वाई:-बावधनचा ऐतिहासिक क्षण! १६ वर्षांच्या नवसाची फलश्रुती; विठ्ठल कदम यांना काशीनाथ बगाड्याचा मानाचा तुरा.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

1) वाई:-बावधनचा ऐतिहासिक क्षण! १६ वर्षांच्या नवसाची फलश्रुती; विठ्ठल कदम यांना काशीनाथ बगाड्याचा मानाचा तुरा.

सातारा प्रतिनिधी सारिका गवते
वाई दि. ०३ : भक्ती, त्याग आणि अढळ श्रद्धेची परंपरा जपणाऱ्या वाई तालुक्यातील बावधन येथील जगप्रसिद्ध ‘काशीनाथ बगाड यात्रा’ यंदा अभूतपूर्व उत्साहात साजरी होत आहे. तब्बल १६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विठ्ठल सोपान कदम यांना ‘बगाड्या’चा सर्वोच्च मान मिळाल्याने संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
२०१० साली मोठे बंधू रविंद्र सोपान कदम यांची प्रकृती अत्यंत गंभीर असताना विठ्ठल कदम यांनी काशीनाथ चरणी नवस केला होता. “भावाचे प्राण वाचू देत; मला बगाड्याचा मान मिळू दे,” अशी मनोमन प्रार्थना त्यांनी केली होती. त्यानंतर २०१३ पासून ते सातत्याने नवसासाठी बसत होते. अखेर २०२६ मध्ये त्यांचा नवस पूर्णत्वास येत असून, रविवार ८ मार्च रोजी ते बगाडावर स्वार होऊन काशीनाथाची सेवा करणार आहेत.
यात्रेचा मुख्य सोहळा पारंपरिक धार्मिक विधी, देवाची पालखी, ढोल-ताशांचा गजर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. “देवाच्या कृपेने माझ्या भावाचे प्राण वाचले, हेच सर्वात मोठं समाधान आहे. १६ वर्षांनी मिळालेला हा मान माझ्या कुटुंबासाठी भाग्याचा क्षण आहे,” अशी भावनिक प्रतिक्रिया मानकरी विठ्ठल कदम यांनी दिली.
दरम्यान, बावधन ग्रामस्थ आणि यात्रा समितीच्या वतीने भव्य तयारी करण्यात आली आहे. वाई-बावधन परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असून, पाणी व आरोग्य सुविधांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या संपूर्ण परिसरात “काशीनाथाच्या नावानं चांगभलं!”चा जयघोष घुमत असून, श्रद्धा आणि भक्तीचा महासागर उसळला आहे.
2) वाई:-श्रद्धा, सेवा आणि सन्मान; फुलेनगरचा ३५ वर्षांच्या सेवेला बगाडाचा मानाचा मुकुट कैलास जमदाडेंच्या नावे.

वाई दि. ०३ : वाई येथील फुलेनगरच्या ऐतिहासिक आणि बहुचर्चित बगाड यात्रेचा २०२६ सालचा मान माजी नगरसेवक कैलास जमदाडे यांच्या नावे जाहीर झाला आहे. तब्बल ३५ वर्षांच्या अखंड, निस्वार्थ आणि निष्ठावंत सेवेचे हे सार्थ फलित मानले जात असून, जमदाडे परिवारासह संपूर्ण फुलेनगर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
१९९० सालापासून बगाड सेवेची धुरा सांभाळणाऱ्या कैलास जमदाडे यांनी बगाड कमिटीचे खजिनदार म्हणून दीर्घकाळ जबाबदारी पार पाडली. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावत असतानाही त्यांनी परंपरेची कास सोडली नाही. विशेष म्हणजे कोणताही नवस किंवा मानाची अपेक्षा न ठेवता केलेल्या सेवेची दखल घेत यंदा त्यांना सर्वोच्च बहुमान मिळाल्याची भावना भाविक व्यक्त करत आहेत.
फुलेनगरच्या बगाडाला सुमारे १५० वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. १९५२ साली एका अपघातानंतर काही काळ हा सोहळा बंद ठेवण्यात आला होता. त्या काळात मानाची काठी आणि पालखी सोहळा सुरू होता. मात्र ग्रामस्थांच्या श्रद्धा आणि चिकाटीमुळे १९६२ साली पुन्हा बगाड सुरू करण्यात आला. त्यावेळी पहिला मान हरी काळू जमदाडे यांना मिळाला होता. आता त्याच घराण्यातील कैलास जमदाडे यांच्या नावे मान जाहीर झाल्याने परंपरेचे वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
येत्या ५ मार्च रोजी गुरुवारी सकाळी वाकेश्वर येथे विधिवत पूजा करून उत्सवाला प्रारंभ होईल. त्यानंतर वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत बलदंड बैलांच्या जोड्यांच्या सहाय्याने बगाडाची गाव प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत फुलेनगर भगव्या रंगात न्हाऊन निघणार असून, ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी परिसर सज्ज झाला आहे.
दरम्यान, “मी गेली ३५ वर्षे बगाडाची सेवा करत आहे. कधीही मानाची इच्छा मनात ठेवली नव्हती. देवाने माझ्या सेवेची दखल घेत हा सन्मान दिला, याचा मला अभिमान आहे,” अशी भावना कैलास जमदाडे यांनी व्यक्त केली.
फुलेनगर सज्ज आहे… श्रद्धा, सेवा आणि सन्मानाचा सोहळा इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे!




