वाई:-४८ तासांत चार्जशीट! वाई पोलिसांचा वेगवान तपास; अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपी जेरबंद.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-४८ तासांत चार्जशीट! वाई पोलिसांचा वेगवान तपास; अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपी जेरबंद.

वाई येथील महागणपती घाट परिसरात ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला वाई पोलिसांनी तात्काळ अटक करत अवघ्या ४८ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांच्या या वेगवान आणि संवेदनशील कारवाईमुळे नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ जून २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या गंभीर घटनेनंतर वाई पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपास आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अल्पावधीतच ताब्यात घेतले. या प्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी स्वतः तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब यांचे बारकाईने संकलन करून कायदेशीरदृष्ट्या भक्कम पुरावे उभे करण्यात आले.
सामान्यतः अशा प्रकारच्या संवेदनशील गुन्ह्यांच्या तपासासाठी बराच कालावधी लागतो. मात्र पीडितेला लवकर न्याय मिळावा या उद्देशाने पोलिसांनी दिवस-रात्र परिश्रम घेत तपास पूर्ण केला आणि अवघ्या ४८ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली.
ही कारवाई निखिल पिंगळे आणि वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात जितेंद्र शहाणे, अमोल गवळी, सपना दांगट यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
वाई पोलिसांच्या या तत्पर, प्रभावी आणि संवेदनशील कारवाईमुळे पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली असून, गुन्हेगारांविरुद्ध कठोर संदेशही गेला आहे. नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून या कामगिरीचे स्वागत करण्यात येत आहे.
2) वाई:-‘संकल्प न्यूज’चे संपादक अशोक इथापे यांना महाराष्ट्र शासनाची अधिस्वीकृती; पत्रकारितेतील कार्याची दखल.

वाई दि. ०५ : वाई येथील ‘संकल्प न्यूज’ साप्ताहिकाचे मालक-संपादक तथा संकल्प मीडिया समूहाचे प्रमुख अशोक इथापे यांना महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल अधिस्वीकृती प्रदान करण्यात आली आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रामाणिक, समाजाभिमुख आणि विश्वासार्ह पत्रकारिता करत असलेल्या इथापे यांच्या कार्याचा हा सन्मान मानला जात असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
3) वाई:-कोट्यवधींची कामे, पण निचऱ्याचा बोजवारा; वाईची ‘गटारगंगा’ पुन्हा तुडुंब!

गुलाबराव खामकर पथावर गुडघाभर पाणी; नागरिक, रुग्णवाहिका आणि भाविकांना मोठा फटका.
सातारा |
वाई, दि. ०५ : गुरुवारी वाई शहर आणि तालुक्यात झालेल्या मुसळधार वादळी पावसाने वाई नगरपरिषदेच्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्याच मुसळधार पावसात शहरातील ब्राह्मणशाही परिसरातील गुलाबराव खामकर पथ या प्रमुख मार्गावर गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.
गटार व्यवस्थेवरील लाखो-कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. अपुऱ्या आणि त्रुटीपूर्ण निचरा व्यवस्थेमुळे रस्त्यावर पाणी साचून संपूर्ण परिसराला ‘गटारगंगे’चे स्वरूप प्राप्त झाले. परिणामी स्थानिक रहिवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली.
विशेष म्हणजे गुलाबराव खामकर पथ हा ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग असून मांढरदेवला जाणाऱ्या भाविकांचीही याच मार्गावरून मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आणि रुग्णवाहिकांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागला.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गटार व्यवस्थेतील दोष आणि अपुरे नियोजन यामुळे दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते. याबाबत वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्याचबरोबर ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याने व्यापारी वर्गालाही आर्थिक फटका बसत असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, संबंधित गटार कामाची चौकशी करून दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी तसेच प्रभावी निचरा व्यवस्था उभारून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
4) वाईत ‘अन्न व औषध’ प्रशासनाचा गांधारी अवतार; भेसळखोर-गुटखा माफियांचा उच्छाद!
सातारा |
वाई, दि. ०५ : वाई शहरात वाढत चाललेली अस्वच्छ खाद्यपदार्थ विक्री, भेसळयुक्त अन्नपदार्थांचा सुळसुळाट आणि अवैध गुटखा विक्रीच्या प्रश्नांकडे अन्न व औषध प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. राज्यभर धडक कारवाया सुरू असताना वाईत मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने प्रशासनाने डोळे असूनही गांधारीचा अवतार धारण केला आहे का, असा संतप्त सवाल वाईकर उपस्थित करत आहेत.
शहरातील अनेक हातगाड्या, फळविक्रेते, चायनीज स्टॉल आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असल्याचे चित्र आहे. खाद्यपदार्थ तळण्यासाठी वापरले जाणारे तेल किती वेळा वापरले जाते, पिण्याच्या पाण्याचा स्रोत कोणता आहे, अन्न तयार करताना स्वच्छतेचे निकष पाळले जातात का, याची तपासणी प्रशासनाकडून नियमितपणे केली जाते का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.
मिठाई व्यवसायाबाबतही नागरिकांमध्ये गंभीर शंका व्यक्त केल्या जात आहेत. खवा, दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासली जाते का? मिठाई तयार करणाऱ्या ठिकाणी स्वच्छतेचे नियम पाळले जातात का? की ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे? याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने संशय अधिकच वाढत आहे.
वाईतील अनेक हॉटेल्स आणि मंगल कार्यालयांमध्ये दररोज हजारो लोकांसाठी अन्न तयार केले जाते. या ठिकाणी वापरले जाणारे पनीर, क्रीम आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रशासनाने किती वेळा भेटी दिल्या, किती नमुने तपासले आणि किती जणांवर कारवाई केली, याची माहिती जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे.
नागरिकांच्या मते, अनेक वर्षांनंतर एखादी कारवाई केली जाते, तीही केवळ वरिष्ठांना आकडेवारी दाखवण्यासाठी. प्रत्यक्षात नियमभंग करणाऱ्यांवर सातत्याने कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे.
दुसरीकडे, शहरात आजही मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा उपलब्ध होत असल्याचे वास्तव आहे. अलीकडील काही कारवायांनंतरही अनेक ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचा आरोप असून, शालेय विद्यार्थी आणि तरुण या व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे काही अवैध धंदे करणाऱ्यांना संबंधित विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याची चर्चा शहरात उघडपणे सुरू आहे. या चर्चांची सखोल चौकशी झाल्याशिवाय भेसळ आणि गुटखा विक्रीला आळा बसणार नाही, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भेसळखोर आणि गुटखा माफियांविरोधात धडक मोहीम राबविली आहे. त्याच धर्तीवर वाई तालुका आणि सातारा जिल्ह्यातही संयुक्त तपासणी मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.
वाईकर जनतेचा प्रश्न सरळ आहे—जर शहरात इतक्या वर्षांपासून हे प्रकार सुरू होते, तर अन्न व औषध प्रशासनाला ते दिसले कसे नाहीत? की जाणूनबुजून अर्थपूर्ण डोळेझाक करण्यात आली? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळेपर्यंत प्रशासनावरील संशय अधिकच गडद होत जाणार आहे. भेसळखोर, गुटखा विक्रेते आणि अस्वच्छ खाद्यव्यवसायांवर तातडीने कठोर कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करावा, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र जनक्षोभ उसळेल, असा इशारा वाईकर जनतेने दिला आहे.




