वाई:-एकसर – भरधाव डंपरचा बळी; एकसर अपघाताने पश्चिम भाग शोकसागरात “आज अभिजीत गेला… उद्या आणखी कोणाचा जीव जाऊ नये!”
पत्रकार अनिल वाडकर सातारा जिल्हा संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

भरधाव डंपरचा बळी; एकसर अपघाताने पश्चिम भाग शोकसागरात
“आज अभिजीत गेला… उद्या आणखी कोणाचा जीव जाऊ नये!”

वाई:- एकसर (ता. वाई) येथे झालेल्या भीषण अपघातात मालादपूर गावचे सुपुत्र अभिजीत वाडकर यांचे दुर्दैवी निधन झाले. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण पश्चिम भागावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एका आई-वडिलांचा आधार, कुटुंबाचा लाडका मुलगा आणि समाजातील एक उमदा तरुण काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
अभिजीत यांच्या निधनाची बातमी समजताच मालादपूरसह परिसरातील नागरिकांनी दुःख व्यक्त केले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि वाडकर कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी भावना व्यक्त होत आहे.
मात्र, ही श्रद्धांजली केवळ शब्दांपुरती मर्यादित राहू नये, अशीही नागरिकांची अपेक्षा आहे. कारण गेल्या काही काळापासून पश्चिम भागात डंपर चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. भरधाव वेगाने धावणारे डंपर नागरिकांच्या जीवितासाठी मोठा धोका निर्माण करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पसरणी गावाला जोडणारा मुख्य रस्ता गणेश पेठ, मालकमपेठ आणि कोलण परिसरातून जातो. या मार्गावरून दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक प्रवास करतात. अशा परिस्थितीत भरधाव डंपरमुळे प्रत्येक क्षणी अपघाताची भीती निर्माण होत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, या मार्गावर तातडीने स्पीड ब्रेकर उभारणे, वेगमर्यादा निश्चित करणे, वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करणे तसेच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.
नागरिकांनीही हा विषय राजकारणाच्या चौकटीत न पाहता मानवी जीविताच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न म्हणून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. आज एका घरातील दिवा विझला आहे; उद्या आणखी कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये, यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.




