दहिवडी:-आ.गोरे काही विरोधकांना प्रचारातूनच बाजूला केले तरच विजय….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
आ.गोरे काही विरोधकांना प्रचारातूनच बाजूला केले तरच विजय….
दहिवडी दि: सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांपैकी माण खटाव विधानसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षाचे बारीक लक्ष आहे. या ठिकाणी परिवर्तन घडवायचे असेल तर भाजप आ. जयकुमार गोरे यांच्या काही विरोधकांना प्रचार यंत्रणेपासून बाजूला ठेवले तरच विजय निश्चित आहे. अशी आता खुली आम चर्चा सुरू झालेली आहे.
माण- खटावच्या रणभूमीमध्ये गेले पंधरा वर्षे अपक्ष , राष्ट्रीय काँग्रेस व आता भाजप असा राजकीय प्रवास करून आ जयकुमार गोरे यांचा तथाकथित करिष्मा अजूनही कायम आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्या की, राजकीय विरोधक पाणी प्रश्नावर बोलतात. विकास कामांवर बोलतात. पण, स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकत्र येऊन गावोगावी भाजप विरोधात वातावरण तयार करण्यास त्यांना रस नसतो. आपलं नेतृत्व कसे उजाळून निघेल. यासाठीच ते राजकारण करत असतात. त्यामुळे पाणी आडवा पाणी जिरवा म्हणण्यापेक्षा पक्षातीलच कार्यकर्ता आडवा व त्याची जिरवा असा एक कलमी कार्यक्रम माण- खटाव तालुक्यात पाहण्यास मिळत आहे. वर वर पाहता आमचं ठरलंय असं म्हणून काही वर्षांपूर्वी आ. जयकुमार गोरे यांच्या विरोधात ज्वारीचा कडबा बांधवा. असा कडबा बांधण्यात आला. पण त्याच कडब्यातून आडवी गाठ मारली. तीच गाठ सुटल्यामुळे विरोधकांना एकत्र येता आले नाही. ही वस्तुस्थिती आहे.
सातारा जिल्ह्यातील आरक्षित फलटण वगळता इतर मागासवर्गीय समाजामधून भाजपचे आ. जयकुमार गोरे यांचे राजकीय वजन चांगलेच वाढलेले आहे. याचा फायदा माण- खटावच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा घेतलेला आहे. त्यांना महत्त्वाची पदं सुद्धा मिळालेली आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या अंतर्गत कलहामुळे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला. पण माण- खटावच्या जनतेने कमी का होईना पण महायुतीतील उमेदवार रणजीत सेनाक निंबाळकर यांच्या कमळालाच मताधिक्य देऊन आपण भाजपसोबत असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे आ. जयकुमार गोरे यांच्या बद्दल असलेली लोकांची कल आजही कमी झालेला नाही. प्रत्येक निवडणुकीमध्ये पाणी प्रश्नावर बोलून उरमोडी, जिहे -कठापुर, मायणी कुकुडवाड, औंध इतर गावांना योजनेचे पाणी देणार? हे आता गणगवळण झालेली आहे . पुढे तमाशा सुरू होतो. याचा आता काही मतदारांना वीट आलेला आहे.
पुन्हा एकदा भाजप आ. जयकुमार गोरे विरोधात राजकीय मोट बांधण्याचा प्रयत्न होत आहे. याला जर प्रामाणिकपणे यश मिळवायचे असेल तर माण- खटावच्या मातीतीलच परंतु, निवडणुकीत काही राजकीय नेत्यांना बाजूला केले तर माण खटावची सुज्ञ जनता ही निवडणूक हातात घेऊन परिवर्तन घडवेल. याबद्दल कोणाचेही दुमत नाही.
या भागातील स्वाभिमानी मातीतून काँग्रेस विचारधारेवर निष्ठा असणाऱ्या माजी आ. धोंडीराम वाघमारे यांच्यासारखे अनेक राजकीय नेते आहेत. पण त्यांना योग्य वेळी अभय देणे गरजेचे आहे. लोहा लोहे को काटता है ……या म्हणीप्रमाणे माण- खटाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने शिवसेनेचे युवा नेते शेखर गोरे यांचा प्रामाणिकपणाने प्रचार केला तर मतदार त्यांना निवडून देतील. असे सध्या तरी वातावरण आहे. पण या वातावरणाचा फायदा घेण्यापेक्षा आपली सुभेदारी, आपला गट शाबूत ठेवून विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर घाटात अडवण्याचे काम इमाने इतबार होत आहे.काही नेते विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच आपली भूमिका सोडून मला नाही तर तुलाही नाही. यावर ठाम राहतात. याचा फायदा आ. गोरे यांना होत आहे. हे आता अधोरेखित झालेले आहे.
राजकीय परिवर्तन हा शब्द माण- खटावला कधी प्राप्त होणार? याची आता जेष्ठ नागरिक वाट पाहत आहेत. जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडून विकास कामावर एकत्रित कार्यक्रम तयार केला पाहिजे. आणि महत्वकांक्षी कार्यक्रमाच्या आधारे पुढील दिशा ठरवली पाहिजे. काळे व गोरे असा भेदभाव न करता सर्वांनीच एकोप्याने ही निवडणूक लढवण्यासाठी एक जिद्द ठेवली तर मतदार नक्कीच त्यांच्या पारड्यात मत देतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांनी दहिवडी येथे झालेल्या जाहीर सभेत माणसाठी महाविकास आघाडीतर्फे एकच उमेदवार द्या. अशी उपयुक्त सूचना केलेली आहे . वडजल येथील माजी आमदार धोंडीराम वाघमारे यांच्या स्मारकाचे व अर्धकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी आ. वाघमारे यांच्या हुंदका काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आलेले आहे. हाच हुंदका माण- खटावच्या मतदारांचा समजून त्यांचे अश्रू पुसण्याचे काम भाजप विरोधक राजकीय पक्ष नक्कीच करतील. अन्यथा माण- खटावचे विरोधकांचे रडगाणे कधीही थांबणार नाही. हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. हे सुद्धा सुचित करावे वाटत आहे. असे आता गावगाड्यातील अनेक जण बोलू लागलेले आहेत. मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान केले तर परिवर्तन अटळ आहे. हे मात्र सिद्ध करावे लागणार आहे.
———————————-&———
फोटो -माण- खटाव मतदार संघात परिवर्तन होऊ शकते पण वरिष्ठ नेत्यांचे ऐकले पाहिजे.