ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसंपादकीय

सातारा:- “स्वातंत्र्याचा यज्ञकुंड” – लेखक किरण जाधव.

प्रतिनिधी:-प्रा. दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख :-9890318605.

संपादक:- प्रल्हाद चव्हाण :-8208717483

प्रतिनिधी:-प्रा. दिलीप पुस्तके सातारा विभाग प्रमुख :-9890318605.

स्वातंत्र्याचे यज्ञकुंड : किरण जाधव
तस पाहिलं तर खूप म्हणजे खूप पूर्वीपासून सातारा जिल्ह्याला
शूरवीरांची,क्रांतिकारकांची भूमी म्हणुन ओळखल जात. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत
संपूर्ण भारतात तीन जिल्हे अग्रेसर होते. खऱ्या अर्थाने या जिल्ह्यातील लोकांनी
ब्रिटिशांना जर्जर करून सोडलं होत. पळता भुई थोडी केली होती. पश्चिम बंगाल मधील
मिदनापूर, बिहार मधील बालीया, तर महाराष्ट्रातील सातारा. कारण इथल्या कित्येक
भूमिपुत्रांनी स्वातंत्र्य संग्रामात हसत हसत आपल्या प्राणांची आहूती दिली. अनेकांनी
आपल्या स्वप्नांची, संसाराची, आयुष्याची समिधा या धगधगत्या यज्ञकुंडाला वाहिली.
पण हे भूमिपुत्र होते तरी कोण? हा प्रश्न मात्र आपल्याला निशब्द करतो आणि
अभिमानाने भरून आलेली छाती क्षणात शांत होते. हे भूमिपुत्र आपल्या मातीतले होते
तरी पण ते आपल्यासाठी अज्ञात आहेत. आज २०२२ हे स्वातंत्र्याच अमृत महोत्सवी
वर्ष म्हणून आपण साजरे करीत आहोत. पण त्यांच्या चरित्राची ओळख आपल्याला
कधी होणार.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात १९४२ च्या चले जाव आंदोलनावेळी अनेक
अविश्वसनीय क्रांतिकारी घटना घडल्या. या भूमीतील परशुराम घार्गे, रामचंद्र सुतार,
शिदू पवार, आनंदा गायकवाड, श्रीरंग शिंदे, किसन भोसले, बलभीम खटावकर,
बाळकृष्ण खटावकर, हे १९४२ च्या लढ्यात हुतात्मे झाले. कित्येक जण जायबंदी
झाली. कित्येक तुरुंगात गेली. हे जवळ जवळ आपल्याला माहीत आहेच. कारण हे
आपल्यासाठी प्रेरणादायी बलिदान आहे. आज तालुक्यासाठी ही अभिमानाची गोष्ट
आहे. पण……..
.एक सांगावस वाटत. यांचं बलिदान एवढं असामान्य आहे तर त्यांचं
जगणं, त्यांचं लढण कस असेल! आणि हेच शोधण्याचं प्रयत्न या चरित्र ग्रंथाच्या
माध्यमातून किरण जाधव केला आहे.
सातारा,कोरेगाव, खटाव, वडगाव, बुध, नेर, पुसेगाव, पुसेसावळी या भागात भारत
मातेच्या सुपुत्रांनी जो लढा दिला तो खरच अविस्मरणीय आहे. पण हे वास्तव व सत्य
आहे. जे या आपल्या मातीत घडले. ज्याची साक्ष सांगणारे सगळे घटक आजही
अस्तित्वात आहेत. या लढ्यात लढलेली काही नररत्ने ही आजपर्यंत आपल्या सोबत
होती. त्यांनी लढलेल्या क्रांतिखणा आजही या भूमीवर आशाळभूत होऊन बेवारस पणे
निपचित पडून आहेत, की ज्यांची नोंद कोणी आणि कुठेच घेतली नाही. त्यांच्या नावाने ठिकठिकाणी उभी केलेली स्मारके आणि हुतात्मा स्तंभ अजूनही पुसट झालेल्या
आठवणी आपल्या अंगाखांद्यावर सांभाळण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत
आहेत.त्यांच्या चरित्र खुणा आणि जाणिवा जर आज स्पष्ठ झाल्या नाहीत, तर काही
वर्षांनी ही स्मारके आणि हे हुतात्मा स्तंभ म्हणजे फक्त आणि फक्त सिमेंट मातीचे
निर्जीव मनोरे उरतील. आणि हा या मातीचा लढा, आणि इतिहास कायमचा अंधारातच
