फलटण:-“जुन्या वादाचा रक्तरंजित सूड!” फलटणमध्ये १९ वर्षीय तरुणाचे अपहरण करून प्राणघातक हल्ला; जमीन व साक्षीचा राग, ६ जणांवर गुन्हा.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 820871748

1) फलटण:-“जुन्या वादाचा रक्तरंजित सूड!”
फलटणमध्ये १९ वर्षीय तरुणाचे अपहरण करून प्राणघातक हल्ला; जमीन व साक्षीचा राग, ६ जणांवर गुन्हा.

फलटण दि. १३ :
फलटण शहरात जुन्या वादातून एका १९ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर धारदार शस्त्र, लाथाबुक्क्या आणि दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या यश किसन नरुटे (रा. भिवरकरवाडी धुळदेव, फलटण) याच्यावर साई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जमीन करारात यश नरुटे हा जामीनदार होता. तसेच दुसऱ्या एका गुन्ह्यात त्याने आरोपींच्या विरोधात साक्ष दिल्याचा राग संबंधितांनी मनात धरला होता. याच कारणावरून आरोपींकडून त्याला वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
९ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास यश रविवार पेठेत काम करत असताना शेवन जाधव, सुमित पवार आणि ऋतिक पवार यांनी “काम आहे” असे सांगून त्याला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून बारामती पूल ते पंढरपूर पूलदरम्यानच्या कॅनॉल परिसरात नेले.
तेथे विवेक पवार व शेवन जाधव यांनी “तू ननावरेचे का ऐकले नाही, आता तुला जिवंत ठेवत नाही,” अशी धमकी देत त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने डोक्यावर आणि कानामागे वार करण्यात आले. जीव वाचवण्यासाठी यश पळत असताना त्याच्यावर पाठीमागून दगड फेकूनही हल्ला करण्यात आला.
या प्रकरणी अर्जुन ननावरे, सूरज ननावरे, शेवन जाधव, सुमित पवार, ऋतिक पवार आणि विवेक पवार (सर्व रा. सोमवार पेठ, फलटण) यांच्याविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अयोध्या घोरपडे करत आहेत.
2) खंडाळा:-पावसापासून बचावासाठी झाडाखाली थांबले… पण काळाने गाठलं! भरधाव दुचाकीच्या धडकेत ५७ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू.

सातारा | खंडाळा, दि. १३ : पावसापासून बचाव करण्यासाठी रस्त्याच्या कडेला झाडाखाली थांबलेल्या एका ५७ वर्षीय पादचाऱ्याचा भरधाव दुचाकीच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना खंडाळा तालुक्यातील जवळे-कवठे मार्गावर घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून भरधाव वाहनचालकांच्या बेफिकीरपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मृत व्यक्तीचे नाव दिलीप दादासाहेब पाटील (वय ५७, रा. जवळे, ता. खंडाळा) असे आहे. याप्रकरणी त्यांचे भाऊ दत्तात्रय दादासाहेब पाटील यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.३५ वाजता अचानक पाऊस सुरू झाल्याने दिलीप पाटील हे जवळे गावच्या हद्दीतील गोविंद बाग बंगल्याजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली थांबले होते. त्याचवेळी कवठेहून जवळेकडे भरधाव वेगाने येणाऱ्या महेश मंगेश पथाडे (रा. कण्हेरी, ता. खंडाळा) याने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करत दुचाकी चालवली आणि थेट पाटील यांना जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत दिलीप पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते बेशुद्ध पडले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. अपघातात दुचाकी चालकही जखमी झाला आहे.
या प्रकरणी खंडाळा पोलिसांनी संबंधित दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार दत्तू दिघे पुढील तपास करत आहेत.




