पारनेर:-शिव पाणंद शेतरस्ता चळवळीमुळे ग्रामविकासाची नवी दिशा – जयसिंगभाऊ मापारी (सरपंच, राळेगणसिद्धी)
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिव पाणंद शेतरस्ता चळवळीमुळे ग्रामविकासाची नवी दिशा – जयसिंगभाऊ मापारी (सरपंच, राळेगणसिद्धी)

राज्याला दिशादर्शक ठरलेल्या राळेगणसिद्धी–नारायणगव्हाण शिवरस्त्याच्या मजबुतीकरणाचा शुभारंभ.
सुपा,पारनेर -(राजकुमार इकडे)
अखेर शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या ऐतिहासिक लढ्याला यश मिळाले असून, महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे.
तमाम शेतकरी बांधवांच्या आशीर्वादाने ज्या राळेगणसिद्धी–नारायणगव्हाण शिवरस्त्याच्या संघर्षातून महाराष्ट्रातील शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचा जन्म झाला, त्या ऐतिहासिक रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा केवळ एका रस्त्याचा शुभारंभ नसून हजारो शेतकऱ्यांच्या संघर्ष, त्याग आणि एकजुटीचा विजय आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी राळेगणसिद्धी व नारायणगव्हाण ग्रामस्थांचे आभार मानत सांगितले की, या शिवरस्त्यामुळेच राज्यव्यापी चळवळ उभी करण्याची प्रेरणा मिळाली. पारनेर तालुक्यातून सुरू झालेला हा लढा आज राज्यभर पोहोचला असून, हजारो शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी व्यासपीठ निर्माण झाले आहे.
शेतरस्त्यांच्या प्रश्नावर शासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय मिळविण्यासाठी अनेक वर्षे सातत्याने संघर्ष करावा लागला. या प्रवासात अनेक प्रशासकीय अडथळे, विलंब आणि मनस्ताप सहन करावा लागला. मात्र ॲड. प्रतिक्षा काळे यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे न्यायालयीन लढ्याला यश मिळाले आणि न्यायाचा मार्ग मोकळा झाला.
यावेळी शरद पवळे यांनी आपला संकल्प पुन्हा एकदा व्यक्त करत सांगितले –
“माझा रस्ता होवो अथवा न होवो, जोपर्यंत माझ्या शेवटच्या शेतकरी भावाला दर्जेदार शेतरस्ता मिळत नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की, स्वतःचा प्रश्न सुटला म्हणून संघर्ष थांबविणार नाही. राज्यातील प्रत्येक गरजवंत शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी नव्या जोमाने काम सुरू राहील. आज अनेक तालुके व जिल्ह्यांमध्ये शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे पदाधिकारी निस्वार्थ भावनेने कार्य करत असून शेतकऱ्यांच्या हक्काच्या रस्त्यांसाठी लढा देत आहेत.
याप्रसंगी सरपंच जयसिंगभाऊ मापारी यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करून दर्जेदार व टिकाऊ रस्ता उभारण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, “शिव पाणंद शेतरस्ता चळवळीमुळे ग्रामीण भागातील विकासाला नवी दिशा मिळाली असून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अशा उपक्रमांना ग्रामपंचायतीची पूर्ण साथ राहील.”
राळेगणसिद्धी–नारायणगव्हाण शिवरस्त्याच्या मजबुतीकरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दळणवळणाची अधिक चांगली सुविधा उपलब्ध होणार असून, हा रस्ता राज्यातील शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रेरणास्थान म्हणून कायम स्मरणात राहणार आहे.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंगभाऊ मापारी, उपसरपंच संपतराव उगले, भाऊसाहेब गाजरे, संभाजी गाजरे, विजय गाजरे, शरद मापारी, गणेश पठारे, रुपेश फटांगडे, सागर पठारे, सोमनाथ फटांगडे तसेच शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे राज्य प्रसिद्धीप्रमुख रविंद्र खुडे, विजय शेलार, दशरथ वाळूंज, बबन गुंड, संजय साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
“शेत तिथे रस्ता – गाव तिथे समृद्धी” या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार देणारा हा ऐतिहासिक क्षण शेतकरी चळवळीच्या इतिहासात प्रेरणादायी ठरणार आहे.




