पुणे पिंपरी:-तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा : रंगा राचुरे.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा : रंगा राचुरे
पिंपरी, दि. 26 (शफिक शेख) :— ऐन खरिपाच्या हंगामात बेभरवशाच्या पावसामुळे शेतक—यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी यामुळे ग्रस्त असून सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून दिल्ली सरकारप्रमाणे शेतक—यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी केली आहे.
यंदा खरिपाच्या हंगामात बेभरवशाच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यत्वे मराठवाडा, विदर्भ विभागात सोयाबीनच्या पिकास सर्वात जास्त फटका बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रात कापूस, भाजीपाला व फळबागाना याची झळ बसली आहे. दिवाळीच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची अपेक्षा होती, परंतु सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे आणि विमा संदर्भातील दिरंगाईमुळे नाईलाजाने शेतकऱ्यांनी दिवाळी कशीबशी काढली, खोक्यांमध्ये अडकलेली सरकारे शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आहेत हेच या काळात अधोरेखित झाले आहे, असेही ते म्हणाले.
पूर्वी सरकारी अधिकारी पंचनामा करीत परंतु आता मोबाईल वरती वरती फोटो काढून पाठवा असे विमा कंपनी कळवते. शेतकऱ्यांना यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येतात. सध्या विमा अधिकारी पाहणी करीत आहेत परंतु पीक काढून झालेल्या सोयाबीनच्या वावराची पाहणी करून निष्कर्ष कसा काढणार? शिवाय काही ठिकाणी विमा अधिकारी पैसे मागतात अशा तक्रारी येत आहेत. विमा भरपाई मिळवणे हे अधिकच किचकट झाले आहे.
सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला तर रब्बी पेरणीसाठी काही पैसे हाताशी येवू शकतात. नुसते ‘दुष्काळ सदृश्य परिस्थिती’ म्हंटल्याने शेतकऱ्यांना काहीच दिलासा मिळत नाही. आप सरकार दिल्लीत देते त्याप्रमाणे सरकारने हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसन भरपाई द्यावी, असे आवाहन आम आदमी पार्टीचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी केले आहे.