मेढा नगरपंचायतीत शिवसेनेचे पाच पांडव ठरले राजकीय कौरवांना भारी….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

मेढा नगरपंचायतीत शिवसेनेचे पाच पांडव ठरले राजकीय कौरवांना भारी….

मेढा दि: सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिका व जावली तालुक्यातील मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल बाहेर पडले. आणि हत्तीच्या गोष्टी प्रमाणे त्याचे विश्लेषण होत असले तरी जावळी तालुक्यातील मेढा नगरीत शिवसेनेचे पाच पांडव व राष्ट्रवादीचे अभिमन्यू यशस्वी ठरले आहेत . भाजप मधील राजकीय शंभर कौरवांना भारी पडल्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांना सुद्धा याची दखल घ्यावी लागली. शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांचे अभिनंदन केले.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यातील सत्ताधाऱ्यांसोबत राहण्यातच धन्यता मानली आहे. तरी काही स्वाभिमानी व सत्तेपेक्षाही लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये प्राधान्य देणाऱ्या अनेकांना विजयी होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात रसद पुरवावी लागली. काहींना तर पराभवामुळे आपण जमिनीवर येऊ नये म्हणून
काही मतदारांसाठी पक्षाच्या पैशातूनच थेट जलद प्रवास करणाऱ्या विमान तिकीट काढून दिल्याने त्या लोकशाही मानणाऱ्या मतदारांनाही पांडुरंग पावला. अशी आता दबक्या आवाजात चर्चा सुरू झालेली आहे.
साम- दाम- दंड- भेद- बंड याचा पुरेपूर वापर करून सुद्धा नवख्या कार्यकर्त्यांकडून भाजपला मेढा नगरीत सहा जागी रोखण्यात यश आले आहे. याबाबत आता आत्मचिंतन करण्यास सुरुवात झालेली आहे. तसं पाहिलं तर प्रभाग क्रमांक चार मधून आनगा करंजेकर ,आनंदी करंजेकर या बिनविरोध झाल्या असल्या तरी त्या ठिकाणीही मोठी चुरस निर्माण झाली असती असं सध्या तरी नमूद करावे वाटत आहे.
शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक सहा मधील सोनाली पवार, प्रभाग क्रमांक नऊ मध्ये बापूराव जवळ, प्रभाग क्रमांक तेरा मधील रणजीत गोरे, प्रभाग क्रमांक पंधरा मधील मोनिका जवळ, प्रभाग क्रमांक सोळा मधील शर्वरी गायकवाड या शिवसेनेच्या धनुष्य बाण चिन्हावर तर प्रभाग क्रमांक आठ मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कुमारी प्राजक्ता पार्टे या भाजपच्या विरोधात शिवसेना व राष्ट्रवादी सहा नगरसेवक निवडून आलेले आहेत. वास्तविक पाहता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाली असती तर चित्र वेगळे दिसले असते. आता जावळी तालुक्यातील आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये चूक दुरुस्ती झाल्यास भाजपला चांगलेच झुंजावे लागणार आहे. हे सुद्धा स्पष्ट झाले आहे. जावळी तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे मेढा नगरी कडे सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले होते. वास्तविक पाहता निकालाची जाणीव झाल्यानंतर अनेकांना पायाला भिंगरी लावून पुन्हा पुन्हा मतदारांच्या कडे संपर्क साधून खात्री करावी लागत होती. तरीसुद्धा मेढा नगरीत भाजप अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच आता या ठिकाणी लक्ष घालावे लागणार आहे. शिवसेनेचे जावळी तालुक्याचे नेते एकनाथ ओंबळे, प्रशांत तरडे, सचिन जवळ,संजय सुर्वे, सचिन करंजेकर व शिवसैनिकांनी करिष्मा दाखवला असला तरी भाजपचे स्थानिक नेते ज्ञानेश्वर रांजणे व वसंतराव मानकुमरे या जोड गोळीने तसेच कांतीभाई देशमुख, दत्ता पवार, पांडुरंग जवळ, संतोष वारागडे व त्यांच्या शक्तीने विजय खेचून आणलेला आहे. त्यांना काही स्थानिक कार्यकर्त्यांची ही मोलाची साथ लाभली आहे.
खरं म्हणजे मेढा येथे भाजपने नगराध्यक्ष व १७ नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. ऐन वेळेला उमेदवाराबद्दल असणारी नाराजी आणि भाजपला अतिरिक्त आत्मविश्वास नडला. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व शिवसेनेमध्ये पहिल्यापासून युती- आघाडी झाली असती तर किमान सत्ता येणे इतके पक्षीय बलाबल मिळाले असते. परंतु ,राजकारणामध्ये जर तर ला किंमत नसते. आता ही चूक सुधारण्यासाठी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व स्थानिक शिवसेना नेते यांनी विजयी होणाऱ्या उमेदवारासाठी व्यक्तिगत व पक्षीय राजकारण बाजूला ठेवले. हे निकालाने स्पष्ट झाले आहे.
मेढा नगरीत विकास कामे करूनही संपूर्ण सतरा नगरसेवक निवडून आणता आले नाही. काही प्रभागात नगरसेवकांना मिळालेली मते व नगराध्यक्ष पदासाठी झालेले मतदान यातील फरक सुद्धा बरेच काही सांगून जात आहे. याची ही चर्चा रंगू लागलेली आहे. दरम्यान, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आता जावळी तालुक्यात भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या हाती सूत्र दिली तरच खऱ्या अर्थाने जावळी तालुक्यात भाजपमुळे वातावरण निर्माण करण्यास कोणतीही अडचण नाही. असेही काहींनी छातीठोकपणाने सांगितले.