राहील.आपल्या भूमिपुत्रांच्या पराक्रमाचा इतिहास आज आम्हाला समजला नाही आणि
येणाऱ्या पिढीमध्ये या क्रांतीवीरांच कार्य आणि आहूती बेवारसपणे संपणार असेल तर
इथून पुढे या भूमीत असे वीर कधी घडतील का? याची जाणीव आज या भूमीच्या
सज्ञान वारसास असण गरजेचं आहे. आणि म्हणून आपण आजच्या काळात ही शुद्ध
जाणिवेनं क्रांतीची मशाल हाती घेवून आपल्या मातीत घडलेल्या आणि मातीसाठी
लढलेल्या वीरांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय
घटनांच्या अगदी जवळ जावून त्यांना प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
स्वातंत्र्यपूर्व काळात इथल्या क्रांतीसिंहाने ब्रिटिशांच्या सैतानी राजवटी
समोर ‘पत्रीसरकार’ नावाचं मोठं आव्हान उभ केलं. आणि त्यानंतर भारताच्या
क्रांतिकारी इतिहासाची पाने क्रांतीयोध्यांच्या रक्ताने रंगू लागली.’ नाना पाटील’ या
सिंहाची डरकाळी संपूर्ण इंग्रजी सत्तेला हादरे देवू लागली. त्या आवाजाला साथ
देण्यासाठी या मातीतले वाघ उठून उभे राहिले. आणि वेगवेगळ्या गटामध्ये
पत्रीसरकारच्या सेना इंग्रजी सत्तेविरुद्ध धुडगूस घालू लागल्या. यापैकी एक.’ तुफान
सेना.’ सातारच्या पूर्व- दक्षिण भागात कार्यरत झाली. कोरेगाव भागात किसनवीर
आबा, बापू कचरे, संभाजीराव इंगळे, तात्याराव जाधव, नामदेवराव जाधव, वामनराव
फडतरे, आणि त्यांचे इतर सहकारी तर वडूज वडगाव भागात गौरिहर सिंहासने, रामचंद्र
सुतार आणि परशुराम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली सीताराम गोडसे, विठ्ठलराव काळे,
तलकचद शहा, यशवंत ठिगळे, रघु कांबळे, श्रीरंग शिंदे, रामा घार्गे, किसन भोसले आणि
त्यांचे इतर सहकारी हे वीर भारत मातेच्या रक्षणासाठी सज्ज झाले. वडगावच्या पांडा
पैलवांनाच्या तालमीत कुस्ती बरोबरच तलवारी, बंदुका, काठ्या, कुहाडी, दांडपट्टा
यासारखं लढावू शिक्षणात पोर तयार झाली. आणि ब्रिटिश अधिकारी हादरला.
ब्रिटिशांच्या छावण्या, डाक बंगले यावर हल्ले करून मुजोर अधिकाऱ्यास अड्डल
घडवणे, आगी लावणे, टेली फोनच्या तारा तोडणे, खजिना हस्तगत करणे, ब्रिटिशांना
मदत करणाऱ्या स्वदेशी दलालांचा बंदोबस्त करून त्यांना कायमची अद्दल घडवणे. परकीय सत्तेपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे वीर जीवाची बाजी लावून लढू
लागले.
या लोकांचं बलिदान महत्वाचं आहेच! पण ते घडले कसे? लढले कसे? हे ही
महत्वाचं आहे. लढणारा प्रत्येक क्रांतिकारक हा या भागातला होता. या भागातल्या दगड
मातीतून घडलेला रांगडा गडी होता. त्याचे देशप्रेम हे शुद्ध आणि प्रामाणिक होते.
मनगटातली ताकत, प्रचंड आत्मविश्वास आणि देशावरची निस्सीम भक्ती यांच्या
जोरावर त्यांचा लढा उभारला गेला होता.
‘नाना पाटील ‘ नावाच्या क्रांती वादळाला थोपावण्यासाठी चवताळलेल्या गोऱ्या
सायबांची पिलावळ अधिकच आक्रमक झाली. आणि गावोगावच्या भारतीय अस्मितेचे
लचके तोडू लागली. गावोगावच्या प्रत्यक सामान्य नागरिकांची साथ वीर भूमिपुत्रांना
मिळू लागली. यामुळे प्रत्यक सामान्य माणूस ब्रिटिश अत्याचाराला बळी पडू
लागला. पण त्यातून ही हा सामान्य माणूस धीराने या साऱ्या गोष्टी सहन करीत
