वाई:-‘यशाचा मंत्र परिश्रमातच!’ किसन वीर महाविद्यालयात पारितोषिकांचा दणदणीत सोहळा; प्राचार्य येवले यांचा तरुणांना थेट संदेश.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

‘यशाचा मंत्र परिश्रमातच!’ किसन वीर महाविद्यालयात पारितोषिकांचा दणदणीत सोहळा; प्राचार्य येवले यांचा तरुणांना थेट संदेश.

सातारा प्रतिनिधी सारिका गवते
वाई : दि. ०४ मार्च २०२६
“यश हे केवळ गुणांवर अवलंबून नसून सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टीकोनावर उभे असते,” असा ठाम संदेश रवींद्र येवले यांनी दिला. किसन वीर महाविद्यालय येथे आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मदनदादा भोसले होते.
प्राचार्य येवले म्हणाले, स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता कौशल्यविकास आणि नैतिक मूल्ये जोपासली पाहिजेत. देशसेवेचे व्रत हाती घेऊन आपल्या क्षमतांची ओळख करून घेतल्यास यश निश्चित मिळते. विचारांचे प्रदूषण राष्ट्राला घातक ठरते, असे स्पष्ट करत त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल व टीव्हीच्या अतिरेकापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. आई-वडील व शिक्षकांचा आदर, प्रामाणिक प्रयत्न आणि सकारात्मक विचार हीच यशाची खरी ताकद असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तरुणांनी व्यसनापासून दूर राहून चांगल्या व्यक्तींचा आदर्श घ्यावा, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात मदनदादा भोसले यांनी तरुण पिढीने सजग आणि जागरूक राहण्याचे आवाहन केले. “आजच्या काळात केवळ शैक्षणिक यश पुरेसे नाही; शिक्षणासोबत एखादे कौशल्य आत्मसात केले आहे का, यालाही तितकेच महत्त्व आहे,” असे ते म्हणाले. पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांनी भविष्यात समाजासाठी मोलाचे योगदान देणारे, जबाबदार नागरिक बनावे, हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला. शैक्षणिक अहवाल प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे यांनी, क्रीडा व एनसीसी अहवाल मेजर डॉ. समीर पवार यांनी, एनएसएस अहवाल डॉ. मंजुषा इंगवले यांनी तर कला व सांस्कृतिक अहवाल प्रा. (डॉ.) अंबादास सकट यांनी सादर केला. सर्व पारितोषिकांचे वाचन डॉ. संग्राम थोरात यांनी केले.
या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला, सांस्कृतिक तसेच विविध सहशैक्षणिक उपक्रमांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. एम.एस्सी. रसायनशास्त्र शाखेचा विद्यार्थी चि. मृगेंद्र तानाजी गुरव व बीसीए विभागातील कु. सानिया अश्फाक काझी यांना ‘आदर्श विद्यार्थी’ म्हणून सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्राध्यापकांचाही विशेष गौरव करण्यात आला.
पाहुण्यांची ओळख डॉ. शिवाजी कांबळे यांनी करून दिली. आभार प्रा. (डॉ.) विनोद वीर यांनी मानले. कु. भक्ती वायदंडे हिने पसायदान गायन केले. सूत्रसंचालन श्रीमती सुमती कांबळे व श्री. राहुल तायडे यांनी केले.
कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, प्राध्यापक, कर्मचारी, सेवक, आजी-माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




