आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई तालुक्यात सोयाबीनवर ‘लाल कोळी’चा हल्ला! पिकाच्या उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता; कृषी विभाग सतर्क, शेतकऱ्यांना तातडीने फवारणीचे आवाहन.

पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717484

1) वाई तालुक्यात सोयाबीनवर ‘लाल कोळी’चा हल्ला!
पिकाच्या उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता; कृषी विभाग सतर्क, शेतकऱ्यांना तातडीने फवारणीचे आवाहन.

वाई | दि. १० : वाई तालुक्यात सध्या बदलत्या वातावरणाचा परिणाम सोयाबीन पिकावर दिसून येत असून, अनेक ठिकाणी लाल कोळी या सूक्ष्म किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या किडीमुळे पिकाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने तालुका कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
लाल कोळी ही अतिशय सूक्ष्म व लालसर रंगाची कीड असून ती प्रामुख्याने सोयाबीनच्या कोवळ्या पानांच्या व शेंड्यांच्या मागील बाजूस आढळते. ही कीड पानातील रस शोषून घेत असल्याने पानांच्या कडा खाली वाकतात. परिणामी पानांना उलट्या होडीसारखा आकार येतो आणि पाने चुरगळल्यासारखी दिसू लागतात.
प्रादुर्भावाच्या सुरुवातीला पानांवर फिकट पांढरट किंवा पिवळसर ठिपके दिसतात. मात्र प्रादुर्भाव वाढत गेल्यास हे ठिपके लालसर-तपकिरी अथवा तांबूस डागांमध्ये रूपांतरित होतात. मोठ्या प्रमाणात रस शोषला गेल्याने पाने कोरडी पडून वाळतात आणि गळून पडतात.
याचा थेट परिणाम सोयाबीनच्या फुलधारणा, शेंगा लागणे आणि दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर होतो. पानांची अन्ननिर्मिती क्षमता कमी झाल्याने दाण्यांची वाढ व्यवस्थित होत नाही आणि परिणामी उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण होते.
पानांच्या मागील बाजूस करा पाहणी
शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन पिकाची नियमित पाहणी करावी. विशेषतः पाने उलटी करून त्यांच्या मागील बाजूस अगदी बारीक लालसर कोळी किंवा त्यांचे जाळे दिसत आहे का, याची तपासणी करावी. प्रादुर्भाव आढळल्यास तातडीने योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
‘सायनोपायराफेन’ फवारणीचा सल्ला
लाल कोळीच्या नियंत्रणासाठी सायनोपायराफेन ३० टक्के एस.सी. या कीटकनाशकाची प्रति लिटर पाण्यात ०.५ मिली या प्रमाणात फवारणी करण्याचा सल्ला तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वाई यांच्या वतीने देण्यात आला आहे.
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन पिकाची नियमित पाहणी करून किडीचा प्रादुर्भाव वेळीच ओळखणे आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

2) वाई:-ज्येष्ठ पत्रकार, सहकार व संत साहित्याचे अभ्यासक मधुसूदन नेने यांचे निधन.

वाईच्या सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता व सहकार क्षेत्राची मोठी हानी; विविध क्षेत्रांतून भावपूर्ण श्रद्धांजली.

