पुणे–सातारा हायवेवर बेकायदेशीर लाकूड वाहतूक पकडली; टेम्पोसह आरोपी वनविभागाच्या ताब्यात.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) पुणे–सातारा हायवेवर बेकायदेशीर लाकूड वाहतूक पकडली; टेम्पोसह आरोपी वनविभागाच्या ताब्यात.

सातारा प्रतिनिधी : सारिका गवते
मौजे बोपेगाव परिसरात वनविभागाकडून सुरू असलेल्या रोड गस्तीदरम्यान पुणे–सातारा हायवेवर बेकायदेशीर लाकूड वाहतूक उघडकीस आली. टेम्पो क्रमांक MH-11-CH-9534 मधून विनापास व विनापरवाना लाकूड वाहतूक केली जात असल्याचे आढळून आल्यानंतर वनविभागाने तात्काळ कारवाई करत टेम्पो आरोपीसह ताब्यात घेतला.
सदर टेम्पोमधील लाकूड वाहतुकीबाबत आवश्यक कागदपत्रे व परवाना नसल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे टेम्पो जप्त करून आरोपीला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास वनविभागाकडून सुरू आहे.
ही कारवाई मा. उपवनसंरक्षक श्री. अमोल सातपुते (सातारा वन विभाग), मा. सहाय्यक वनसंरक्षक श्री. रौंदळ तसेच वनक्षेत्रपाल वाई श्री. महादेव हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत वनपाल वाई श्री. संग्राम मोरे, वनरक्षक बोपेगाव श्रीमती अश्विनी करडे आणि वनरक्षक भुईंज साक्षी शिंदे यांनी सहभाग घेतला.
2) वाई:-विराटनगर–वाई रस्त्यावर बेकायदेशीर लाकूड वाहतूक उघड; ट्रॅक्टरसह २ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त.

वाई :
गुप्त माहितीनुसार वनविभागाने केलेल्या फिरती तपासणीत विराटनगर–वाई रस्त्यावर बेकायदेशीर लाकूड वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला. या कारवाईत ट्रॅक्टर क्रमांक MH-11-G-351 सह आरोपीला ताब्यात घेऊन सुमारे २,०४,११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वनविभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार विराटनगर परिसरात तपासणी सुरू असताना आरोपी सुधीर सुभाष चव्हाण हा ट्रॅक्टरमधून आंबा व बोर जातीचा लाकूडमाल विनापास व विनापरवाना वाहतूक करताना आढळून आला. त्यानंतर ट्रॅक्टरसह आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
सुरक्षेच्या दृष्टीने जप्त केलेला ट्रॅक्टर वनक्षेत्रपाल कार्यालय, वाई येथे आणून ठेवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.
ही कारवाई मा. उपवनसंरक्षक श्री. अमोल सातपुते (सातारा वन विभाग), मा. सहाय्यक वनसंरक्षक श्री. रौंदळ तसेच वनक्षेत्रपाल वाई श्री. महादेव हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
3) वाई:-गरवारे टेक्निकल फायबर्समध्ये ११०० महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान; वाईत जागतिक महिला दिन उत्साहात.

वाई, दि. १२ : वाई येथील औद्योगिक वसाहतीतील गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कंपनीत कार्यरत असलेल्या ११०० हून अधिक महिला कर्मचाऱ्यांचा गौरव करून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला.
वाई–पाचवड रस्त्यावरील सुशिला मंगल कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमाला महिला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून रमेश गरवारे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अपूर्वा कुलकर्णी उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर व्हाईस प्रेसिडेंट अरविंद कुलकर्णी, जनरल मॅनेजर युवराज थोरात, सचिन कुलकर्णी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. दीपप्रज्वलन व गणेशपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना अपूर्वा कुलकर्णी यांनी महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना सांगितले की, आजची स्त्री केवळ कुटुंबापुरती मर्यादित न राहता उद्योग, शिक्षण, विज्ञान आणि विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे. गरवारे टेक्निकल फायबर्समधील महिलांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर कंपनीचे उत्पादन जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्यास मोठा हातभार लावला आहे.
अध्यक्षीय भाषणात विवेक कुलकर्णी यांनी महिलांना समान संधी आणि सन्मान मिळणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे सांगितले. कंपनी सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या आरोग्य, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. तसेच घेण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये तीन महिलांना विशेष भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. वर्षभरात सर्वाधिक कामाचे दिवस पूर्ण करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेला कंपनीच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज थोरात यांनी केले. सूत्रसंचालन कल्याणी दुधाने व धनश्री ढगे यांनी केले, तर सचिन कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी बलजीतसिंग सैनी, चंद्रशेखर बदाने, प्रशांत कुलकर्णी, कामगार संघटनेचे सेक्रेटरी अर्जुन सावंत यांच्यासह अधिकारी वर्ग आणि मोठ्या संख्येने महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
4) वाई:-वनवा लावणाऱ्यावर वनविभागाचा हातोडा; केंजळच्या तरुणाला अटक.

