वाई:-“घाट कोसळला… प्रशासन झोपलं!” दरड हटवायला नागरिकच धावले; वाई–पाचगणी घाटात जीव मुठीत धरून प्रवास.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“घाट कोसळला… प्रशासन झोपलं!” दरड हटवायला नागरिकच धावले; वाई–पाचगणी घाटात जीव मुठीत धरून प्रवास.

सातारा | वाई, दि. ०३ : मुसळधार पावसाने वाई–पाचगणी घाटाला जोरदार तडाखा दिला असून बुवासाहेब मंदिरानजीक अचानक मोठी दरड कोसळल्याने घाटमार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. डोंगरावरील मोठमोठे दगड आणि माती थेट रस्त्यावर आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र हा अपघात थोडक्यात टळल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरड कोसळल्याची माहिती मिळताच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. सरकारी यंत्रणा येण्याची वाट न पाहता त्यांनी स्वतःच फावडे आणि हातांच्या जोरावर रस्त्यावर पडलेले दगड व माती बाजूला करून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला. त्यांच्या धाडसी आणि तत्पर प्रयत्नांमुळे संथ गतीने वाहतूक पुन्हा सुरू झाली.
मात्र, घटना घडून बराच वेळ उलटूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याने संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “संकटाच्या वेळी प्रशासन गायब आणि नागरिकच रस्त्यावर!” अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे.
सध्या घाट परिसरात मुसळधार पाऊस आणि दाट धुके कायम असून आणखी दरड कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे वाई–पाचगणी घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, वेगावर नियंत्रण ठेवावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




