अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्दी निश्चित करणार – संजय कुंभार
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्दी निश्चित करणार – संजय कुंभार

शरद पवळे यांनी पुकारलेले शिव पाणंद शेतरस्ता ठिय्या आंदोलन आश्वासनानंतर स्थगित.
अहिल्यानगर,(राजकूमार इकडे) अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्दी निश्चित करून प्रलंबित मोजणी प्रकरणांना गती देण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, अहिल्यानगर संजय कुंभार यांनी दिले. आश्वासनानंतर महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी पुकारलेले ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.
पारनेर तालुक्यातील शेतरस्ते व जमिनीच्या मोजणीसंदर्भातील सुमारे २,५०० हून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्दी निश्चित करण्याची अनेक प्रकरणेही प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवळे यांनी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख विभाग, अहिल्यानगर यांना निवेदन सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
निवेदनात शेतरस्त्यांच्या हद्दी स्पष्ट नसल्यामुळे गावोगावी वाद निर्माण होत असून शेतीची कामे खोळंबत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत असल्याची बाबही अधोरेखित करण्यात आली. ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या अपेक्षेने भूमी अभिलेख कार्यालयात येत असले तरी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्यांना वारंवार कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असून त्यामुळे प्रशासनावरील विश्वास कमी होत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.
चळवळीच्या वतीने सर्व प्रलंबित शेतरस्ता व मोजणी प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, मोजणीसाठी विशेष मोहीम राबवून अतिरिक्त अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावेत, प्रत्येक प्रकरणासाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी, पूर्ण झालेल्या प्रकरणांचा अहवाल महसूल विभागाकडे सादर करावा, पारनेर कार्यालयात कायमस्वरूपी उपअधीक्षक व पुरेसे मोजणी कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत तसेच “रोड मॉडेल व्हिलेज” संकल्पनेअंतर्गत सर्व शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्दी निश्चित करून “मिशन झिरो पेंडन्सी” राबविण्याची मागणी करण्यात आली.
मागण्यांची दखल न घेतल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता जिल्हा अधीक्षकांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शरद पवळे यांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया व जिल्हा अधीक्षक संजय कुंभार यांना दिला होता. पारनेरसह जिल्ह्यात भुमापक कर्मचारी नेमले अमुन प्रसंबित प्रकरणांसाठी अधिकचे कर्मचारी नेमुन जिल्ह्यातील सर्व शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चितीची प्रक्रिया हाती घेण्याचे आणि प्रलंबित मोजणी प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्याचे आश्वासन जिल्हा अधीक्षक संजय कुंभार यांनी दिल्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले
यावेळी शरद पवळे, आशिष कासार, गणेश इंगळे, बाळासाहेब थोरात, पोपट शेळके, अक्षय जगताप, सचिन शेळके, सोमनाथ तोडमल, एकनाथ पवार, रामदास तनपुरे, विठ्ठल मिसाळ, दादासाहेब शिरसाठ, गोवर्धन शिरसाठ, कृष्णा चव्हाण, राजेंद्र शिरसाठ, जालिंदर आठरे, राहुल गट, आंबादास आव्हाड आणि विक्रांत कासार उपस्थित होते.




