वाई:-‘उत्कर्ष’च्या सर्व १० शाखांमध्ये स्व. आनंद (आण्णा) कोल्हापुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

‘उत्कर्ष’च्या सर्व १० शाखांमध्ये स्व. आनंद (आण्णा) कोल्हापुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

आण्णांनी जपलेला मूल्यांचा वारसा पुढे नेण्याचा ‘उत्कर्ष’ परिवाराचा संकल्प.
सातारा |
वाई दि. २४ : उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, दूरदर्शी नेतृत्व आणि समाजाभिमुख विचारसरणीचे प्रणेते स्व. आनंद (आण्णा) कोल्हापुरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेच्या सर्व दहा शाखांमध्ये त्यांना अत्यंत श्रद्धापूर्वक आणि भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रत्येक शाखेत स्व. आण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या गौरवशाली कार्याचे स्मरण करण्यात आले. या निमित्ताने संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि सभासदांनी स्व. आण्णांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा पुढे नेण्याचा दृढ संकल्प केला.
संस्थेच्या मुख्य शाखेत आयोजित मुख्य कार्यक्रमात वातावरण अत्यंत भावूक आणि प्रेरणादायी होते. स्व. आण्णांनी संस्थेच्या स्थापनेपासून सर्वसामान्य नागरिकांना विश्वासार्ह आर्थिक सेवा देण्यासाठी केलेले अथक प्रयत्न आणि त्यांच्या दूरदृष्टीचा मान्यवरांनी विशेष उल्लेख केला.
यावेळी बोलताना संस्थेच्या चेअरमन सौ. अनुराधा कोल्हापुरे यांनी स्व. आण्णांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, “आण्णांनी अपार कष्ट, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेच्या भावनेतून ‘उत्कर्ष’चे जे रोपटे लावले होते, आज त्याचा भव्य वटवृक्ष झाला आहे. हजारो सभासदांचा विश्वास हीच त्यांची खरी कमाई आहे. त्यांनी घालून दिलेल्या मूल्यांवर आणि तत्त्वांवर चालत संस्थेचा विस्तार करण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ आणि कर्मचारी पूर्ण निष्ठेने कार्यरत आहेत. आण्णांचे विचार हेच आमचे बळ आहे.”
संस्थेचे ज्येष्ठ सभासद खंडागळे गुरुजी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आण्णांनी जपलेली माणुसकी, प्रामाणिकपणा आणि समाजाप्रती असलेली तळमळ आजही आम्हाला प्रेरणा देते. उपस्थित इतर मान्यवरांनीही, स्व. आण्णांच्या नेतृत्वामुळेच उत्कर्ष पतसंस्था केवळ आर्थिक संस्था न राहता सामाजिक बांधिलकी जपणारी एक विश्वासार्ह चळवळ बनली असल्याचे नमूद केले. पारदर्शक कारभार, तंत्रज्ञानाचा वापर आणि सामाजिक उपक्रम यांमुळे संस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असेही ते म्हणाले.
या प्रसंगी संस्थेच्या चेअरमन सौ. अनुराधा कोल्हापुरे, उपाध्यक्ष ॲड. रमेश यादव, संचालक अमर कोल्हापुरे, संजय वाईकर, मदन साळवेकर, सागर मुळे, वैभव फुले, श्रीकांत शिंदे, भूषण तारू, शरद चव्हाण, सलीमभाई बागवान, सौ. मंगला अहिवळे, सौ. अलका घाडगे, सौ. नीला कुलकर्णी, मुख्य व्यवस्थापक प्रकाश पवार, शाखा व्यवस्थापक साजिद मुल्ला यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व.आण्णांनी रुजवलेली सेवाभावी आणि समाजकेंद्री कार्यपद्धती पुढील अनेक वर्षे संस्थेला दिशा देत राहील आणि संस्था भविष्यात यशाची नवनवीन शिखरे सर करेल, असा विश्वास शेवटी सर्वांनी व्यक्त केला.




