वाई:-जनता शिक्षण संस्थेचा ५७ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS
वाई दि .16
जनता शिक्षण संस्थेचा ५७ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.
कारागृहाचे दरवाजे बंद करून शिक्षणाचे दरवाजे उघडण्याचे काम किसन वीर (आबा), स्व. विठ्ठलराव (आण्णा) जगताप, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, स्व. प्रतापराव भोसले (भाऊ), स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्यासारख्या मागच्या पिढीतल्या व्यक्तींनी केले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज जनता शिक्षण संस्थेची प्रगती आपणास दिसून येत आहे. ही संस्था सक्षमपणे प्रगतीपथावर नेण्याकरिता आपल्या पिढीवर मोठी जबाबदारी वाढली आहे. शिक्षण संस्थांनी शिक्षणाकडे धंदा, व्यवसाय म्हणून पाहू नये. शिक्षणाकडे वसा म्हणून पाहिलं पाहिजे. तरच या मागच्या पिढीतल्या धुरीनांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिल्या सारखे होईल.” असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध मराठी साहित्यिक प्रा.कृष्णात खोत यांनी व्यक्त केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, संस्थेचे सदस्य श्री. केशवराव पाडळे, श्री, सुरेश यादव व श्री. मिलिंद पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, तिन्ही शाखांचे उपप्राचार्य, कनिष्ठ विभागातील उपप्राचार्य हे मान्यवर उपस्थित होते. साहित्यिक प्रा. कृष्णात खोत पुढे म्हणाले की, “एकही रुपया न घेता नोकरी देणारी संस्था म्हणून मला जनता शिक्षण संस्थेचा अभिमान वाटतो. अशा प्रकारची शिक्षण संस्था उभ्या महाराष्ट्रात दिसून येत नाही. आजचा काळ बदललेला आहे. बदलत्या काळानुसार आपणास पाऊल टाकले पाहिजे. जुन्या काळात शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये आस्था होती. शिक्षकांच्या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये आदरयुक्त भीती होती परंतु सद्यपरिस्थितीत ही आस्था आणि भीती उरलेली नाही. म्हणून शिक्षण व्यवस्थेविषयी आपण सर्वांनी चिंतन केले पाहिजे. आपल्या हातात २४ तास मोबाईल आहे. या मोबाईलच्या अतिवापरामुळे आयुष्यातला सर्वात चांगली वेळ वाया जात आहे, हे आजच्या तरुण विद्यार्थ्यांनी लक्षात घेऊन मोबाईलचा कमीत कमी व योग्य वापर केला पाहिजे. सदृढ समाज निर्मितीसाठी संस्कार, ज्ञान यांची जाणीवपूर्वक जोपासना केली पाहिजे. समाजामधून कुटुंब व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था नष्ट झाली तर ते आपल्या समाजाला परवडणारी गोष्ट नाही.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मा. मदनदादा भोसले म्हणाले की, पूर्वीच्या धुरीनांनी आपल्या दूरदृष्टीने या संस्थेची पायाभरणी केली. जनता शिक्षण संस्था आणि किसन वीर महाविद्यालयाच्या उभारणीसाठी वाई परिसरातील मागच्या पिढीतील शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन बँकेस तारण देऊन निधी उपलब्ध करून दिला. या सर्वांच्या कष्टाने व त्यागाने जनता शिक्षण संस्थेची उभारणी झाली आहे. संस्था एक कुटुंब आहे म्हणून संस्थेप्रती कृतज्ञ असणं महत्त्वाचे आहे. आपणास बदललेल्या काळाची चाहूल घेत पुढे जावं लागेल. बदलत्या काळाबरोबरच जे नवनवीन तंत्रज्ञान येत आहे त्या तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी स्वीकार केला पाहिजे. आधुनिक युगात विद्यार्थ्यांपुढील आव्हाने खूप आहेत. त्या आव्हानांना सामोरे आपणास जावे लागेल, त्यासाठी जनता शिक्षण संस्था महाविद्यालयाच्या माध्यमातून सक्षमपणे विद्यार्थ्यांसाठी काम निश्चित करेल, अशी मी ग्वाही देतो. विद्यार्थ्यांमध्ये कष्ट करण्याची वृत्ती रुजली पाहिजे तरच त्यांना यश मिळेल. या संदर्भात शिक्षकांच्यावर जबाबदारी खूप मोठी आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस किसन वीर (आबा) तर्क तीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, स्व. प्रतापराव भोसले (भाऊ) यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात करण्यात आली. संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये जनता शिक्षण संस्थेची जडणघडण कशी झाली, या संदर्भात थोडक्यात माहिती दिली. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे प्रा. कृष्णात खोत व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्था कार्यालयाच्या आवारात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व संस्था पदाधिकारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक नियतकालिक “कृष्णाई” चे प्रकाशन प्रमुख पाहुणे प्रा. कृष्णात खोत यांच्या हस्ते तर महाविद्यालयात नव्याने सुरू केलेल्या सीईटी सेलचे उद्धाटन संस्थेचे उपाध्यक्ष श्री. शंकरराव गाढवे सर यांच्या हस्ते व संस्था पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रा. (डॉ.) भानुदास आगेडकर, उपप्राचार्य डॉ. हणमंतराव कणसे, प्रा. भिमराव पटकुरे, यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश तर निवृत्त मुख्याध्यापक श्री. सुनिल जाधव यांनी ५१ हजार रुपये तसेच मुख्याध्यापक श्री. संजय कांबळे यांनी दहा हजारांचा धनादेश देणगीस्वरूपात सचिव डॉ. जयवंत चौधरी यांच्याकडे सुपूर्द केला.
डॉ.चंद्रकांत कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. संस्थेचे संचालक श्री.सुरेश यादव यांनी आभार मानले. तर प्रा. गणेश चव्हाण व डॉ. मंजुषा इंगवले यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी जनता शिक्षण संस्था संचलित सर्व माध्यमिक शाळांमधील तसेच किसन वीर महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ शाखेतील आजी-माजी प्राध्यापक, शिक्षक व कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.