औंध:-केंद्रशाळा कळंबीच्या विद्यार्थ्यांनी घेतली पोलीस प्रशासनाच्या कारभाराची माहिती.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

औंध:-केंद्रशाळा कळंबीच्या विद्यार्थ्यांनी घेतली पोलीस प्रशासनाच्या कारभाराची माहिती.

औंध:- खटाव तालुक्यातील एक उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या केंद्रशाळा कळंबीच्या विद्यार्थ्यांनी औंध पोलीस स्टेशनला भेट देत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुनील जानकर यांच्याकडून पोलीस स्टेशनमध्ये चालणाऱ्या विविध कामकाजाची माहिती घेतली.
पोलीस व विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद साधण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्यात भावी पिढीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून देणे, तसेच विद्यार्थी आणि पोलीस यांच्यात जवळीक निर्माण करून सामाजिक समतोल राखण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलीस स्टेशनमधील विविध विभाग व त्यांची कामे, तक्रार निवारण, नागरिक सुरक्षा, गुन्हे प्रतिबंध, नियंत्रण कक्ष तसेच पोलीस सहाय्यक क्रमांक याबाबत श्री. भादुले यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. विविध शस्त्रांची माहिती श्री. करंडे यांनी दिली.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी एपीआय श्री. सुनील जानकर यांची मुलाखत घेतली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी त्यांच्या वयानुसार समर्पक उत्तरे देत संवाद साधला.
*चौकट : मुलींनी पोलिसांना बांधली राखी*
केंद्रशाळा कळंबीच्या मुलींनी औंध पोलीस स्टेशनमधील सर्व पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधनाचा अनोखा संदेश दिला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री. मयेकर यांनी रिया अंबवडे या मुलीच्या शिक्षणाचा खर्च करण्याचे आश्वासन दिले.
पोलीसही प्रथम माणूस असतो आणि त्यांच्या ठिकाणीही माणुसकी व भावभावना असतात, याची प्रचिती देणारे अनेक भावनिक क्षण यावेळी पाहायला मिळाले.
*चौकट : आत्मविश्वासाने यश मिळविण्याचे आवाहन*
खेड्यातील मुलांनी स्वतःला कमी न लेखता अभ्यास, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर इच्छित यश कसे प्राप्त करता येते, याबाबत श्री. जानकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.
यावेळी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे तसेच मोबाईलचा अनावश्यक वापर टाळून त्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
*चौकट : प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले ज्ञान चिरकाल स्मरणात राहते*
विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानाबरोबरच स्वतःमधील कौशल्य विकसित करणे, व्यवहारिक ज्ञान मिळविणे आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी शाळेमार्फत असे उपक्रम राबविले जातात. प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले ज्ञान चिरकाल स्मरणात राहते. त्यामुळे ‘पोलीस आपले मित्र आहेत’ या भावनेतून हा उपक्रम घेण्यात आला, असे मुख्याध्यापक श्री. धनाजी थोरवे यांनी सांगितले.
यावेळी पोलीस पाटील हनुमंत सगरे, धनाजी ढोले, मुख्याध्यापक श्री. धनाजी थोरवे, राजेंद्र खोपडे, दीपक पावरा आणि संजय कोळी यांनी या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न केले.




