रमांना मग सुरुवात होते.

*काळभैरवनाथ मंदिर आणि उत्सव मूर्ती.*

ही यात्रा समस्त पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, त्यामुळे गर्दी ही खूप होते. यात्रेचे एकंदरीत स्वरूप पाहून बरेच लोक यावर बरेच आक्षेप घेतात, पण स्वअनुभवावरून मला वाटते यात तितकस तथ्य नाही. बैल गाड्याला जुंपण्यासाठी शेतकरी वर्ग अगदी सहा सहा महिन्यांपासून तयारी करत असतात त्याचे खाणे पिणे ते त्यांचा सराव याची खूप काळजी घेतली जाते. त्यामुळे साहजिकच बैलमालकाची आपल्या बैलाने गाड्यात कामगिरी करावी ही अपेक्षा असते. दुसरा आक्षेप म्हणजे बगाडाचा मानकरी बगाड्या याला गाड्याला टांगण्याबद्दल. यामध्ये कोणत्याही व्यक्तीवर कसल्याही प्रकारची बळजबरी नसते. श्रद्धेतुन देवाला बोललेला नवस फेडण्यासाठी लोक वर्षानुवर्षे बागडाचा मान मिळावा यासाठी प्रयत्न करत असतात. बगाड्या गाड्याला जेव्हा टांगला जातो तेव्हा त्याच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाते. त्याच्या दोन्हीबांजुनी त्याला दोराच्या साहाय्याने सपोर्ट असतो तर कमरेभोबती धोतराच्या साहाय्याने व्यवस्थित बांधले जाते. तळपायाखालीही सुती कापडाने दोर अच्छादला जातो. आजपर्यंतच्या माझ्या माहितीत बगाड्याच्या कधीही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. इतर व्यक्तींच्या बाबतीत काही घटना जरूर घडल्या आहेत आणि त्याचे जर कारण पाहिलं तर प्रामुख्याने दिसून येतील ती गाफीलपना आणि अति आत्मविश्वास. शेवटी हा जोखमीचा खेळ आहे. बैल हा प्राणी आहे, आणि जत्रेच्या त्या प्रचंड गोंधळात बिथरल्यावर तो कसा वागेल हे कोणीच सांगू शकत नाही त्यामुळे खबरदारी आणि अनुभव या गोष्टी अपघात टाळण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.

यात्रेच्या इतिहासात डोकावयाचे म्हटले तर याचा लिखित पुरावा माझ्यातरी वाचनात अजून आला नाही. बावधन हे ऐतिहासिक गाव आहे, सातारच्या छत्रपतींच्या गादीचे खाजगी वतनातील हे एक गाव असल्यामुळे आजही त्याचा महसूल सातारा राजघराण्यात जातो. येथील भिंताडे उर्फ भोसले घराणे, पिसाळ घराणे ही खूप ऐतिहासिक जुनी घराणी आहेत. सदाशिवराव भाऊ यांच्या पत्नी पार्वतीबाई यांना पानिपत संग्रामानंतर सहीसलामत पुण्यात घेऊन येणारे जानोजी भिंताडे यांच्या भिंताडे घराण्याचे हे मूळ गाव. मराठेशाहीतील बुंदेलखंडातील थोर सेनानी गोविंदपंत खेर उर्फ बुंदेले यांचा वाडा आणि त्यांच्या घराण्याला इनाम असलेलं वाकेश्वर मंदिर आजही बावधन मध्ये आहे. अफजलखान वाईचा सुभेदार असताना बावधनचे नाव बदलून इस्लामी नाव देण्याचा केलेला उल्लेखही इतिहासात सापडतो, पण तस झाल नाही. दुर्दैवाने बगाड संदर्भात अजून एकही कागद मला सापडला नाही. आजही गाड्याचे एकंदरीत स्वरूप पाहिल्यानंतर आणि वाई परिसराचा इतिहास लक्षात घेता शिवपूर्व काळापासून ही यात्रा अस्तित्वात असावी असं आजच्या घडीला तरी वाटत आहे, बघुयात कागपत्रांच्या जंजाळात कधी काय बाहेर येते ते..!!

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

काशिनाथांचे चांगभल.

माजी नौसैनिक रविंद्र आनंदराव भोसले.⚓🇮🇳

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button