सिंधुदुर्ग:-कणकवली नरडवे रोडवरील स्टॉल धारकांना कणकवली मुख्याधिकाऱ्यांचा दणका.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सिंधुदुर्ग:-कणकवली नरडवे रोडवरील स्टॉल धारकांना कणकवली मुख्याधिकाऱ्यांचा दणका.

गेली अनेक वर्षे स्टॉलने व्यापलेल्या जागेने घेतला मोकळा श्वास.
कणकवली शहरातील नरडवे रोडवरील नगरपंचायत च्या आरक्षित असलेल्या व आता ताब्यात आलेल्या जागेमध्ये असलेल्या स्टॉल हटाव मोहिमेला आज सायंकाळी अचानक मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सुरू करण्यात आली. या अचानक सुरू केलेल्या कारवाईमुळे स्टॉल धारकांची एकच धावपळ उडाली. यापूर्वी येथील स्टॉल धारकांना नोटीस बजावण्यात आली होती त्यानंतर मध्यंतरी बराच कालावधी गेला परंतु आज अचानक सायंकाळी कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली दोन जेसीबीच्या साह्याने उपजिल्हा रुग्णालयासमोरील भाग तसेच नरडवे नाका पर्यंतच्या नाका या भागातील स्टॉल हटवण्यात आल्याने अनेक स्टॉलधारकांनी मात्र गेले अनेक वर्ष थाटलेली दुकाने रस्त्यावर आली आहेत. नगरपंचायतच्या या कारवाईमुळे या कॉलनी व्यापलेल्या जागेने एक मोकळा श्वास देखील घेतला आहे. नगरपंचायतचे कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी झाले होते.
2) सावंतवाडी:-पालकमंत्री नितेश राणेंचा ठेकेदाराला सज्जड दम; ५७ कोटींच्या नळपाणी योजनेतील निकृष्ट कामावर कारवाईचे संकेत.

सावंतवाडी शहरातील ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेच्या कामातील हलगर्जीपणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या योजनेअंतर्गत ठेकेदाराने रस्त्यांमध्ये चर खोदल्यानंतर केवळ खडीकरण करून डांबरीकरण न केल्याने अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना अपघात होऊन दुखापती झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
या गंभीर प्रकाराची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी नुकतीच मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची आणि ठेकेदाराची बैठक घेतली. बैठकीत निकृष्ट कामाबाबत ठेकेदाराला त्यांनी चांगलेच धारेवर धरत कडक शब्दांत जाब विचारला. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही दिला.
यावेळी पालकमंत्री राणे यांनी नळपाणी योजनेच्या कामाची गुणवत्ता तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिले. तसेच आवश्यक त्या सुधारणा तातडीने करून दोषी आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर, पीएमसीचे प्रतिनिधी तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या कडक भूमिकेनंतर संबंधित ठेकेदाराने तत्काळ शहरातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले असून, पुढील काळात रस्त्यांचे डांबरीकरण दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. नागरिकांनीही निकृष्ट काम करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.




