मायणी:-शाळेबरोबर विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थितीही जाणून घ्या! – माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांचे शिक्षकांना आवाहन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मायणी:-शाळेबरोबर विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थितीही जाणून घ्या! – माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांचे शिक्षकांना आवाहन.

मायणी प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीचाही त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असतो. त्यामुळे शिक्षकांनी केवळ शाळेपुरते मर्यादित न राहता, अचानक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांची भेट घ्यावी आणि त्यांच्या घरची परिस्थिती जाणून घ्यावी. पालकांशी आत्मीयतेने संवाद साधून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी केले.
कलेढोण गणातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पंचायत समिती सदस्य प्रसाद उर्फ राजूशेठ जुगदर यांनी आयोजित केलेल्या सभेत डॉ. येळगावकर बोलत होते.
यावेळी खटाव पंचायत समितीच्या सभापती सौ. वंदना दुबळे, सहाय्यक गट विकास अधिकारी जयवंत दळवी, उपसभापती सौ. रेश्मा शेडगे, अंगणवाडी बालविकास प्रकल्पाधिकारी ओंबासे मॅडम, अंगणवाडी सुपरवायझर स्वप्नाली मेढेकर, मायणी पंचायत समिती गण प्रतिनिधी संभाजी कोळी, संतोष दुबळे, कलेढोण ग्रामविकास अधिकारी सोमनाथ सावंत यांच्यासह शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.
सभेत कलेढोण गणातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी आपल्या शाळांच्या समस्या, अडचणी तसेच शाळेच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी आपुलकीचे नाते निर्माण करावे
डॉ. दिलीपराव येळगावकर म्हणाले की, “मी भाजपचा आमदार असताना एकाही शिक्षकाविरुद्ध तक्रार केली नाही आणि कोणत्याही शिक्षकाला त्रास दिला नाही.” शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच स्वतःचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढवून इंग्रजी चांगल्या पद्धतीने बोलता व शिकवता आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांबाबत शिक्षकांनी माहिती जाणून घ्यावी. काही कुटुंबांमध्ये पालक व्यसनाधीन असू शकतात किंवा घरातील काही समस्या विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर परिणाम करत असू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्याच्या घरची परिस्थिती समजून घेणेही शिक्षकांची महत्त्वाची जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
“चांगली शाळा असण्याबरोबरच विद्यार्थ्याच्या घरची परिस्थितीही चांगली असणे आवश्यक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी आत्मीयतेने वागावे, आपुलकी दाखवावी. त्यामुळे शिक्षक-विद्यार्थी संबंध अधिक घट्ट होतील आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला त्याचा निश्चितच फायदा होईल,” असे डॉ. येळगावकर म्हणाले.
विद्यार्थ्यांशी आत्मीयतेचे नाते निर्माण केल्यास शाळेचा पट कमी होणार नाही, उलट विद्यार्थी शाळेशी जोडले जातील आणि चांगले विद्यार्थी घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षकांनी आपल्या समस्या मोकळेपणाने मांडाव्यात; त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
मराठी माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शिकावे : राजूशेठ जुगदर
पंचायत समिती सदस्य प्रसाद उर्फ राजूशेठ जुगदर म्हणाले की, निवडून आल्यानंतर शाळांच्या समस्या सोडवून शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याचे ध्येय आपण ठेवले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतले पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे.
प्रत्येक शाळेने आपल्या अडचणी स्पष्टपणे मांडाव्यात. त्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. आपण कुठे कमी पडत आहोत, याचे शिक्षकांनी आत्मपरीक्षण करून विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी जयवंत दळवी, ओंबासे मॅडम आणि ग्रामविकास अधिकारी सोमनाथ सावंत यांनीही आपले विचार मांडले. शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सभा आयोजित केल्याबद्दल त्यांनी प्रसाद उर्फ राजूशेठ जुगदर यांचे आभार मानले.
फोटो ओळ : कलेढोण गणातील शिक्षकांसमोर मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर. सोबत खटाव पंचायत समिती सभापती सौ. वंदना दुबळे, पंचायत समिती सदस्य राजूशेठ जुगदर, सहाय्यक गट विकास अधिकारी जयवंत दळवी व इतर मान्यवर.