सातारा | वाई, दि. १० : वाई अर्बन बँकेचे निवृत्त अधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि सहकार तसेच संत साहित्याचे गाढे अभ्यासक मधुसूदन दिनानाथ ऊर्फ मधु नेने (वय ७४) यांचे गुरुवारी (दि. १०) दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने वाईच्या सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता आणि सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मधु नेने यांनी वाई अर्बन बँकेत कर्मचारी व अधिकारी म्हणून प्रदीर्घ काळ उल्लेखनीय सेवा बजावली. बँकिंग आणि सहकार क्षेत्राचा सखोल अभ्यास असल्याने या क्षेत्रातील घडामोडींवर त्यांनी सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन केले. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी वाई परिसरातील स्थानिक, सामाजिक आणि सार्वजनिक प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली.
संत साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख होती. विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून त्यांनी केलेले वैचारिक, संशोधनात्मक व अभ्यासपूर्ण लेखन वाचकांच्या पसंतीस उतरले. ‘सज्जनगड’ मासिकाचे ते सध्या सहसंपादक म्हणून कार्यरत होते.
वाई अर्बन बँक, लोकमान्य टिळक स्मारक संस्था व ग्रंथसंग्रहालयाचे माजी अध्यक्ष व कार्यवाह, प्राज्ञ पाठशाळा, मराठी विश्वकोश, श्रीकृष्णाबाई संस्थान घाट उमामहेश्वर ऊर्फ गंगापुरी, कंझ्युमर्स सोसायटी, जनता अर्बन बँक यांसह विविध संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
वाई वसंत व्याख्यानमालेचे तब्बल २५ वर्षे कार्याध्यक्षपद त्यांनी समर्थपणे सांभाळले. वाई शहर व तालुका पत्रकार संघ तसेच मकरंद पत्रकार प्रतिष्ठानचे ते मार्गदर्शक होते. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला.
त्यांच्या निधनाने केवळ एका कुटुंबाचा आधार हरपला नसून, वाईच्या वैचारिक, साहित्यिक आणि सामाजिक चळवळीतील एक अभ्यासू, संयमी आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
त्यांच्या पार्थिवावर भीमकुंडआळी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वाईतील पत्रकारिता, सहकार, साहित्य, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

3) वाई:-एस.टी.आलीच नाही; २१ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित!
वाई-ओहोळी बसच्या अनियमिततेचा संतापजनक फटका; कमंडलू पंचक्रोशी विद्यालयाची आगारप्रमुखांकडे धाव.

सातारा | वाई, दि. ११ :
एस.टी. बससेवेच्या अनियमित कारभाराचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसत असल्याची गंभीर बाब वाई तालुक्यात समोर आली आहे. ऐन परीक्षेच्या दिवशी वाई-ओहोळी एस.टी. बस न आल्याने आसरे येथील कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयातील तब्बल २१ विद्यार्थी परीक्षेलाच मुकले. या प्रकारामुळे पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यालयाने आता थेट वाई आगार प्रमुखांकडे दाद मागितली आहे.
आसरे येथील कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयात चाकीरे वस्ती येथील १६ आणि घेराकेंजळ येथील ५, असे एकूण २१ विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी ये-जा करतात. या विद्यार्थ्यांसाठी वाई-ओहोळी हीच प्रमुख आणि एकमेव एस.टी. बससेवा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी नियमित प्रवासासाठी नियमानुसार एस.टी.चे पासही काढले आहेत.
मात्र, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी या विद्यार्थ्यांच्या अडचणीने गंभीर वळण घेतले. विद्यालयात इयत्ता दहावीची सहामाही परीक्षा तसेच इयत्ता सहावी ते नववीच्या घटकमूल्यमापन चाचण्या सुरू होत्या. अशा महत्त्वाच्या परीक्षेच्या दिवशीच वाई-ओहोळी एस.टी. बस वेळेत आली नाही. त्यामुळे बसवर अवलंबून असलेले २१ विद्यार्थी वेळेत शाळेत पोहोचू शकले नाहीत आणि त्यांना परीक्षेला गैरहजर राहावे लागले.
एस.टी. प्रशासनाच्या नियोजनातील ढिसाळपणाचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत असल्याने या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांनी पास काढूनही नियमित बससेवा मिळत नसेल, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी नेमके अवलंबून राहायचे कुणावर, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
भविष्यात अशा प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता यावे, यासाठी वाई-ओहोळी एस.टी. बस दररोज नियमित, वेळेत आणि कोणतीही पूर्वसूचना न देता बंद न ठेवता सुरू ठेवण्यात यावी, अशी मागणी कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा सामाजिक कार्यकर्ते सागर सणस यांनी निवेदनाद्वारे वाई आगार प्रमुखांकडे केली आहे.
परीक्षेच्या दिवशी बस बंद; आता पालकांचा संताप उफाळणार?
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी निगडित असलेल्या बससेवेबाबत आगार प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना न केल्यास पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न लक्षात घेऊन वाई आगार प्रशासन या बससेवेकडे किती गांभीर्याने पाहते, याकडे आता पालकांचे लक्ष लागले आहे.

