शिर्डी:-“गोदा ते नर्मदा जलयात्रा शिर्डीत एकवटली; श्रद्धा-सबुरीच्या भूमीतून दुष्काळमुक्तीचा संकल्प!”
पत्रकार आदिनाथ कडू अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“गोदा ते नर्मदा जलयात्रा शिर्डीत एकवटली; श्रद्धा-सबुरीच्या भूमीतून दुष्काळमुक्तीचा संकल्प!”

अहिल्यानगर प्रतिनिधी आदिनाथ कडू
शिर्डी, दि. २७ (प्रतिनिधी)
संपूर्ण जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या पावन भूमीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जयघोष दुमदुमला. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून निघालेल्या “गोदा ते नर्मदा” जलयात्रेच्या दोन्ही प्रवाहांचे शिर्डीत भव्य संगम झाला. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प जलयात्रेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा निर्धार जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून या जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गोदावरी नदीचे उगमस्थान श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि अहिल्यादेवींचे जन्मस्थान चोंडी येथून सुरू झालेल्या या दोन यात्रा शिर्डीत एकत्र आल्या असून सोमवारी त्या मध्यप्रदेशकडे प्रस्थान करणार आहेत.
यात्रेदरम्यान राज्यातील विविध नद्यांमधून आणलेल्या जलकलशांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिर्डीतील मल्हारी मार्तंड मंदिरात विधिवत पूजन करून यात्रेचे स्वागत करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांवरून जलकलशांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनाचा संदेश चित्रफितींच्या माध्यमातून प्रभावीपणे देण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा आणि जलकलशांचा सजवलेला रथ हे यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले. धनगर नृत्याच्या सादरीकरणाने वातावरण भारावले, तर मंत्री विखे पाटील यांच्यासह आमदारांचा बसमधील प्रवास चर्चेचा विषय ठरला.
सांस्कृतिक कार्यक्रमात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, “अहिल्यादेवी होळकर यांनी जलसंवर्धनाची मजबूत परंपरा निर्माण केली. त्याचबरोबर त्यांनी दिलेला सांस्कृतिक वारसा आजही प्रेरणादायी आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, श्री दासगणू महाराजांनी ‘श्री साईबाबा सुवर्ण मंजिरी’ हा ग्रंथ महेश्वर येथे लिहिला, त्यामुळे शिर्डी आणि महेश्वर या दोन पवित्र नगरी अध्यात्माच्या बंधनात जोडल्या गेल्या आहेत.
या जलयात्रेमुळे जलसंवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचत असून, महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने ही एक महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.




