कराड:-भारतात शेतीतून शाश्वत विकासास मोठी संधी: बाबासाहेब तोरणे.
प्रतिनिधी प्रा.संतोष बोंगाळे कराड:-9923900840

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
भारतात शेतीतून शाश्वत विकासास मोठी संधी: बाबासाहेब तोरणे.
कराड : (दि. 18 प्रतिनिधी) ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय उंडाळेचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन मौजे घोगाव या ठिकाणी करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये आधुनिक व व्यापारी दृष्टिकोनातून शेती या विषयावर कृषी सहाय्यक श्री बाबासाहेब तोरणे हे बोलत होते.
भारत हा शेतीप्रधान देश आहे. आज ही भारतातील 70 टक्के अर्थव्यवस्था शेती वरती अवलंबून आहे. आपल्या देश विविधतेने नटलेला आहे. विविध प्रदेशांमध्ये विविध प्रकारे पिके घेतली जातात. या पिकांचा वापर व्यापारी दृष्टिकोनातून केला तर आपल्या देशामध्ये आर्थिक सुबत्ता मोठ्या प्रमाणामध्ये होईल. आपल्या देशातील तृणधान्याला जागतिक बाजारपेठेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तृणधान्याची पैदास वाढविल्यास आपल्याला त्यामधून मोठ्या प्रमाणावर व्यापारी संधी प्राप्त होऊ शकते. शेती करीत असताना प्रथम माती परीक्षण करणे गरजेचे आहे. माती परीक्षणातून आपल्या भागामध्ये कोणती पिके घेता येतात याचा अभ्यास शेतकऱ्यांनी केल्यास, कोणत्या काळामध्ये कोणत्या पिकास चालना दिली पाहिजे. बाजारपेठेत कोणत्या पिकाला कधी मागणी आहे याचं गणित शेतकऱ्यांना समजलं तर शेतीमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळू शकते. कारण शेती माणसाच्या दररोजच्या जगण्याशी निगडित आहे. शेतीमधून जे पिकत त्यावरच मनुष्यप्राणी जीवन जगू शकतो. म्हणून बाजारातल्या मागणीनुसार आपण शेतीमध्ये वेगवेगळे बदल केले, तर शेतीमधून नक्कीच मोठ्या प्रमाणावर आपल्याला उत्पन्न काढता येते. त्याचा वापर आर्थिक प्रगती करण्यासाठी करता येतो. यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक व्यापारी दृष्टिकोनातून शेती केली पाहिजे. माती परीक्षण करून योग्य खतांची मात्रा शेतीस दिली पाहिजे. सामुदायिक शेतीचा प्रयोग फायदेशीर ठरतो, त्यामुळे शेतीचे तुकडीकरण न होता सर्वांनी मिळून शेती करण्याकडे भर दिला पाहिजे. शेतीला पाहिजे तितकेच पाणी दिले पाहिजे. यांत्रिक शेतीचा वापर केला पाहिजे. या सर्व गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला तर शेतीतून भरघोस उत्पन्न मिळेल आणि आपल्या देशाला शेतीतून निर्यात करता येईल. त्याच्यातून आर्थिक प्रगती करता येईल. शेती हा शाश्वत विकासास चालना देणारा व्यवसाय आहे. तो व्यावसायिक दृष्टिकोनातून करणे हे आजच्या शेतकऱ्याची गरज निर्माण झालेली आहे. म्हणून शेतकऱ्यांनी डोळसदृष्टीने शेतीकडे पाहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कृषी सहाय्यक बाबासाहेब तोरणे यांनी केले. त्यांच्यासोबत श्री. विजय साळुंखे हेही उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शिवाजी पाटील तर श्री. काकासो पाटील व श्री. दिलीप सूर्यवंशी हे प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमास ग्रामस्थ व शिबिरार्थी स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन प्रकल्प अधिकारी प्रा. प्रदीप चोपडे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रा. हणमंत पिसाळ व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.