4) वाईत ढोल-ताशांचा दणदणाट; गणेशोत्सवासाठी पथकांचा सराव शिगेला!

ताल-ठेक्याची जुगलबंदी रंगली; युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग, मिरवणुकीसाठी जय्यत तयारी.

सातारा | वाई, दि. ११ : गणेशोत्सवाच्या आगमनाची चाहूल लागताच वाई शहरातील वातावरण गणेशमय होऊ लागले असून, त्याला आता ढोल-ताशांच्या दणदणाटाची साथ मिळाली आहे. शहरातील विविध ढोल-ताशा पथकांचा सराव अंतिम टप्प्यात पोहोचला असून, सायंकाळच्या वेळी शहरातील विविध भागांतून घुमणारा लयबद्ध निनाद गणेशोत्सवाच्या उत्साहाची रंगत वाढवत आहे.
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत ढोल-ताशांचे वादन हे प्रमुख आकर्षण ठरते. त्यामुळे यंदा आपल्या पथकाचा ठेका अधिक अचूक, वादन अधिक प्रभावी आणि सादरीकरण अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी वादकांनी कंबर कसली आहे. दिवसभराचे काम, व्यवसाय आणि शिक्षण सांभाळून युवक-युवती सायंकाळी सरावासाठी एकत्र येत असून, तासन्‌तास अथक मेहनत घेत आहेत.
केवळ मोठा आवाज म्हणजे प्रभावी वादन नव्हे, तर तालातील अचूकता, ठेक्यातील सातत्य, हातांची एकसंध हालचाल आणि संपूर्ण पथकातील समन्वय याला ढोल-ताशा वादनात विशेष महत्त्व असते. याच बाबींवर भर देत विविध ताल, ठेके आणि वादनाच्या पद्धतींचा कसून सराव केला जात आहे. मिरवणुकीत वादन करताना लय कुठेही विस्कटू नये, यासाठी प्रत्येक वादकाकडून बारकाईने तयारी करून घेतली जात आहे.
वाई शहरातील श्रीमंतयोगी ढोल-ताशा पथक, धर्मपुरी प्रतिष्ठान आणि क्षत्रियकुलावतंस ढोल-ताशा पथक यांच्यासह विविध पथकांकडून गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. सरावाच्या मैदानावर ढोल-ताशांचा घुमणारा आवाज, वादकांचा जोश आणि ताल साधण्यासाठी सुरू असलेली धडपड यामुळे परिसरातील वातावरणही भारावून जात आहे.
विशेष म्हणजे, यंदाच्या सरावात युवकांसोबत युवतींचाही लक्षणीय सहभाग दिसून येत आहे. पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा उत्साह वाढवतानाच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याची जबाबदारीही ही तरुणाई प्रभावीपणे पार पाडताना दिसत आहे.
गणरायाच्या आगमनाची तारीख जवळ येत असताना सरावाला आणखी वेग आला आहे. प्रत्येक ठेका अचूक बसविणे, वादनात एकसंधपणा राखणे आणि मिरवणुकीत शिस्तबद्ध सादरीकरण करणे यासाठी पथकांचे सदस्य घाम गाळत आहेत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषासोबत वाईच्या रस्त्यांवर ढोल-ताशांचा दमदार निनादही अनुभवायला मिळणार, अशी उत्सुकता गणेशभक्तांमध्ये निर्माण झाली आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button