नाशिक:-भारतीय संस्कृतीच्या जागतिक प्रसारासाठी नाशिकमध्ये एकदिवसीय परिसंवाद.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दीलीप पुस्तके

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“भारतीय संस्कृतीची जागतिक ओळख अधिक भक्कम करण्याचा संकल्प; नाशिकमध्ये ६ सप्टेंबरला ‘आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारतीय संस्कृतीमधील आव्हाने आणि प्रतिभासंपन्न नागरिक म्हणून आमची भूमिका’ परिसंवाद”
भारतीय संस्कृतीच्या जागतिक प्रसारासाठी नाशिकमध्ये एकदिवसीय परिसंवाद.
नाशिक : वर्ल्ड असोसिएशन ऑफ हिंदू अकॅडेमिशियन्स (WAHA) आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पीएच.डी. धारक विद्वानांची सहभागात्मक “आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारतीय संस्कृतीमधील आव्हाने आणि प्रतिभासंपन्न नागरिक म्हणून आमची भूमिका” या विषयावर एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिसंवाद दि. ६ सप्टेंबर रोजी नाशिक येथे संपन्न होत आहे.
या परिसंवादामागील प्रमुख उद्देश भारतीय संस्कृती, हिंदुत्वाचा व्यापक वैचारिक वारसा आणि भारताची वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक ओळख याबाबत देश-विदेशातील अभ्यासक, संशोधक आणि प्राध्यापकांना एका व्यासपीठावर आणणे हा आहे.
WAHA ही कोणतीही राजकीय अथवा धार्मिक संघटना नसून, भेदरहित राष्ट्रभक्ती आणि भारतीय संस्कृतीने प्रेरित विचारमंच म्हणून कार्यरत असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. जागतिक पातळीवर भारतीय संस्कृती आणि हिंदुत्वाच्या विचारांवर होणाऱ्या विघटनात्मक आघातांना वैचारिक पातळीवर उत्तर देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
गेल्या काही वर्षांपासून भारतासह विविध देशांमध्ये विद्यापीठांच्या सहकार्याने परिसंवाद, व्याख्याने आणि शैक्षणिक चर्चा आयोजित करून विद्वानांना एकत्र आणण्याचे कार्य WAHA कडून केले जात आहे. या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील आध्यात्मिक परंपरा, धर्म, कुटुंबव्यवस्था, सण-उत्सव, सहिष्णुता आणि सामाजिक मूल्ये यांचा व्यापक अभ्यास केला जात आहे.
परिसंवादात राष्ट्रीय एकात्मता, विविधतेतील एकता, आध्यात्मिकता व धर्म, कुटुंबव्यवस्था व मूल्ये, सण व उत्सव, सहिष्णुता व लवचिकता या भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंवर चर्चा होणार आहे.
भारतात विविध भाषा, धर्म, जाती, रीतिरिवाज आणि भौगोलिक परिस्थिती असतानाही देशवासीयांमध्ये एकात्मतेची भावना टिकून आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आध्यात्मिक मूल्यांना विशेष महत्त्व असून जीवनाकडे केवळ भौतिक विकासाच्या दृष्टिकोनातून न पाहता आत्मिक शुद्धी आणि मोक्षप्राप्तीच्या दृष्टीनेही पाहिले जाते, यावर परिसंवादात विचारमंथन करण्यात येणार आहे.
तसेच भारतीय समाजव्यवस्थेत कुटुंबव्यवस्था, ज्येष्ठांचा आदर, लहानांवर प्रेम, संकटाच्या काळात एकमेकांना आधार देणे यांसारख्या मूल्यांना असलेले महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. दिवाळी, होळी, दसरा, ईद आदी सण-उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढण्यास मदत होते, यावरही चर्चा होणार आहे.
परिसंवादात देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर विद्वान सहभागी होणार असून, भारतीय संस्कृतीचा वैज्ञानिक व तर्काच्या आधारावर अभ्यास करून प्रतिभासंपन्न भारत निर्माण करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय संस्कृतीचा व्यापक वारसा, आधुनिक आव्हाने आणि जागतिक स्तरावर भारतीय नागरिकांची भूमिका यावर सखोल वैचारिक मंथन घडवून आणणारा हा परिसंवाद नाशिकच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
वाहा
संयोजक
डॉ ॐ प्रकाश कुलकर्णी
सह संयोजक
डॉ प्रमोद पवार
अनिल चांदवडकर
वाहा




