मायणी:-मराठी लेखकाला स्वतःच्या भाषेचा व मातीचा अभिमान असला पाहिजे – डॉ.रफिक सूरज.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण 8208717483

मराठी लेखकाला स्वतःच्या भाषेचा व मातीचा अभिमान असला पाहिजे – डॉ.रफिक सूरज.

मायणी प्रतिनिधी——— – व्यासपीठावरून बोलताना डॉ.रफिक सूरज,सोबत उजवीकडून प्रा.सय्यद,प्राचार्य गोरोबा खुरपे, एन.व्ही.कुबेर,प्रा.सुभाष खोत, ए.टी.पुस्तके,श्यामसुंदर मिरजकर आदि)
“मराठी लेखकाला स्वतःच्या भाषेचा व मातीचा अभिमान असला पाहिजे; तसाच समाजाला मराठी साहित्यिकांचा अभिमान वाटला पाहिजे. संत तुकाराम हे वैश्विक कवी असून ते महाराष्ट्राची अस्मिता आहेत. मराठी साहित्याची दीड हजार वर्षांची परंपरा नीटपणे समजून घ्यायची असेल, तर मराठीतील उत्तम साहित्य वाचले पाहिजे. तसेच साहित्यिकांची अभिव्यक्ती जपली पाहिजे,” असे प्रतिपादन कवी व कथाकार डॉ. रफीक सूरज यांनी केले. ते येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाने आयोजित केलेल्या १६व्या युवा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक एन. व्ही. कुबेर होते.
प्रारंभी स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करून व कुंडीतील रोपाला पाणी घालून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत साहित्यिक डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी केले. प्राचार्य डॉ. गोरोबा खुरपे यांनी साहित्य संमेलन आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी ॲड. शुभदा कुलकर्णी लिखित ‘कल्लोळ गोंदणांचा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
संवेदना बोथट होण्याचा हा काळ आहे, असे सांगून डॉ. रफीक सूरज पुढे म्हणाले, ” यशवंतराव चव्हाण, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे राजकारणी ग्रंथ वाचनासाठी आवर्जून वेळ काढायचे. परंतु आजच्या काळात ग्रंथ वाचून ज्ञान संपादन करणे हरवत चालले आहे. विकासाच्या नावाखाली सगळे भकास होत चालले आहे. अशा काळात साहित्य आशावाद रुजविते. युद्ध लादले जाण्याचा व सर्वत्र कोरडेपणा वाढण्याचा हा काळ आहे. अशा काळात विस्थापितांशी नाळ जोडून वैश्विक जाणिवा जपल्या पाहिजेत. शरीर व कपड्यांना घाण लागू नये म्हणून जसे आपण जपतो, तसे मनाला मलीनता व कोरडेपणा येऊ नये म्हणून जपले पाहिजे.”
दुसऱ्या सत्रात प्रा. सुभाष खोत यांनी ‘गावाकडील नाटक’ ही कथा सादर केली. तर तिसऱ्या सत्रात कवी शिवाजी बंडगर (सांगोला) यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार कविसंमेलन झाले. यामध्ये शाहीर नारायण कदम (धोंडेवाडी), प्रदीपकुमार भांदिर्गे(मोराळे), कु. पौर्णिमा वेदपाठक (बी.ए.२), सोपान शिंदे (चितळी), कुंदा कांबळे-लोखंडे (मायणी), प्रकाश शिंदे (विटा), प्रदीप भिसे (बी.ए.१), विठ्ठल भागवत (विटा), सौ. वंदना लिपारे, डॉ. हेमांगिनी माने, भगवान वायदंडे (विटा), महादेव भोकरे (वडूज) यांनी काव्यवाचन केले. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन गझलकार महेश मोरे (निमसोड) यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. शौकतअली सय्यद व डॉ. लक्ष्मण जठार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. विजया कदम यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. शिवशंकर माळी व डॉ. हेमांगिनी वमाने यांनी केले. यावेळी मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक ए. टी. पुस्तके, प्राध्यापक वृंद व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. – –



