वाई:-स्वतःला ओळखून, देशसेवेत समर्पित व्हा – मा. अविनाश धर्माधिकारी – वाईच्या जनता शिक्षण संस्थेचा ५९ वा वर्धापनदिन संपन्न.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-स्वतःला ओळखून, देशसेवेत समर्पित व्हा – मा. अविनाश धर्माधिकारी – वाईच्या जनता शिक्षण संस्थेचा ५९ वा वर्धापनदिन संपन्न.

भारतीय संस्कृतीत नमस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचा खरा अर्थ माझ्यातील ईश्वरी चैतन्याचा तुमच्यातील ईश्वरी चैतन्याला नमस्कार असा होतो. प्रत्येकाने स्वतःमधील चैतन्य ओळखून देशासाठी समर्पण द्यायला हवे असे प्रतिपादन पुणे येथील चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक-संचालक व माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार नारायण चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
धर्माधिकारी म्हणाले, ही संस्था थोर स्वातंत्र्यसेनानी किसन वीर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रतापराव भोसले, विठ्ठलराव जगताप व नेतेमंडळी यांच्या त्यागातून उभा राहिली आहे. त्यांच्या चरणाशी बसून, भविष्याचा वेध घेण्याचा आजचा दिवस आहे. या धुरिणांनी शिक्षणाची गंगा वाईमध्ये आणली, त्याला आता कौशल्याची आणि तंत्रज्ञानाची जोड देण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी मी सहकार्य द्यायला तयार आहे. आपल्यातील चैतन्य ओळखणे आणि ते वापरणे हेच खरी शिक्षण आहे. वाई हे भारताचे आणि महाराष्ट्राचे तीर्थक्षेत्र आहे. इथे मोठा ज्ञानाचा वारसा आहे. येथील लोक स्वार्थासाठी नाही तर दुसऱ्यासाठी जगले आहेत. त्यांचे स्मरण ठेवून स्वतःला घडवणे हे आपले कर्तव्य आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करताना ते म्हणाले, त्यांचे अभिनंदन तर आहेच , परंतु त्यांनी समाधानी न राहता आणि सत्कार आपल्या डोक्यात जाऊ न देता भारतमातेच्या चरणावर यश समर्पित करावे आणि आपले व्यक्तिमत्त्व घडवावे. आपल्या भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना विचारांची आणि आचाराची त्रिसूत्री दिली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात मदनदादा भोसले म्हणाले, धर्माधिकारी यांचा कामाचा आवाका, दूरदृष्टी पाहता त्यांना भारतमातेचा कार्यकर्ता असे म्हणावे वाटते. अविनाश धर्माधिकारी हे लेखक, कवी, वक्ता, संघटक, विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून देशात परिचित आहेत. त्यांच्या चाणक्य मंडल परिवाराच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धापरीक्षेत यश संपादन केले आहे. त्यामुळे आपल्याला त्यांची गरज भासणार आहे. संस्थेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी संस्थेचा पाया रचलेला आहे आपल्याला आता त्यावरती कळस चढवायचा आहे. त्यासाठी आपण सर्वजण सज्ज होऊया.
सदर कार्यक्रमात संस्थेच्या कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयात व माध्यमिक विद्यालयांत गुणानुक्रमे प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, दहावीचा शंभर टक्के निकाल लावलेल्या मुख्याध्यापकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
अविनाश धर्माधिकारी यांनी विद्यार्थी, प्राध्यापक, ग्रामस्थ यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांची पाहुण्यांचा परिचय करून दिला. अॅड्. प्रताप देशमुख यांनी आभार मानले. हरेश कारंडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन केले. राहुल तायडे, रेश्माबानो मुलानी, सुमित वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास आजी-माजी प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी एन. सी. सी. छात्र व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
चौकट
दादांची साद आणि सरांचा प्रतिसाद
आम्ही आमच्या पातळीवर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवीत आहोत परंतु या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, सॉफ्ट स्किलचे धडे देताना आम्हाला मर्यादा येत आहेत. अशी खंत दादांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. तोच धागा पकडून धर्माधिकारी सरांनी आपल्या भाषणातून चाणक्य मंडल मधील तज्ज्ञ व्यक्ती वाईतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील असे आश्वासन दिले. दादांच्या सादाला सरांचा प्रतिसाद मिळाल्याने, उपस्थितांनी धर्माधिकारी सरांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.




