पुणे निगडी:-सेक्टर 22 ला सवतीच्या पोरासारखी वागणूक का?’’- मैमुना शेख.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
सेक्टर 22 ला सवतीच्या पोरासारखी वागणूक का?’’- मैमुना शेख.
पुणे, निगडी, दि. 04 (शफिक शेख) – ‘‘भारतीय संविधानाने भारतात राहणा-या सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना समान हक्क दिले असताना पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेकडून सेक्टर नंबर 22 मधील वॉर्ड 13 च्या नागरिकांना सवतीच्या पोरासारखी वागणूक का दिली जात आहे’’, असा सवाल केला आहे आम आदमी पार्टीच्या पिंपरी-चिंचवड महिला विंगच्या उपाध्यक्षा सौ. मैमुना शेख यांनी.
सेक्टर नंबर 22 मधील वॉर्ड नंबर 13 मधील नागरिकांच्या समस्यांबाबत बोलताना सौ. शेख म्हणाल्या कि, काही दिवसांपूर्वी साईनाथनगर मधील रस्त्यांची खड्डे दुरूस्ती केली गेली त्यासाठी तेथे उत्तम प्रतीचे डांबरीकरण वापरून आणि त्यानंतर पूर्ण साफसफाई करून अत्यंत उच्च प्रतीचे काम केले गेले जेणेकरून तेथील ‘‘प्रतिष्ठित’’ नागरिकांना त्रास होता कामा नये. तसेच यमुनानगर येथेही काही दिवसांपूर्वी खड्डे दुरूस्तीचे काम करण्यात आले तेथेही उत्तम प्रतीचे डांबर आणि भरीचा वापर करण्यात आला तसेच दुरूस्तीनंती रस्त्याचे लेव्हलींगही करण्यात आले परंतु जेव्हा सेक्टर नंबर 22 मधील वॉर्ड 13 ची वेळ येते त्यावेळेत केवळ मोठी खडी आणि त्यावर डांबराचे पाणी आणि बारीक खडी वरचे वर पसरून निघून गेले. केवळ दोनच दिवसांमध्ये ती पूर्ण खडी निघून रस्ते पूर्वीप्रमाणे खड्डेमय दिसत आहेत. कदाचित वॉर्ड 13 मध्ये राहणा-या नागरिकांमध्ये बहुसंख्य दलित आणि मुस्लिम असणे यामागचे कारण असल्याचा आरोपही सौ. शेख यांनी केला.
त्यानंतर अधिक सांगताना सौ. शेख म्हणाल्या की सेक्टर नंबर 22 मधील मुतारी आणि शौचालये ही मंजूर निविदेप्रमाणे दररोज स्वच्छ होणे गरजेचे आहे परंतु केवळ आठवडयातून 1 ते 2 वेळेस ही स्वच्छता केली जाते. नियमाप्रमाणे दरवर्षी दोन कच-याचे डबे देणे बंधनकारक असतानाही मागील पाच वर्षांत केवळ एकदाच डबे देण्यात आले आहेत. येथील यमुनानगर शासकिय रूग्णालयात कायम औषधांच्या तुटवडयाचा नागरिकांना सामना करावा लागतो, गतीरोधकांची नितांत गरज असतानाही केवळ हायकोर्टाचा आदेश आहे असे कारण देवून स्थापत्य विभागाच्या श्री. भुमरे यांनी मधुकर पवळे शाळेसमोरील, फातिमा मशिदीसमोरील, यमुनानगर हॉस्पिटलसमोरील, आझाद चौकातील आणि भाजीमंडईमधील गतिरोधके कारवाई करून तोडून टाकली. परंतु त्यानंतर वैध अशा गतिरोधकांची निर्मिती केली नाही. जर या ठिकाणी गतिरोधके नसल्याने अपघात होवून कोणा नागरिकाचा जीव गेला तर जबाबदार कोण राहणार? अशाच प्रकारच्या अनेक समस्यांना येथील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. काय सेक्टर नंबर 22 मधील नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा अधिकार नाही काय. येथील नागरिक हे भारतीय नाहीत काय. केवळ निवडणूक जिंकण्यासाठी येथील नागरिकांच्या मतांचा वापर केला जातो.
यावेळी बोलताना सौ. शेख म्हणाल्या की, त्यांनी भारताच्या संविधानावर आधाारीत असलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माननीय आयुक्त श्री. शेखर सिंग हे लवकरच संबंधित विभागांना कारवाईचे आणि संबंधित विभागांच्या दोषी अधिका-यांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश देतील, अशी आशा व्यक्त केली आहे.