वाई, दि. १२ : वनसंपत्तीला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात वाई वनविभागाने कठोर कारवाई करत केंजळ (ता. वाई) येथील एका तरुणाला अटक केली आहे. चांदक व सटालेवाडी परिसरातील जंगलाला आग लावून मोठे नुकसान केल्याप्रकरणी अभिजीत तानाजी जगताप याला वनविभागाने बेड्या ठोकल्या.
४ मार्च २०२५ रोजी चांदक व सटालेवाडी परिसरातील वनक्षेत्रात भीषण आग लागली होती. जोरदार वाऱ्यामुळे या आगीने क्षणात रौद्र रूप धारण केले आणि तब्बल १४ हेक्टर जंगल आगीत जळून खाक झाले. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत निसर्गाचे मोठे नुकसान झाले होते.
या घटनेचा तपास हाती घेत वनविभागाने तांत्रिक माहिती आणि गुप्त तपासाच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. त्यानुसार अभिजीत जगताप याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यासाठी एक वर्षापर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद असल्याची माहिती वनविभागाने दिली.
ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक रौंदळ आणि वनक्षेत्रपाल महादेव हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनपाल संग्राम मोरे आणि वनरक्षक सुमितकुमार चौगुले यांनी तपासात मोलाची भूमिका बजावली.
वनविभागाच्या या कारवाईमुळे वनवा लावणाऱ्यांना कडक इशारा मिळाला असून, पर्यावरणप्रेमींकडून या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. वनवा लावणे, अवैध शिकार किंवा वृक्षतोड करणे हा गंभीर गुन्हा असून अशा कृत्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा इशारा वनविभागाने दिला आहे.
5) वाई:-वाईत घरदलालांचा उच्छाद; भाडेकरूंच्या खिशावर कमिशनचा घाला – बेकायदा दलालीचा बाजार तेजीत; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्यांची आर्थिक लूट.
वाई, दि. १२ : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई शहरात सध्या घरदलालांचा सुळसुळाट वाढला असून भाड्याने घर किंवा खोली शोधणाऱ्या नागरिकांची अक्षरशः आर्थिक पिळवणूक होत असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील विविध गल्लीबोळ, अपार्टमेंट्स व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये भाड्याच्या घरांवर काही दलालांनी अनधिकृतपणे मक्तेदारीच निर्माण केली असून भाडेकरूंना मोठ्या कमिशनचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एखादे घर किंवा खोली भाड्याने मिळवून देण्याच्या नावाखाली दलालांकडून भाडेकरूकडून एका महिन्याचे पूर्ण भाडे कमिशन म्हणून उकळले जात आहे. घरमालकाला केवळ भाडे आणि डिपॉझिट मिळत असताना कोणताही प्रत्यक्ष व्यवहार न करता केवळ माहिती देण्याच्या नावाखाली हे दलाल हजारो रुपये कमावत असल्याची तक्रार भाडेकरूंकडून व्यक्त होत आहे.
वाईमध्ये शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरून येणाऱ्या तरुणांनाही आणि कुटुंबांनाही या प्रकारामुळे मोठ्या आर्थिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी भाडेकरूंनी थेट घरमालकाशी संपर्क साधून खोली मिळवण्याचा प्रयत्न केला असता दलालांकडून त्यामध्ये हस्तक्षेप करून वाद निर्माण केल्याचे प्रकारही समोर आले आहेत. काही दलालांकडून “आमच्याशिवाय घर कसे मिळते ते पाहूच” अशा प्रकारची दबावाची भाषा वापरली जात असल्याचीही चर्चा आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, वाई शहरात कार्यरत असलेल्या अनेक दलालांकडे या व्यवसायासाठी आवश्यक असणारे कायदेशीर परवाने किंवा नोंदणी नसल्याचे समोर येत आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवत हा बेकायदा दलालीचा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून अनधिकृत घरदलालांवर कारवाई करावी, तसेच भाडेकरूंच्या लुटीला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. शिक्षण व रोजगारासाठी बाहेरून येणारे लोक वाईच्या अर्थचक्राला गती देतात; मात्र त्यांच्याच खिशावर चाललेली ही लूट शहराच्या प्रतिमेला धक्का देणारी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
6) कराड:-मच्छिंद्रगडावर ‘झेप’ची उंच झेप; कर्तृत्ववान महिला व आदर्श मातांचा दिमाखदार सन्मान.

कराड, दि. १२ : जागतिक महिला दिनाचे औचित्य आणि ‘झेप’ फाउंडेशनचे सचिव शरद कांतीलाल निकम यांच्या वाढदिवसानिमित्त किल्ले मच्छिंद्रगड येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व आदर्श मातांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून समाजातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा सन्मान करत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे वाळवा तालुका अध्यक्ष व यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखान्याचे संचालक केदार पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ नेते धोंडीराम दादा जाधव आणि कृष्णा साखर कारखान्याचे एच.आर. मॅनेजर संदीप भोसले यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी सौ. शालन सयाजी जाधव, सौ. पद्मावती बाळासो डुबल, सौ. राजाअक्क पाटील आणि सौ. मंगल गणपती डुबन यांना आदर्श माता म्हणून गौरविण्यात आले. सौ. रत्नमाला वसंत कारंडे यांना आदर्श महिला, सौ. अंजुम अमित पटेल यांना आदर्श ई-सेवा केंद्र, तर सौ. प्रियंका मंडले यांना आदर्श पत्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना केदार पाटील आणि धोंडीराम दादा जाधव यांनी शरद निकम यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. “वाढदिवसाचे अनावश्यक खर्च टाळून महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. झेप फाउंडेशनच्या माध्यमातून निकम यांनी वाळवा तालुक्यात समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे,” असे त्यांनी नमूद केले.
या सोहळ्याला सरपंच सौ. वैशाली साळुंखे, उपसरपंच संभाजी मदने, युवा नेते नानाजी शिंदे, हनुमंत मोरे, तानाजी जाधव (खजिनदार, मच्छिंद्रनाथ ट्रस्ट), सुनील पोळ, तानाजी यादव, दादा शिंदे (चेअरमन, विकास सोसायटी) यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, टायगर ग्रुप, युवा ग्रामीण पत्रकार संघ, सातारा जिल्हा अतुल बाबा युवा मंच, नऊ मार्च क्रीडा मंडळ, संस्कृत मंडळ, बिंदास्त चौक आणि धनाजी कदम व्यायाम मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