गेला. त्याच धैर्य, सहनशीलता आणि देशाबद्दलचे प्रेम किती घट्ट होते. याची कल्पनाच
करता येत नाही.
१९४२ च्या चले जाव आंदोलनावेळी वडूज च्या मामलेदार कचेरीवर तिरंगा
फडकवन्यास निघालेला मोर्चा म्हणजे आज या खटाव तालुक्यातील प्रत्यक
माणसांसाठी अभिमानाचा आणि अस्मितेचा भाग आहे. कारण यामुळेच तालुक्यास
हुतात्म्यांची भूमी म्हणून देशात गणल गेलं. कारण असे संघर्ष उभे राहतात,
क्रांतिकारकांच्या असीम त्यागाच्या आधारावर! समोर मृत्यू असतानाही आपल्या
ध्येयापासून जराही विचलित न होता प्रचंड आत्मविश्वासाने आणि धैर्याने सामोरी
गेलेली ही माणसे नेमकी कोणत्या मुशीतून घडली होती? हा प्रश्न पडतो. ब्रिटिश
अधिकाऱ्यांच्या निष्ठुर, विकृत, पाशवी स्वभावाला न जुमानता, देशप्रेमाने ओथंबलेली
ही माणसे, अमानुष गोळीबाराला सामोरी जावून शेवटी आपल्याच रक्तात न्हाऊन
आपला देह तिरंग्याच्या साक्षीने या भूमीच्या चरणी अर्पण करतात ! हा प्रसंग मनावर
घर करून राहतो आणि आपल्या डोळ्यातील दाटून आलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून
देतो. आणि या मातीतल्या, मातीसाठी लढणाऱ्या क्रांतिवीरांची नावे हृदयात कायमची
कोरली जातात. आणि नव्याने अवतरतात पिवळ्या झालेल्या इतिहासाच्या पानांवर
झळाळकणारी सुवर्ण अक्षरे !
काळाच्या गर्भात होऊन गेलेल्या सगळ्याच घटना या फक्त भूतकाळ नसतात  त्यातल्या काही घटना ह्या जाज्वल्य इतिहास असतात. मात्र त्या भूतकाळातील
स्वातंत्र्याचा इतिहास घडवणाऱ्या क्रांतीवीरांचा आम्हाला आज विसर पडता कामा नये
कारण या भूमी पुत्रांच्या बलिदानाने या मातीला पावन केलं आहे. आणि ही मातीच
उद्याच्या पिढीला कायम त्यांच्या पराक्रमाची महती सांगत राहील.
जेव्हा या वीरांची शरीर तिरंग्याच्या साक्षीने याच मातीत शांत झाली होती. तेव्हा
मावळणारा सूर्य ही रडला होता. ही वेडी संताने देशासाठी हातात हात घालून
स्वातंत्र्याच्या वेदीवर यज्ञकुंडात समर्पित झाली होती. धन्य होती ती माऊली की जिच्या
पोटी ही वेडी संताने जन्मास आली होती की ज्यांची शरीर भिन्न होती पण आत्मा
एकच होता. सर्वसामान्यांचं मरण न्हवत ते! त्यांचे आत्मे अनंतात विलीन झाले
स्वर्गातून सकल देवतांनी पुष्प वर्षाव केला असेल. मंगल वाद्याच्या गजरात त्यांच्या
आत्म्यांच स्वागत झालं असेल. भारत मातेच्या या सुपुत्रासाठी यक्ष किन्नर यांनी
गाणी गायली असतील. म्हणून म्हणावंसं वाटतं…. अनामविरा जिथे जाहला, तुझा
जीवन अंत पंच प्राण विलीन झाले, हर्ष होई गगनात
धगधग हा यज्ञकुंड पेटला, ज्वाला देशा काशी
मुकपणाने तमी लोटल्या, संध्येच्या या रेषा
अनंतात या विलीन झाले, ना भय ना आशा
( श्री. किरण जाधव यांचा खटाव तालुक्यातील स्वातंत्र्य लढ्यावर आधारित, भागातील
भूमिपुत्रांची समर गाथा, म्हणून स्वातंत्र्याचे यज्ञकुंड हा ४०० पानांचा ऐतिहासिक ग्रंथ
९ सप्टेंबर हुतात्मा दिनी वडूज. ता. खटाव येथे प्रकाशित होत आहे. त्या अनुषंगाने हा
शब्द प्रपंच…..
….)
श्री. किरण जाधव.
संचालक. अंजनिसुत एज्युकेशन प्रा. ली.
धनश्री विद्यालय, वडूज. ता. खटाव.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button