संगमनेर:-विश्वकर्मा पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सभा उत्साहात – सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर; ३८.५६ लाखांचा नफा, २० कोटींच्या ठेवींचा टप्पा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

संगमनेर:-विश्वकर्मा पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सभा उत्साहात – सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर; ३८.५६ लाखांचा नफा, २० कोटींच्या ठेवींचा टप्पा.

संगमनेर (प्रतिनिधी) : सामान्य कारागीर, छोटे व्यावसायिक व सभासदांच्या आर्थिक उन्नतीचे ध्येय घेऊन कार्यरत असलेल्या विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेरची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे चेअरमन मा. श्री. संपत दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली विश्वकर्मा समाज महादेव मंदिर सभागृह, सुतार गल्ली, संगमनेर येथे झालेल्या सभेस स्वराज सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अमोलजी बाळासाहेब भागवत, नाशिक तसेच श्री. सुधाकरजी जोशी, चेअरमन, श्री भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँक, घुलेवाडी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात संस्थेने उल्लेखनीय आर्थिक प्रगती साधली आहे. दि. ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेच्या ठेवी २० कोटी ५ लाख ७० हजार रुपये, कर्ज १६ कोटी ९२ लाख २५ हजार रुपये, तर गुंतवणूक ७ कोटी ७६ लाख ९७ हजार रुपये इतकी झाली आहे. संस्थेला या आर्थिक वर्षात ३८ लाख ५६ हजार रुपयांचा नफा झाला असून, संस्थेची थकबाकी व एन.पी.ए.चे प्रमाण अत्यल्प आहे. आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार व प्रभावी कर्जवसुलीमुळे संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम झाली आहे.
सभेत संस्थेच्या आर्थिक प्रगतीची माहिती देण्यात आली. सभासदांच्या हिताचा विचार करून यावर्षी सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेच्या प्रगतीबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त केले.
सामान्य कारागीर व छोट्या व्यावसायिकांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने संस्थापक चेअरमन कै. भास्करराव वाकचोरे, कै. के. एम. भालेराव, कै. रामदास जानवेकर व कै. मुरलीधर गोरे यांच्या पुढाकारातून सन १९९२ मध्ये संस्थेची स्थापना झाली. सर्व आजी-माजी संचालकांनी सभासदांच्या हिताला प्राधान्य देत आर्थिक शिस्त व नियमांचे पालन केल्यामुळे आज संस्था स्वमालकीच्या इमारतीत व स्वभांडवलावर कार्यरत आहे.
संस्था गेल्या २२ वर्षांपासून संगणकीकृत असून सातत्याने ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त करत आहे. संस्थेला सलग तीन वर्षे बँको पुरस्कार मिळाल्याने संस्थेच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे.
सभासद व ग्राहकांना जलद, सुलभ आणि सुरक्षित सेवा मिळावी यासाठी संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. क्यूआर कोड, एसएमएस बँकिंग आदी डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सभासदांनी या विनामूल्य सुविधांचा अधिकाधिक वापर करून डिजिटल व्यवहारांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
वार्षिक सभेच्या निमित्ताने संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांमधील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गुणगौरव व बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला. उपस्थित मान्यवर व संचालक मंडळाच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पाण्याची बॉटल, वह्या, पेन व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आले. संस्थेचे संचालक अॅड. राजू बबनराव खरे यांनी अॅडव्हान्स डिप्लोमा इन जर्नालिझम (पत्रकारिता) अभ्यासक्रमात विद्यापीठात द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल, चि. आदित्य संतोष गोरे यांनी NID – National Institute of Design, Bhopal येथे पदवी पूर्ण केल्याबद्दल, वैष्णवी राजू खरे यांनी इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीचा डिप्लोमा व एल.एल.बी. पूर्ण करून वकिली व्यवसायास सुरुवात केल्याबद्दल, तसेच चि. स्वरेश सुधीर गाडेकर यांची MBBS अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
प्रमुख पाहुणे अमोलजी भागवत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करून विद्यार्थ्यांसह पालकांना मार्गदर्शन केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. श्री. सुधाकरजी जोशी यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचे, सभासदाभिमुख कारभाराचे व सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून सभासदांना अधिक चांगल्या सेवा देण्याच्या दृष्टीने संस्थेला शुभेच्छा दिल्या.
सभेच्या प्रारंभी व्हा. चेअरमन श्री. विजय सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले, त्यानंतर प्रमुख पाहुणे व संचालक मंडळाच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. श्री. महेश सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या प्रगतीचा व पुढील वाटचालीचा आढावा घेतला. अहवाल सालात निधन झालेल्या व्यक्तींना श्री. कैलास क्षीरसागर यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
वार्षिक सभेचे कामकाज व्यवस्थापक श्री. अरुण उदमले यांनी पार पाडले. सभेत सभासद डॉ. गोरक्ष राऊत, भाऊसाहेब क्षीरसागर, विजय घेवारे, किरण वाकचौरे आदींनी विविध प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना चेअरमन श्री. संपत सूर्यवंशी, श्री. देविदास गोरे सर व श्री. राजेश वाकचौरे यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
संस्थेने अहवाल सालात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीबद्दल सभासदांच्या वतीने चेअरमन श्री. संपत सूर्यवंशी व कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला.
सभेस संदीप वाकचौरे सर, डी. डी. वाकचौरे साहेब, संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार, हितचिंतक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन श्री. राजेश वाकचौरे सर व श्री. विलास सूर्यवंशी यांनी केले.
सभेच्या यशस्वी आयोजनासाठी व्हा. चेअरमन श्री. विजय सूर्यवंशी, व सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.




