वाई:-परखंदी हायस्कूलमध्ये रोटरी क्लब ऑफ वाईतर्फे शाडू मातीचा गणपती बनविण्याची कार्यशाळा.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-परखंदी हायस्कूलमध्ये रोटरी क्लब ऑफ वाईतर्फे शाडू मातीचा गणपती बनविण्याची कार्यशाळा.

दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता परखंदी हायस्कूल येथे रोटरी क्लब ऑफ वाई तर्फे शाडू मातीपासून गणपती बनविण्याची कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात घेण्यात आली. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि स्वतःच्या हाताने गणपती घडविण्याचा आनंद त्यांना मिळवून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यशाळेत तब्बल ७४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेष म्हणजे, दरवर्षी रोटरी क्लब ऑफ वाईतर्फे हा उपक्रम राबविला जात असला, तरी यावर्षी पहिल्यांदाच सर्वाधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
रोटरी क्लबच्या अध्यक्षा रो. अनघा दातार व सचिव रो. अनुराधा जोशी यांच्या उपस्थितीत तसेच रो. डॉ. दातार, रो. डॉ. प्रेरणा, रो. मनिषा पोरे, रो. शुभदा नागपूरकर आणि रो. स्नेहा बागडे यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून सुबक गणपती बनविण्याचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने आणि कल्पकतेने गणपतीच्या मूर्ती साकारल्या.
या उपक्रमासाठी लागणारी शाडू माती रोटरी क्लब ऑफ वाईतर्फे उपलब्ध करून देण्यात आली. तब्बल १२० किलो शाडू मातीचा वापर या कार्यशाळेसाठी करण्यात आला.
आपल्या हाताने घडविलेली गणेशमूर्ती पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहणे हा उपस्थित रोटरी सदस्यांसाठी अत्यंत समाधानाचा क्षण होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपण बनविलेला गणपती यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या घरी पूजेसाठी ठेवणार असल्याचे सांगितले.
परखंदीसारख्या छोट्या गावातील ७४ विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तब्बल ७४ घरांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश पोहोचणार, ही या उपक्रमाची सर्वात मोठी आणि आनंदाची बाब आहे. एका कार्यशाळेतून केवळ गणपतीच्या मूर्ती तयार झाल्या नाहीत, तर पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सृजनशीलता आणि संस्कृतीची सुंदर सांगड विद्यार्थ्यांच्या मनात रुजली.
“आपल्या हाताने गणपती घडवूया, पर्यावरण वाचवूया आणि आनंदाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया!” हा संदेश देत रोटरी क्लब ऑफ वाईचा हा उपक्रम निश्चितच विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.




