वडगाव:-जयराम स्वामी मठास शासनाचा ‘ब’ वर्ग दर्जा; पाचशे वर्षांच्या अध्यात्मिक वारसाला नवी ओळख.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वडगाव:-जयराम स्वामी मठास शासनाचा ‘ब’ वर्ग दर्जा; पाचशे वर्षांच्या अध्यात्मिक वारसाला नवी ओळख.

मायणी प्रतिनिधी | खटाव
खटाव तालुक्यातील अध्यात्म, भक्ती आणि संतपरंपरेचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयराम स्वामी वडगाव येथील सुमारे ५०० वर्षे जुन्या जयराम स्वामी मठास महाराष्ट्र शासनाचा ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे हा दर्जा मंजूर झाल्याची माहिती मठाधिपती ह.भ.प. विठ्ठल स्वामी महाराज यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना विठ्ठल स्वामी महाराज म्हणाले की, जयराम स्वामी मठ हा ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा वारसा आहे. या मठाचा इतिहास सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचा असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा यांनी या मठास भेट देऊन त्याची दुरुस्ती केली होती, अशी ऐतिहासिक नोंद उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
मठ आणि मंदिर ही दोन्ही ठिकाणे स्वतंत्र असून मंदिर परिसरातील प्राचीन वावऱ्या (वारसा वास्तू) सध्या जीर्ण अवस्थेत आहेत. या ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे मतही विठ्ठल स्वामी महाराज यांनी व्यक्त केले. शासनाकडून ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्यामुळे भविष्यात या धार्मिक व ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध होऊन संवर्धनाच्या कामांना गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हा दर्जा मिळवून देण्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार धैर्यशील कदम, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती तेजस्विनी कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार, वर्धन ॲग्रोचे कार्यकारी संचालक विक्रम बाबा कदम, मार्केट कमिटीचे सभापती सी. एम. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव माळवे तसेच वडूज मार्केट कमिटीचे संचालक महेश घार्गे यांनीही मोलाचे सहकार्य व पाठपुरावा केला.
यशस्वी मंजुरीनंतर जयराम स्वामी मठात नामदार जयकुमार गोरे यांचा मठाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, भाविक, मठाचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयराम स्वामी मठास मिळालेला ‘ब’ वर्ग दर्जा हा केवळ मठासाठीच नव्हे तर संपूर्ण खटाव तालुक्याच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.




